गुरुवार, ३० जुलै, २०२६

षड्रिपु-मोह

मोह आणि लोभ हे एकच वाटू शकतात पण तसे नाही. मोह हा क्षणिक देखील असू शकतो पण लोभ हा स्वभावाचाच एक भाग बनून जातो. मोहासाठी एक क्षण पुरतो म्हणतात, पण तो एकच क्षण इतका भयानक असू शकतो की आयुष्यभराचं नुकसान करू शकतो. रस्त्यावर पडलेली मौल्यवान वस्तू उचलावी की उचलू नये, उचलली तर कोणाची आहे शोधून ज्याची त्याला परत द्यावी की आपल्याजवळच ठेवण्याचा मोह बाळगावा. यामध्ये मोह सारासार विवेकबुद्धीवर भारी पडू शकतो.

मोह एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या क्षणी एखाद्या प्रकारे वागण्याचाच असेल असं नाही. मोह हा नात्यांचादेखील असतो. कधीकधी आपल्या मोहपाशाने आपण आपल्या जवळच्या लोकांना मोकळं न सोडल्याने त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. वस्तू, वास्तू आणि माणसे यांपैकी कशाचाच मोह नाही असा निर्मोही माणूस सापडणे कठीण आहे. काहींना खाण्यावर नियंत्रण राहत नाही. आवडीचा पदार्थ समोर आला आणि पथ्यामुळे तो वर्ज्य असेल तरी तो खाण्याचा मोह बऱ्याच लोकांना आवरता येत नाही. त्यामुळेच काटेकोर पथ्य पाळणारी माणसे फार कमी दिसतात.

जर मनाचा निग्रह मोठा असेल तर माणूस मोहाला दूर सारू शकतो. मोह न होण्यामागे नैतिकता तर क्षणाची असते पण मनाचा निग्रह फार कठोर असावा लागतो. नाहीतर खरेदीला गेलं आणि काही घ्यायचं नसेल, आवश्यकता नसेल तरी आवडलं म्हणून घेणं, चटपटीत पदार्थ दिसले की त्यावर ताव मारणे या गोष्टींचा मोह आवरता आवरत नाही. मार्केटिंगवाले आपल्याला मोहात अडकवण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत असतात. व्यसनाधीन माणसाला रोज मनाचा निश्चय करूनही रोज व्यसनाचा मोह होतो. व्यसन हे मोहाचं चक्र आहे अशा चक्रातून बाहेर पडता न आल्यास मोह हा माणसाचा मोठा शत्रू होऊन जातो.

मोहापायी जमवलेल्या वस्तुंनी घरही अपुरं पडायला लागतं. एखादी वस्तू खूप जुनी झाली तरी त्याचाही मोह आपल्याला सुटत नाही, काहींमध्ये आपल्या आठवणी लपलेल्या असतात, तर काही येतील उपयोगी या मोहाने जमवून ठेवलेल्या असतात. कुठे चार दिवस बाहेर गेलो की बदल म्हणून बरे वाटते आणि परत मनाला घराची ओढ लागते, हा आपल्याला आपल्या घराबद्दल असलेला मोह असतो, त्या घरातल्या माणसांबद्दल असलेला मोह असतो. हौसेने प्राणी पाळले तर त्यांचाही लळा लागतो. हा कोणाचा लळा लागणेही मोहच आहे. थोड्या प्रमाणात मोह असणे वाईट नाही, पण मोहाने माणूस अंध होणे चुकीचे आहे. कोणतीही गोष्ट त्याज्य करायची वेळ आली तर तिचा मोह पटकन सोडता आला पाहिजे.

मोहवून टाकणाऱ्या अनेक गोष्टी अनेक प्रलोभने आपल्या सतत समोर येत असतात, पण क्षणभरच मोहरून जाऊन मोहामध्ये न अडकता स्वतःला त्या मोहजालातून वेळीच बाहेर काढणे ज्याला जमते तोच मोहावर विजय मिळवू शकतो. रामायणातही मोहाचा उत्तम वापर करून घेतलेला आहे, कैकेयीला पुत्रमोह आणि सीतामातेला सुवर्णमृगाचा मोह झाला नसता तर रामायण ना घडते!

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

बुधवार, २९ जुलै, २०२६

षड्रिपु-लोभ

लोभ म्हणजे अतिरिक्त मिळण्याचा हव्यास. आपल्याला हवं तेवढं अर्जित करूनही जास्तीत जास्त कसं मिळेल याचाच सतत विचार. एकदा का माणूस लोभामध्ये पडला की कोणतीच गोष्ट त्याला पुरेशी वाटत नाही. आणि लोभाचा विशेष म्हणजे कष्टाने मिळवण्यापेक्षा माणूस अनैतिक मार्गाने कमावण्याचा प्रयत्न करतो. कारण माणसाचा लोभ इतका वाढलेला असतो की नैतिक मार्गाने एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस जितकं कमावू शकतो तितकं त्याला पुरेसंच पडत नाही. आणि एकदा कोणतीही गोष्ट मिळवण्याचे चुकीचे पण सोपे मार्ग ठाऊक झाले की माणसाचा लोभ अधिकाधिक वाढत जातो.

सरकारी नोकरी किंवा राजकारण हे अनैतिक मार्गाने पैसा कमावण्याचे खात्रीचे मार्ग आहेत. हे सोडून इतर मार्गांमध्ये माणसाला थोडा तरी धोका आणि कष्ट जास्त असतात. पण जे त्या व्यवस्थेमध्ये नसतात त्यांनाच जास्त लोभ असतो, आणि म्हणून स्वतःच्या फायद्यासाठी असे लोकच व्यवस्थेला भ्रष्ट होण्यात मदत करतात. पेपर विकत घेणाराच कोणी नसेल तर पेपर कशाला लीक होईल? पण लोभाने माणूस भ्रष्टाचारी बनतो. मग देणारे आणि घेणारे दोन्ही प्रकारची माणसे तयार होताना दिसतात. पाच सहा हजार आय ए एस ऑफिसर्स मध्ये एकच तुकाराम मुंढे का असतात?

