आपल्याला आयुष्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटतात. त्यातली काही अशी असतात की मी म्हणजे कोणीतरी आहे. माझे सर्वांनी लाड करा. मला सर्वांनी महत्त्व द्या. माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. काही जण प्रसिद्ध व्यक्ती वगैरे झाल्यावर असे होऊ शकतात, तर काहीजण काहीही कुवत नसतानाही असे असतात. ज्यांना असं घेणं माहिती असतं त्यांना अवतीभवती माणसेही अशीच भेटतात जी त्यांना देतच जातात. स्वतःचे लाड, हट्ट पुरवून घेणं छान जमतं त्यांना. शिवाय केलेल्या छोटाशा गोष्टीचे श्रेय घेणेही छान जमते त्यांना.
पूर्वतरंग
रविवार, ५ जुलै, २०२६
रुबाब
अशी व्यक्ती जर प्रसिद्धीच्या झोतात आली, तर ती स्वतःचा रुबाब अगदी छान मिरवू शकते. मिळणारा मानमरातब आपला हक्कच आहे अशीच धारणा तिथे दिसते. त्यांना नेम - फेम मिळालं की स्वतःचं महत्त्व अधिकच चांगल्या रीतीने अधोरेखित करता येतं. त्यांचा जन्मच राजा म्हणून जगण्यासाठी झालेला असतो. राजासारखेच कोणी मागितली तर मदतीलाही पुढे असतात पण त्यामध्ये मला मी केलेल्या मदतीचे पूर्ण श्रेय द्या ही भावना असते. आणि जरी ही व्यक्ती सामान्य माणूस म्हणूनच राहिली तरीदेखील ती राजा म्हणूनच जगते, स्वतःचं मन वगैरे मारून जगत नाही. रुबाब करण्यासाठी माणसाने श्रीमंत किंवा प्रसिद्धच असावं असं काही नाही, ते ज्यांना जमतं त्यांनाच जमतं.
याविरुद्ध असे काही असतात की यांच्यासाठी कोणी काही साधी गोष्ट जरी केली तरी त्यांना ती खूप मोठी वाटते, कोणी काही साधीशीच मदत केली असेल, तेही सहज शक्य होतं म्हणून तर त्याचे यांना फार मोठे उपकार वाटतात. स्वतःहून कोणाला काही काम सांगणं तर लांबच राहिलं, कोणी स्वतःहून यांचं काम करत असेल तरी त्यांना अवघडल्यासारखं वाटतं. मी म्हणजे कोण यत्किंचित प्राणी, माझ्यासाठी कशाला कोणी काही करेल, आणि करत असेल तरी माझ्यासाठी कोणी काही करूच नये. हट्ट आणि लाड हे शब्दही त्यांच्या गावी नसतात.
आता अशी व्यक्ती जर प्रसिद्ध नामांकित कोणी झाली तर पहिल्यांदा त्यांना स्वतःलाच विश्वास नसतो की लोक आपल्याला इतकं ओळखतात आणि इतकं मानतात. कोणी केलेला आदरसत्कार घेणं देखील त्यांना अवघडलेपणाचंच वाटतं. का माझ्यासाठी इतकं करतात, मी कोणी नाही असे काहीसे भाव दिसतात. रुबाब आणि मिरवून घेणं असलं काही यांना जमत नसतं. नेम - फेम मिळूनही हे साधे ते साधेच राहतात. मग लोक त्यांना डाऊन-टू-अर्थ वगैरे म्हणतात. आणि काहीजण प्रसिद्ध नाही झाले तरी ते सर्वांसाठी करतच जातात, तेही कसल्याही श्रेयाची अपेक्षा न करता.
आपण मात्र प्रसंगानुरूप या दोघांच्या मध्ये कुठेतरी असतो. कधीतरी सगळ्यांनी कौतुक केलेलं आपल्याला आवडतं, कधीतरी आपणही कोणाला न मागता काही मदत करतो. कधी कोणासमोर आपण रुबाबाने वागतो तर कधी एकदम साधे होऊन जातो. तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहिलीत का अशी दोन टोकाची माणसे? किंवा तुम्ही स्वतः आहात का यापैकी एक? पहिला झाला राजा प्रकारचा माणूस. राजाच्या विरुद्धार्थी नेहमी रंक असेल असं काही नाही. आता यातल्या दुसऱ्या प्रकारच्या देतच जाणाऱ्या आणि तरीही राजा नसणाऱ्या माणसांना काय नाव द्यायचं?
