मंगळवार, २ जून, २०१५

नाव...

एका सरळ रेषेत तिचा प्रवास चालला होता.
शांत डोहात.
स्वत:ला सावरत.
तिच्यावर अवलंबून असलेल्यांना सांभाळत.
वातावरणाशी झुंजत.

सगळं करता सरळ रेषेची कधी वळणं व्हायला लागली तिला समजलंच नाही.
बरंच अंतर काटून सहज मागे पाहिल्यावर पाण्यावर उमटलेली सगळी वळणं स्पष्ट दिसू लागली.
सुरुवात केलेला किनारा कधीच नजरेच्या टप्प्याआड गेला होता.
शेवटाचा किनारा कोणता हे ठाऊकच नव्हतं.

आता एकतर फक्त पुढे जाणं किंवा भरकटत राहणं इतकंच राहिलं होतं हाती.
कित्येक वादळांना तोंड देऊन त्राण संपलं.
प्रवाहाने जसं नेलं तशी ती वाहवत गेली, कोणताही निर्णय न घेता.
पुढे पुन्हा नवीन भोवरा गिळून टाकायला तयार होता.
पुन्हा हेलकावे सुरु.

या वेळी बुडायचंच होतं.
डावीकडे झुकलं तरी आणि उजवीकडे झुकलं तरी.
पण आता कुणीकडे हा निर्णय तीच घेणार होती.
कारण फक्त समाधान हवं होतं, स्वत:च्या मर्जीने बुडाल्याचं!!