गौरी-गणपती म्हणजे आठदहा दिवस आधीच लगबग सुरु. घराची स्वच्छता, फराळाची तयारी. मी शाळेत असताना सजावटीसाठी काहीतरी नवीन वस्तू घरी बनवत असे. पितळेचे मुखवटे घासून लख्ख करून त्यांना भुवया, डोळे, ओठ, गंध काढत असे. पूर्वी आमच्याकडे गौरींचे धातूचे तीन पाय असलेले स्टॅन्ड होते. त्यामध्ये सर्वात खाली एक मोठा डबा, त्यावर एक लहान डबा आणि त्यावर गडवा असे ठेवायचे. त्यावर स्टँड बसवून त्याला साड्या नेसवून गडव्यावर मुखवटा बसवायचा. डब्यांमध्ये धान्य, बदाम, सुपारी, हळकुंड, रुपया, खारीक असं सवाष्णीची ओटी भरताना ठेवतात ते साहित्य ठेवलं जाई. एका डब्यात फराळ केलेल्यातले गोड पदार्थ लाडू करंज्या वगैरे ठेवलं जात असे. मला स्वतःला पूर्वीपासूनच गोड आवडत नसे आणि आई सांगे या गौरी म्हणजे माहेरी आलेल्या लेकी असतात. तेव्हा मी आईला म्हणे अगं मग त्यामध्ये लाडू करंजी ऐवजी चकली चिवडा भर. आई म्हणे तू बसवशील तेव्हा कर तसं, मला बाई गोडाचंच देऊदेत. आता त्या स्टॅन्ड ऐवजी तयार फायबरचे पाय आणि मुखवटे आईने आणले आहेत. फराळ सगळा पोटात जाण्याऐवजी समोर असतो. आईचं हे एक मला आवडतं. बदलत्या काळाप्रमाणे आपणही बदलायचं तरी मनी भाव तोच. उगीच कर्मकांडाला चिकटून बसायचं नाही.
पूर्वतरंग ....
गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२६
महालक्ष्मी
गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२६
आळस
दिवसभर लेखाचा विषय लिहून ठेवला, पण लिहिण्याचा आळसच आला. कधीकधी अशी मानसिकता होते की कोणी काही मागितलं नाही, काही डेडलाईन नाही तोपर्यंत एखादी गोष्ट करायचीच नाही. याला सहजरित्या आळसाचं नाव दिलं जातं. पण हा खरंच आळस असतो की थकवा असतो? बऱ्याचदा बराच निवांत वेळ घालवणाऱ्या माणसालादेखील काही गोष्टी पटकन करण्याचा हुरूप येत नाही. अशा माणसाला आपण आळशीच म्हणतो, पण त्यालादेखील मानसिक थकवा असेल कदाचित. शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा जास्तच धोकादायक. शरीराचा थकवा एखाद्या झोपेनंतर निघून जाऊ शकतो, पण मनाचा थकवा झोपही येऊ देत नाही.
सोमवार, १० ऑगस्ट, २०२६
फोटो
खूप पूर्वी फोटोचे तंत्रज्ञान माहिती नव्हते तेव्हा कसलेले कलाकार मोठ्या लोकांची चित्रे काढत. मोठ्या लोकांचीच का, तर चित्रकला ही कला असण्याबरोबरच ते तंत्रज्ञान देखील होते, आणि आपली कला आणि तंत्रज्ञान यांचा केलेला योग्य वापर, आणि कौशल्य यासाठी त्यांना भरघोस मोबदला मिळे. हा मोबदला सामान्य माणूस कुठून देणार, म्हणून चित्रेही मोठ्यांचीच असत. रंग वगैरे तयार करावे लागायचे. आणि ते ही तंत्रज्ञान नसेल तेव्हा माणूस स्वतःला पाण्यात, किंवा प्रतिबिंब पडेल अशा ठिकाणी स्वतःचा चेहरा पाहत असेल तेच त्याचं स्वतःला पाहणं. पण त्याचं रंगरूप जतन मात्र होत नव्हतं. एखाद्याला दुसऱ्या माणसाला आठवायचं असेल तर कल्पनेतच आठवायचं, समोर चित्र किंवा फोटो असं काही नाही.


%20(2)%20(1).jpg)