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६
शनिवार, ४ जुलै, २०२६
लहर
तुम्ही लहरी व्यक्ती आहात की अगदी शिस्तशीर आणि कर्तव्यदक्ष आहात? मी तर अगदीच लहरी असल्याने कर्तव्यदक्ष लोकांबाबत मला खूपच आदर आहे. अगदी मनाचा चंग बांधून वगैरे फार कमीच गोष्टी होतात माझ्याच्याने. किंवा मग आता अगदी आणीबाणीची परिस्थिती आहे तेव्हाच लहर पळून जाते. आणि एखादं काम जेव्हा करण्याची लहर येते तेव्हा मात्र मी एवढं त्याच्या हात धुवून मागे लागेन की तसं काम कधी कोणी केलंच नसेल. शाळेत अभ्यासही असाच लहर असेल तेव्हा केला, पण परीक्षा आली की मग मात्र त्या विषयाच्या हात धुवून मागे. पण या आयत्या वेळी ताण घेण्याच्या सवयीमुळे होतं काय की अजूनही अधून मधून अशी स्वप्नं पडतात की उद्या वेगळाच पेपर आहे आणि मी वेगळाच अभ्यास केलाय. किंवा परीक्षा एका केंद्रावर आहे आणि मी भलत्याच केंद्रावर, आणि मग नंतर स्वप्नच आहे समजलं आणि आता नाही बाबा कोणती परीक्षा द्यायचीये असं लक्षात आलं की हायसं वाटतं.
लहर हे खरं तर स्वच्छंदी असण्याचं लक्षण आहे. समुद्राच्या लाटांना उगीच का लहरी म्हणतात. त्या त्यांना हव्या तशा येतात आणि त्यांना हव्या तशा जातात. पण त्यानेच समुद्राचं सौंदर्य आहे ना. कल्पना करा की प्रत्येक लाट अगदी शिस्तीने पुढे येतेय, एवढे मीटर अंतर ठेवून, ताशी एवढ्याच गतीने वगैरे, तर आपल्याला समुद्रावर फिरण्याची मजा घेता येईल का. एखाद्या छानशा फुलझाडाला रोज एकाच आकाराचं फूल येत नसतं ना. ऋतूसुद्धा वर्षभरात त्याच्या तीन वेगवेगळ्या लहरी आपल्याला दाखवतो. सूर्याचा रोज पसरणारा संधिप्रकाश रोज वेगवेगळा भासतो, आकाशातल्या प्रत्येक नभाचा आकार वेगवेगळा असतो. एवढंच का देव कुठे आपल्या प्रत्येक माणसाला एकसारखं बनवतो. निसर्गामध्येच इतकी लहर आहे, तर माणसाने तरी इतकी शिस्त आणायची कुठून. जो माणूस निसर्गाला जवळचं मानत असेल तो लहरीच असणार.
पण हे असं लहरी असण्याचे खूप तोटे आहेत. तुमच्याइतकीच कुवत असलेली पण जास्त शिस्त असलेली माणसं तुमच्या खूप पुढे निघून जातात. कारण ते लहरीला नाही तर कर्तव्याला महत्त्व देतात. लहानपणी आजीने एखादं काम सांगितलं आणि मी म्हटलं की मूड नाहीये किंवा बोअर झालंय की ती ओरडायची. कसला तुमचा मूड आणि कसला तुमचा बोअर, आमच्या वेळी नव्हतं असलं काही. पण जसजसं वय वाढत जातं, जबाबदाऱ्या येत जातात, तशी लहरीला मुरड घालावीच लागते. कदाचित सगळं जग जिंकण्याइतके नाही आपण पुढे जाणार पण स्वतःचं कुटुंब आणि त्यांचा जिव्हाळा जिंकण्याइतकी शिस्त स्वतःला लावावीच लागते. लहर आणि शिस्तीचा तराजू सांभाळत स्वतःला पुढे न्यावं लागतं.
