बुधवार, २५ एप्रिल, २०१२

संस्कार?

           
            शेजारच्या काकू रविवारी आईशी गप्पा मारायला आल्या होत्या. त्यांना गप्पांना काही विषयच लागत नाही. आणि सगळेच विषय संपले तर अमक्याच्या घरी असं असं झालं, याचं त्याच्याशी भांडण झालं, या एखाद्याच्या घरातल्या अगदी वैयक्तिक गोष्टीही त्यांना माहिती असतात. असंच बोलता बोलता त्यांनी सांगितलं की "त्या कल्पनाची मुलगी आहे ना, तिने अमक्या अमक्या जातीच्या मुलाशी पळून जाऊन लग्न केलं. तसेही तिच्यावर काही संस्कार आहेत असं कधी वाटतच नव्हतं."
तेव्हा मनात आलं, संस्कार म्हणजे नक्की काय असतं?

            पूर्वी म्हणत मुलीच्या जातीने शांत असावं, चार लोकात मोठ्याने हसू नये, अशी मुलगी असली की तिच्यावर चांगले संस्कार आहेत, पण एखादी अशी असली आणि तिचा स्वभावच चांगला नसेल तर फक्त वरवरच्या वागण्याला संस्कार म्हणायचं का? पळून जाऊन किंवा घरच्यांविरुद्ध लग्न केलं तर संस्कार नसतात का? ती जर आयुष्यभर सुखी राहणार असेल तर काय बिघडलंय?

            एखादा मुलगा व्यसनाधीन असेल पण कोणाच्याही मदतीला कधीही धाऊन जाणार असेल तर त्याच्यावर संस्कार आहेत की नाहीत? संस्कार म्हणजे फक्त बाह्यवर्तन, प्रत्येक गोष्टीचं अवडंबर की माणुसकी म्हणजे संस्कार? की माणुसकी हा संस्कारातला फक्त एक प्रकार?

            खोटं बोलू नये हा संस्कार, पण प्रत्येकाला आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टींसाठी खोटं बोलावंच लागतं, मग काय उपयोग या संस्काराचा? मोठ्यांचा आदर करावा, पण ती व्यक्ती आदर करण्यालायक नसेलच तर? अंगी नम्रपणा असावा, पण नम्र लोकांना भित्रे समजतात आजकाल! अरेला कारे बोलला नाही तर कसा तग धरेल? मग आधी उद्धटपणा करायचा आणि जर आयुष्यात काही चांगलं नाव कमावलं, प्रसिद्धी मिळाली तर नंतर नम्र व्हायचं? अजून कितीतरी गोष्टी ज्या आपल्यावर लहानपणापासून बिंबवल्या जातात, पण प्रत्यक्ष जगात तसं वागून चालतच नाही. चाणक्याने सांगितलंय, "सरळ झाडे आधी कापली जातात".

            संस्कार आपल्याला "माणूस" बनवतात. आणि आपल्यातला माणूस आपल्याला माहिती असेल तर इतरांनी आपल्या संस्कारांबद्दल काहीही बोलो, काय फरक पडतोय!


बुधवार, ११ एप्रिल, २०१२

खूप बोर होतं तेव्हा...

हल्ली उन्हाळ्यात दुपारी जेवल्यानंतर जाम म्हणजे जाम झोप येते. मग ऑफिसमध्ये असो वा घरी. असंच त्या दिवशी पण खूप झोप येत होती. प्रचंड फ्रीक्वेन्सीने जांभया येत होत्या. पण आम्हाला वाटलं आम्हाला बोरच होतंय. १०-१२ जांभया दोघींच्याही झाल्यावर मग शेवटी संवाद सुरु केला.

ती : मला खूप झोप येतेय.  |-)

मी: मला पण खूप झोप येतेय, कारण आधी मीच जांभई दिली ना...  :-P

ती: झोपेचा आणि जांभईचा  काही संबंध नसतो, जांभई ऑक्सिजन कमी पडल्याने येते. :s 

मी: मग तुला कशावरून झोप आलीये, तुलाही  ऑक्सिजन कमी पडत असेल.  :-\

ती: नाही मला झोप आलीये, तुला ऑक्सिजन कमी पडतोय. :-) 

मी: हम्म, बॉसला सांगायला पाहिजे, तुमच्या हापिसात ऑक्सिजन कमी पडतोय. इथे वर ऑक्सिजन मास्क्स ठेवा, जो ऑक्सिजन कमी पडला की खाली येईल, मग जांभया नाही येणार. :D

ती: गुड आयडिया, किंवा मग इथे छोट्या छोट्या रोपांच्या कुंड्या ठेवायला पाहिजेत टेबलच्या आजूबाजूला. म्हणजे पुरेसा ऑक्सिजन मिळेल. :-o

अजून एक जण तेवढ्यात आमचा "संवाद" ऐकायला आली होती, ती हसायलाच लागली अचानक. आणि म्हणे कुंडी म्हणजे काय माहितीये न... आम्ही : हो हो माहितीये, तुला तर तेच आठवतं कधीपण... ती लगेच गेली (आमच्यासारखी रिकामटेकडी नव्हती बहुतेक)

मी: हा पण कुंडीची आयडिया भारी आहे. मग आपण बाबा रामदेव सांगतात तसा प्राणायाम करून रोपाच्या जवळ जाऊन फक्त ऑक्सिजन घेऊ आणि कार्बन डाय  ऑक्साइड एका पिशवीत भरून बॉसच्या केबिनमध्ये सोडून येऊ...  :-#

दोघी: खी खी खी   :D  :D  :D

चला चहा आला... आता भरपूर ऑक्सिजन मिळेल....  8o|   <:o)

------------------------------------------

(कोण म्हणतंय तुम्हाला बोर झालं होतं तर आम्हाला कशाला बोर केलंस ते? मला बोर होत असताना सर्वांना ते वाटण्याचा मला पूर्ण हक्क आहे :-P  )