बुधवार, ८ जुलै, २०२६

मळभ


सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसाच्या रिमझिम धारा, टपोरे थेंब, हिरवाई, इंद्रधनू, वाफाळणारा चहा - कॉफी, पावसाळी भटकंती सगळं सगळं आपल्याला हवंहवंसं असतं. पाऊस सर्वांनाच हवाहवासा वाटतो पण मळभ कोणालाच नको असतं. पाऊस म्हणजे सृजन पण मळभ म्हणजे नकारात्मकता. मळभ म्हणजे अंधार. मळभ म्हणजे नैराश्य. मळभ म्हणजे नकोशी गोष्ट. मन अंधारून आलं तरी त्याला मळभाची उपमा देतात. 

जेव्हा चाळीस-पंचेचाळीस तापमानातला सूर्य कोपलेला असतो, अंगाची लाही लाही होऊन निघालेली असते आणि उन्हाळा त्याच्या संपण्याच्या मार्गावर असतो, तेव्हा मात्र याच काळ्या ढगांची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. पण आपण चुकूनही असं म्हणत नाही की आम्ही मळभ येण्याची वाट पाहतोय. आपण पाऊस येण्याची वाट पाहत असतो. कसं असतं ना, आपल्या सर्वांना सुख हवं असतं पण ते येण्यासाठी काहीतरी तडजोड करावी लागणारच ना. पावसाची वाट पाहताना मळभही येणारच हे आपण सोयीस्कररीत्या विसरून जातो.

प्रत्येक काळ्या ढगाला सोनेरी किनार असते म्हणतात. उन्हाच्या काहिलीमध्ये तो काळा ढग बरसला तरच त्या सोनेरी किनारीचं लख्ख प्रकाशात होणारं रूपांतर आपल्याला हवंहवंसं वाटतं, तो जर पुढे निघून गेला तर मिळणारा प्रकाश हे सुख वाटत नाही. सुखाचा पाऊसही हवाय आणि लख्ख प्रकाशही हवाय तर थोडं मळभ सहन करावंच लागणार. इप्सित साध्य करण्यासाठी लागणारे प्रयत्न आणि कष्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मळभच असतात. फक्त ते मळभ सहन करण्याची शक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे.

आपल्याला माहिती असतं की मळभ ही कधीच कायमस्वरूपी स्थिती नसते म्ह्णूनच आपण ते सहन करतो, जाण्याची वाट पाहतो. मनाचं मळभही एखाद्या नात्याबद्दल किंवा प्रसंगाबद्दल आपल्याला काहीतरी शिकवूनच जातं. आयुष्यातही कठीण प्रसंग आले की मळभ समजून ते जाण्याची वाट पाहायची. कारण मळभ कधीच रित्या हाती जात नाही, ते नेहमी सुखाच्या धारा बरसवूनच जातं. फक्त मळभ दूर होणं महत्त्वाचं!

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

मंगळवार, ७ जुलै, २०२६

सवंग

आपल्या वाट्याला सुख आलेलं असू देत वा दुःख, आपल्याला नेहमी ते कोणाबरोबर तरी वाटून घ्यायचं असतं. सुख आपल्याला भरपूर लोकांसोबत वाटून घेण्याची इच्छा असते, तर दुःख जवळच्या वाटणाऱ्या लोकांबरोबर आपण हलकं करू शकतो. कुठे कोडकौतुक झालं तरी कधी एकदा जगाला सांगतोय असं वाटतं. आणि जगाला सांगण्यासाठी हल्ली तर भरपूर व्यासपीठे उपलब्ध आहेत. व्यक्त होणं माणसासाठी किती महत्त्वाचं आहे.

पूर्वी असं म्हणायचे की सुख जगाला सांगावं आणि दुःख आपल्यापुरतं ठेवावं. पण हल्ली जग असं बदलतंय की दुःखाचा बाजार मांडला की भरपूर सहानुभूती मिळून पैसे प्रसिद्धीही मिळते. रिऍलिटी शोमध्ये पूर्वी गुणवत्ता वगैरे बघत, निदान आपल्याला प्रेक्षकांना तरी तसं वाटे. पण मध्यंतरी एक कल असा सुरु झाला की सहभागी प्रतिस्पर्धी किती दुर्दैवी, किती कमनशिबी. मग प्रेक्षकांच्या मतदानामध्ये साहजिकच त्यांना सहानुभूतीने भरपूर मते मिळत.  एखादी कला ही निव्वळ कला म्हणून सादर करा ना, त्यातून ठरू देत कोण सर्वोत्कृष्ठ आहे ते. अजूनही हा कल  चालू आहे का ते रिऍलिटी शो पाहणे बंद केल्याने काही कल्पना नाही.

आपण दु:खी असणे ही अशी मिरवण्याची गोष्ट आहे का? मी दुःखी आहे ही खरं तर माझी दुर्बलता आहे, त्यामध्ये मिरवण्यापेक्षा लाज जास्त वाटली पाहिजे की आपण परिस्थितीवर मात करू शकत नाही. त्या परिस्थितीवर एकदा मात केली की मग जगाला ओरडून सांगा तुम्ही नक्कीच की तुम्ही यशस्वी कसे झालात. त्याने शेकडो अशा परिस्थितीतल्या होतकरू लोकांना प्रेरणा मिळेल. पण दुःखाचा बाजार मांडण्यात काय पुरुषार्थ आहे? तीच गोष्ट जे करू नये ते करून बघा आम्ही कसे बिनधास्त आहोत हे दाखवणे, संस्कारांची राखरांगोळी केली, टिंगल उडवली की सोशल मीडियामध्ये अजून जास्त प्रसिद्धी.