मनाला लहरच जवळची वाटते पण हेच मन देवाने इतर प्राण्यांपेक्षा जास्तीचं दिलंय माणसाला देवाने. इतर निसर्ग आणि प्राणी लहरी असतात, पण ही लहर आहे हे समजणारं मनच त्यांच्याकडे नसतं. या लहरी मनाला आवरण्यासाठी मग साधूसंतांना अभंग ओव्या रचाव्या लागतात, रामदास स्वामींना मनाचे श्लोक लिहावे लागतात. आणि आपल्यालाही आपली लहर संधी मिळेल तशीच सांभाळावी लागते. मग होते सवय हळू हळू आणि उमगून जातं की उनाड दिवस एखादाच असू शकतो, रोज रोज नाही.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६
शुक्रवार, ३ जुलै, २०२६
क्षण
वार्षिक परीक्षा संपून उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या होत्या. सुट्ट्यांमधला नेहमीचा कार्यक्
रोज काही ना काही नवीन बघणं आणि नवीन जगणं. गावी लोडशेडींग तर नित्याचंच. दिवे कधी आले आणि कधी गेले हे समजायचं देखील नाही. खरं तर आजीआजोबांचा दिनक्रमच असा असायचा की दिवे आहेत वा नाहीत काही फरकच पडायचा नाही. एकतर उन्हाळ्यातला मोठा दिवस, पहाटेच उजाडायचं ते अगदी संध्याकाळी सातपर्यंतदेखील काळोख झालेला नसायचा. त्यात तिकडे संध्याकाळी सात-साडेसातलाच रात्रीची जेवणं करून घेण्याची पद्धत. मग बरोबर साडेआठ-नऊ पर्यंत डोळे झाकले जायचे आणि पहाटे पहाटेच जाग यायची. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे सगळं आपल्या गावी किंवा आजोळी अनुभवलंच असेल, खरं तर नवीन काहीच नाही यामध्ये.
पण काही असे खास क्षण आहेत, जे पुन्हा मिळावेत म्हणून जीव चातक झालाय. गावी आम्ही मुलं सगळी अंगणातच झोपायचो. एकदा अशीच मध्यरात्री कशाने माहिती नाही जाग आली. सामसूम तर खूप लवकरच होत असे पण नाही म्हणायला रातकिड्यांचे आवाज तेवढे किरकिरत होते चांगलेच. आणि असंच कुशीवर वळताना वर आकाशात नजर गेली. आणि मन स्तब्ध झालं एकदम, इतका लखलखता चांदणथवा मी आयुष्यात कधी पाहिला नव्हता. जिकडे नजर जाईल तिकडे लहानमोठ्या चांदण्यांचे असंख्य थवे. लहानमोठे काही पुंजके, काही एकदम एकमेकांना बिलगून बसल्यासारखे, काही लंबगोलाकार आकारात एकमेकांशी हितगुज करत असल्यासारखे किती पाहू आणि कुठे पाहू असं झालेलं. अमावस्येची रात्र असावी बहुतेक. चंद्र नसल्याने काळ्या पटलावर चांदण्या जास्तच लखलखत होत्या. अशी रोषणाई मी कधीच पाहिली नव्हती, चित्रातदेखील नाही, आणि प्रत्यक्षात त्या नंतर देखील नाही. आणि आधी जे आवाज रातकिड्यांचे म्हणून ऐकले ते आता त्या चांदण्यांचेच असल्यासारखे भासू लागले. ते नयनरम्य आकाश डोळ्यात सामावून घेत, पहाट होत आली आणि एक एक लहान लहान थवे नाहीसे होऊ लागले तेव्हाच पुन्हा डोळा लागला.
एकदा सुट्टयांमध्ये गावी असंच थोड्या गावाबाहेरच्या राममंदिरामध्ये गेलो होतो. मुलंमुलंच गेलो असल्याने वेळेचं भानच राहिलं नाही, नाहीतर आजी बरोबर असली की बरोबर तिन्हीसांजा होण्याच्या आत घरी पोहोचू असं आम्हाला पिटाळत असे. आणि सूर्य जरा दिसेनासाच झालाय असं लक्षात आल्यावर आम्ही झपझप घरी जायला निघालो. आणि थोडं टेकडीपलीकडे लक्ष गेलं तर काय, पूर्वेला टेकडीमागे हे एवढा मोठ्या भाकरीसारखा चंद्राचा गोल दिसत होता. तसा अजून सूर्य जाऊन अंधारही झाला नव्हता आणि हे चंद्राचं गुलाबी लोभसवाणं रूप समोर दिसत होतं. अमावस्येच्या रात्री जे आभाळभर चांदणं पाहीलं होतं ते सगळंच्या सगळं जणू या पौर्णिमेच्या चंद्रामध्ये एकवटलं होतं. त्याकडे पाहत पाहतच घरी पोहोचलो. तो तसा पौर्णिमेचा चंद्र ठरवून क्षितिजावर गेलं तरी आजवर कधी दिसला असं वाटलंच नाही.
गावाच्या आठवणी या दोन दिवसांनी, एक अमावस्या आणि एक पौर्णिमा यांनी अविस्मरणीय झाल्या आहेत. इतकंच का, पण तसंच दृश्य दिसलं ना तरी तो विलक्षण अनुभव परत कधी मिळाला असं वाटलंच नाही कधी. अवचित मिळणाऱ्या सुखाची सर ठरवून मिळवलेल्या सुखामध्ये नसते ना. असा असतो एक एक क्षण की तोच क्षण पुन्हा कधीच मिळत नाही.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)