शुक्रवार, १७ जुलै, २०२६

व्यक्त


मी, माझे, मला सर्वप्रथम आणि बाकीचे सगळे माझ्यानंतर अशी कोणाची वृत्ती दिसली तर त्यांना आपण स्वार्थी म्हणतो. पण खरं बघायचं तर सगळीकडे सगळेजण असाच विचार करताना दिसतात. अगदी विरळ प्रमाणात दुसऱ्यांचा विचार आधी करतात असे काहीजण दिसतात. पण अशा लोकांना त्रासच जास्त होताना दिसतो. स्वार्थी असलं की त्रास कमी असतो, त्यामुळे खरं तर स्वार्थी असणं हे कोणाच्याही सोयीचं आहे. स्वार्थी माणसाला कधीच मनाला मुरड घालावी लागत नाही, आणि कोणालाही मनाप्रमाणे वागायला मिळालं की तणावही कमी असतो.

मला वैयक्तिकरित्या कोणालाच नाही म्हणता येत नाही. आता हा अवगुण समजला जातो, पण आमच्यावर संस्कार झाले तेव्हा शक्य तेवढी आपण इतरांना मदत करावी असेच संस्कार झाले. त्याही पुढे जाऊन जर आपल्या आवाक्यात नसेल आणि कोणाला नाही म्हणावं लागलं तर त्याचा चक्क अपराधगंड येतो. आजूबाजूला कोणाला फटकन काहीही बोलणारी माणसं दिसतात, पण मी मात्र कोणाला लागेल असं बोलू शकत नाही. आणि समजा अगदी ठरवून बोललंच कधी तर जे सहज इतरांना बोलतात आणि विसरून जातात तसं होत नाही. आपण असं उगीच बोललो का, थोडं सौम्य काही म्हणायला हवं होतं का, त्याला/तिला काय वाटलं असेल असलंच कितीही वेळ वाटत राहतं.

काय म्हणावं या स्वभावाला, फटकन बोलून मोकळे होणाऱ्या लोकांमध्ये मनामध्ये काही साचून तणाव निर्माण होत नसावेत, पण असे अनेक जण असतात की ते बोलू न शकल्याने मनामध्ये गोष्टी साचून ताण घेतात किंवा कधी बोलून मोकळे झालेच तर आपण असे का बोललो याचाही ताण घेतात, म्हणजे मानसिक ताणापासून बोलून काय किंवा न बोलून काय सुटका नाहीच. राशींप्रमाणे माणसाचे तसे तसे स्वभाव आणि भोग असतात म्हणतात, ते ढोबळमानाने नक्कीच खरं असावं. नाहीतर जगात सगळी माणसे एकसारखीच भांडकुदळ किंवा एकसारखीच शांत नक्कीच दिसली असती.

कोणाला काही बोलू न शकणाऱ्या किंवा मदतही जमली नाही म्हणून वाईट वाटून घेणाऱ्या लोकांमध्ये मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, माझी प्रतिमा सगळ्यांपुढे एक चांगला माणूस म्हणून उभी रहावी ही अपेक्षा असेल का, की एखाद्याला खरंच मनापासून कोणालाच दुखवायला आवडत नसेल? मग आपल्याला कोणी चांगलं म्हणो अथवा वाईट? अंतर्मुख लोकांना कोणाला काही बोलण्यापेक्षा न बोलणं जास्त सोयीचं वाटतं. मुळात बोलण्याचेच कष्ट वाटतात. मग हळू हळू ते कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटणं, कोणी वाईट वागलं तर त्याला ते बोलूनच दाखवणं यापेक्षा बोलण्याचे कष्ट न घेणं जास्त पसंत करतात, आणि त्याचा ताणही घेणं सवयीने कमी होत जात असेल.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

गुरुवार, १६ जुलै, २०२६

अस्तित्व


एखाद्याचं अस्तित्व आपल्याला मुख्यत्वे त्याच्या दिसण्यामुळे कळून येतं. डोळ्यांचा मुख्य सहभाग असतो. एखादी अदृश्य गोष्ट अस्तित्वात आहे हे मान्य करणं अवघडच जातं. तरी काही गोष्टी अशा असतात की त्या न दिसूनही त्यांचं अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागतं. ध्वनी-कान, सुगंध-नाक, हवा-त्वचा, आणि चव-रसना या डोळे आणि इतर पंचेंद्रियांना जे जे काही जाणवेल ते सगळं अस्तित्वात असतंच. एखादी व्यक्तीचा आवाज येतो, काही गोष्टींचा ठराविक वास येतो त्याने ती गोष्ट जवळपास असेल असे वाटते, कोणी मागून पाठीवर थाप मारली की कोणीतरी आहे हा संदेश मेंदूला जातो. आणि पदार्थांच्या अस्तित्वाला चव असेल तरच अर्थ आहे. 

आपल्या अस्तित्वाची लोकांनी दखल घ्यावी असं सर्वांनाच वाटतं. ऑफिसमध्ये दोन सहकर्मचारी एकमेकांसमोर आले की एकमेकांना हाय-हॅलो करतात, वरिष्ठांना अभिवादन करतात. ही त्यांनी एकमेकांच्या अस्तित्वाची घेतलेली दखल असते. आपल्या कुटुंबात आपल्या अस्तित्वाची सगळेच दखल घेतात. शाळा कॉलेजात ठराविक मित्र-मंडळी दखल घेतात, जर तुम्ही खूप हुशार किंवा काही स्पर्धांमध्ये भाग घेऊन शाळेचं नाव उंचावणाऱ्यांपैकी असाल तर थोडे अजून सहाध्यायी आणि शिक्षकही तुमची दखल घेतात. आणि जर तुम्ही कोणी सेलेब्रिटी झालात तर अनोळखी ठिकाणी जाऊनही जास्तीत जास्त लोक तुमची दखल घेतात. कधी कधी माणसाला हे अति अस्तित्व पण नकोसं होतं, मग ते निर्जन किंवा अनोळखी ठिकाणी जाणं पसंत करतात.