माणूस हा शक्य तितक्या सोप्या मार्गाने सर्व गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. मग पुरुषार्थ गाजवण्यापेक्षा सहानुभूती मिळवणे नक्कीच सोपे आहे ना. कष्टाने नाव कमावण्यापेक्षा सवंग प्रसिद्धी नक्कीच सोपी आहे. लहानपणी ज्या गोष्टी मूल्ये म्हणून शिकलो त्याच्या सगळं विरुद्ध सध्या पाहायला मिळते. माणसाची जडणघडण अशी झाली पाहिजे की मला काहीही करून परिस्थिती बदलायची आहे. पण तो हे बघत आला की स्वतः काही करण्यापेक्षा रडे राहून, जे करू नये ते करून सर्व साध्य आहे तर का कोणी कष्टाच्या मागे लागेल.

अशा बदलत्या संस्कारांमध्ये, बदलत्या जगरहाटीमध्ये मला खात्री आहे की आजही लाचारीचा मार्ग न अवलंबता स्वतःला सिद्ध करणारी माणसे नक्कीच असतील. आज आहेतच पण उद्याही असतील. सोप्या मार्गांमधला फोलपणा लवकरच लोकांच्या लक्षात येईल. जग आहे म्हटल्यावर त्यामध्ये नानाविध प्रकारचे स्वभाव असणारच. आपण कोणाला प्रसिद्धी देतो आणि त्यातून कोणता कल स्थापित करतो ते आपल्या हाती आहे.  

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

सोमवार, ६ जुलै, २०२६

संकुचित

संकुचित मनोवृत्ती म्हणजे काय असते? डबक्यातले विचार वगैरे ठीकच पण रोजच्या आयुष्यात समजा मला कोणी काही अप्रिय बोललं, तर मी ते जे बोलले त्यामध्ये तथ्य आहे का, आणि त्यानुसार स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणणे शक्य आहे का याचा विचार करण्यापेक्षा सर्वांत पहिली प्रतिक्रिया असते ती म्हणजे मला कसे काय हे बोलतात. दुसरं एक उदाहरण म्हणजे चुका होतात, गैरसमज होतात पण ते दुसऱ्यांनी मुद्दामच केले अशी धारणा ठेवणे. एखाद्या व्यक्तीचा तसा वारंवार अनुभव आला तर गोष्ट वेगळी आहे, पण अशा व्यक्तीकडूनही नेहमीच मुद्दाम केलं जात नसेल ना.

तर माझीसुद्धा अशीच संकुचित मनोवृत्तीच होती पूर्वी. मी काही लहान नव्हते, पण सज्ञान कोणाला म्हणावं हे अठरा या वयावरून ठरण्याइतकं सोपं नक्कीच नाही. मानसिकरीत्या तर नाहीच नाही. तर मी सुद्धा काही लहान नव्हते पण संकुचित होते. कोणी एखादा शब्द अप्रिय बोलला की मला असे कसे म्हणाले, आणि असं का झालं याचं आत्मपरीक्षण करण्यापेक्षा सबबी देत बसणे यामध्ये धन्यता वाटायची. जणू आपलं कधी काही चुकतच नाही असाच नेहमी अविर्भाव असायचा. कोणी बोलल्यावरच कशाला, कधी कुठे आलेल्या अपयशाला सुद्धा सबबीच पुढे असायच्या.

मग आयुष्याच्या एका सुंदर वळणावर तो भेटला. त्याला कोणी काही बोललं, कुठे काही चुकलं की तो आधी त्याच्याकडून काय करता आलं असतं याचा विचार करायचा. मी कधी म्हणाले ते तुला असं असं म्हणाले तर न चिडता ठीक आहे, त्यातला एवढा भाग तर खरा आहे ना असं म्हणून शांत असायचा. कोणत्याही अपमानाला अपयशाला त्याची विक्षिप्त प्रतिक्रिया कधीच नसायची. भले कोणी मुद्दाम त्याच्याशी चुकीचं वागलेलं असू देत. पण त्यातून तो ते माझ्याशी असे वागलेपेक्षा त्यांच्याकडून असं का झालं असावं अशा दृष्टीने विचार करायचा. आणि असं असतानाही लोकांना अशा स्वभावाचा गैरफायदा घेऊ द्यायचा नाही. पण त्यामुळे त्याचं आयुष्य किती सोपं, सुटसुटीत आणि सुंदर आहे हे मला उमगत गेलं.

माझा पटकन प्रतिक्रिया देणारा स्वभावदेखील मग हळू हळू बदलत गेला. ज्यांना मुद्दाम वागायचं ते त्यांच्यापाशी. आपण त्यातून त्यांची काय अगतिकता असेल म्हणून ते असे वागले असतील हाच विचार करायचा. गैरसमज असतील तर आपण म्हणतो माझीच बाजू खरी ते ठीके, पण दुसऱ्याचीही काही बाजू असेलच, ती काय असेल ते पण बघू, समजावून घेऊ असा बदल होत गेला. त्याचा मला आयुष्यात सगळीकडेच फायदा होतो. कुटुंबातील सगळ्या व्यक्तींमध्ये वावरताना, ऑफिसातील लोकांमध्ये काम करताना, मैत्रीमध्ये आणि सगळीकडेच. राग येतच नाही असं नाही. पण तो धुमसत राहण्यापेक्षा शांत होत जातो. स्पष्ट बोलल्याने गैरसमज दूर होत जातात. 

एखाद्याच्या सहवासाने आपलं आयुष्य बदलते असं म्हणतात ना. अशी आपलं आयुष्य सुंदर करणारी माणसं माझ्याप्रमाणेच सर्वांना त्यांच्या आयुष्यात लाभू देत हीच देवाकडे प्रार्थना!

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६