अस् म्हणजे असणे, अस्ति म्हणजे आहे, आणि त्व हा त्याला लागलेला प्रत्यय. एखाद्या गोष्टीची उपस्थिती किंवा फक्त असणे. पण त्या काही गोष्टींच्या आणि काही व्यक्तींच्या नुसत्या असण्याने एखाद्याच्या आयुष्यात खूप फरक पडत असतो. तू आहेस ही भावनाच खूप सुखद असते. कधी कधी काही गोष्टींना आणि माणसांना आपण इतकं गृहीत धरलेलं असतं की त्यांच्या अस्तित्वाची आपल्याला दखलही नसते. किंवा आपल्याला काही जणांनी इतकं गृहीत धरलेलं असतं की काहींना आपल्या अस्तित्वाची जाणीव नसते.

एखादी घरातली व्यक्ती मृत पावली तरी त्यांच्या वस्तूंमधून किंवा नेहमी उठण्याबसण्याच्या जागांवरून त्यांचं अस्तित्व नंतरही बराच काळ आपल्याला जाणवत राहतं. एखादा असा गोतावळाही असतो की आपल्या अस्तित्वाची तिथे कोणी दखल घेत नाही, मग हळू हळू आपणच आपलं अस्तित्व तिथून कमी करू लागतो. पण ही खरं तर पळवाट आहे. जिथे आपल्या अस्तित्वाची दखल घेतली जात नाही तिथून अस्तित्व कमी करण्यापेक्षा त्यांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडणं जास्त जिद्दीचं ठरेल.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६


बुधवार, १५ जुलै, २०२६

राहणी


प्रत्येकाचं एक ठरलेलं राहणीमान असते, जे कालांतराने बदलत पण जाते. कधी राहणीमान समाज, भौगोलिक प्रदेश, पंथ, संप्रदाय याप्रमाणेदेखील बदलत जाते. आणि सर्वात मुख्य म्हणजे आर्थिक स्तर. आर्थिक स्तराप्रमाणेही राहणीमान बदलत जाते. पेहराव बदलत जातो. आपल्या मराठी मनाने नेहमीच "साधी राहणी, उच्च विचारसरणी" यावर विश्वास ठेवलेला आहे. आपल्याला शिकवलंच असं जातं की नीटनेटकं, स्वच्छ राहावं पण साधंच राहावं. संत चोखामेळा यांनीही म्हणून ठेवलंय "का रे भुललासी वरलिया रंगा"!

यामागे असा विचार नक्कीच असेल की पैसा आज आहे उद्या नाही, महागड्या जीवनशैलीची सवय लावून घेऊन उद्या दिवाळखोरीची पाळी आली तरी कर्जबाजारी न होता तग धरून राहता आलं पाहिजे. आपण मराठी माणसं तशी मध्यमवर्गीयच. आहे त्यात समाधान मानून घेणे वगैरे आपल्या रक्तातच असते. सवय म्हणून हे खरंच चांगलं आहे, त्याने भरपूर व्याप कमी होतात, सुखाने राहता येते. पण काहीजण असे असतात की ज्यांची स्वप्नं मोठी असतात.

एकतर आता आपण ग्लोबल झालो आहोत, पूर्ण जगाशी आपला संपर्क येतो. त्यामुळे कोणाचीही समोरच्यावर पहिली छाप पडते ती दिसण्यातून पडते, पेहरावातून पडते. त्यामुळे ज्या त्या क्षेत्राला साजेसा पेहराव करणे ही आजची चैन नसून गरज आहे. वरल्या रंगालाच भुलण्याचा जमाना आहे. एकदा आपण कोणीतरी बनलो की मग मात्र आपण स्वतः काही कल स्थापित करू शकतो. आजही पहा, श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांमध्ये भरपूर मराठी माणसे दिसतील, पण जग त्यांना किती साधा माणूस असं म्हणूनच ओळखतात.  

या साध्या संस्कारांमुळे पाय जमिनीवर ठेवून राहणं मराठी माणसाला छान जमतं. साधा माणूस असतो तो कशाचाही बडेजाव, ढोंग करत नाही. पण यामुळे कदाचित थोडी महत्त्वाकांक्षा कमीदेखील पडते. आपल्याला एवढं पुरतंय तेवढं बास झालं हीच वृत्ती तयार होणं साहजिक आहे. स्वतःची जाहिरातबाजी कमी पडते. यामध्ये छक्के-पंजे वाले पुढे निघून जातात. आणि साध्या माणसाचं मात्र कौशल्य मागे पडून साधा म्हणूनच कौतुक होत राहतं.

जग बदलतंय तसं होतं काय आहे, की गरजेपुरतं ऐटीत पॉश राहाणं तर ठीक आहे, पण समारंभ भलतेच विनाकारण महागडे होत चालले आहेत. तिकडे दिखावा करावा अशी गरज साध्या साध्या लोकांनाही पडू लागली आहे, त्यासाठी लोकं कर्जबाजारीही होत आहेत. त्या बाबतीत मात्र मी "साधी राहणी, उच्च विचारसरणी" याचाच पुरस्कार करेन. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६