लहानपणी एक गोष्ट ऐकली होती, एका माणसाला देव वर देतो की या जमिनीवरून तू धावत जा आणि तेवढी जमीन तुझी होईल, आत फक्त एकच आहे की सूर्यास्त होईपर्यंत तू जिथून सुरुवात केलीस तिथे पुन्हा परतला पाहिजेस, नाहीतर तुला काहीच मिळणार नाही आणि तो माणूस लोभाने सूर्यास्त होईपर्यंत मी आता परत जाईन अजून एवढी जमीन मिळू देत नंतर परत जाईन असे करत मागे फिरतच नाही आणि सूर्यास्त होतो तेव्हा जिथे पोहोचतो तिथेच थकून जाऊन कोसळतो. दुसरी एक सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीची गोष्ट, माणूस सगळी अंडी एकदम मिळवण्यासाठी त्या कोंबडीलाच मारून टाकतो आणि त्याला ती कोंबडी मारून जाऊन त्याच्या हाती नंतर काहीच उरत नाही.

ऐकायला छान गोष्टी आहेत. पण बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात, तसं निरागस असू तोवरच या गोष्टींचं महत्त्व असतं. एकदा माणसाला भ्रष्ट वागून जास्त मोबदला मिळण्याची संधी मिळत असेल तर तो ती सोडत नाही. आपण बातम्या ऐकतो एवढ्या कोटींचा घोटाळा, अमक्याच्या घरी गाद्या, बाथरूमचे छत अशा ठिकाणांहून नोटांची बंडले सापडली वगैरे तर आपण डोळे विस्फारून ते पाहत राहतो, आणि आपल्या मध्यमवर्गीय मनात विचार येतो, अमुक एका मर्यादेनंतर यांना थांबावंसं का नसेल वाटलं? 

असं काय मोठं लागतं जगण्यासाठी? पण ते आपण मध्यमवर्गीयांना. तरी एवढे पैसे एका कुटुंबासाठी काय काय ऐषोआराम केला तर अपुरे पडतील हा विचार करण्याची तेवढी विचारांची उंचीच पोहोचत नाही. किती पिढ्यांसाठी कमावून ठेवलं तर त्यांना पुरेसं वाटत असेल याचा थांग लागत नाही. आणि जेव्हा एखाद्याच्या हितसंबंधांना धक्का लागत असेल तेव्हाच हे भ्रष्टाचार उघडकीस येतात. 

जोपर्यंत जग आहे तोवर हाही षड्रिपु लोभ राहणारच. काहींचा लोभीपणा उघडकीस येईल, काहींना त्यातल्या अनैतिकतेसाठी शिक्षा होईल, काहींचा उघडकीस येणार नाही. आपण मात्र प्रयत्न करू की कळावे लोभ असावा मधलाच लोभ फक्त आपल्या सोबत राहील.  

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६


मंगळवार, २८ जुलै, २०२६

षड्रिपु-काम

षड्रिपूंपैकी आणखी एक रिपु म्हणजे काम. काम म्हणजे वासना. अनिवार शारीरिक इच्छा किंवा कोणताही गोष्टीचा हव्यास. क्रोधाप्रमाणेच अतिकाम देखील आरोग्याला हानी पोहोचवणारा रिपु आहे. काम अनावर झाला की त्यातूनही क्रोध निर्माण होतो. मग माणसाचे एकातून दोन शत्रू तयार होतात. असेच सहाही रिपु एकमेकांशी संलग्न आहेत. कामाला आवर न घालता येण्याचे प्रकार आणि त्यातून उद्भवणारे सामाजिक दुष्परिणाम आपण बघतच आहोत.

एप्सटिन फाईल्स असेल, अनैतिक संबंध आणि त्यातून होणारी भांडणे, मारामाऱ्या आणि खून असतील, किंवा लहान बालक बालिकांवरचे अत्याचार असतील किंवा असंख्य प्रमाणात वाढलेल्या बलात्काराच्या केसेस असतील. हे सगळे काम नियंत्रित न ठेवल्याने दिसणारे दुष्परिणाम आहेत. माणसाच्या एका क्षणाच्या वासनेचे गंभीर दुष्परिणाम इतरांनाही भोगावे लागतात. ज्याचा नैतिक पाया उत्तम असतो त्याला कामवासनेला आवर घालणे कठीण जात नाही.

आज जग जवळ आल्याने आणि मुलं मुलींची लग्नाची वये वाढल्याने तरुण उमलत्या वयात या षड्रीपुसाठी मुले वाहवत जाताना दिसतात. मग लग्नाचे आमिष दाखवून फसवले अशा बातम्या वारंवार ऐकायला मिळतात. पण लग्नाचे आमिष दाखवले असेल तर लग्न होईपर्यंत संबंध न ठेवणे त्यातल्या मुलीलाही जमलेले नसते, हा तिच्यातल्या काम रिपुचा विजय असतो. किंवा ऑनलाईन ओळख होऊन एखाद्या मुलीने मुलांकडून लाखो रुपये वारंवार उकळले असे समजते ते त्या मुलाला काम रिपुला नियंत्रणात न ठेवता आल्याने झालेले असते. पुराणकाळातील गोष्टींमध्ये वेगवेगळ्या स्त्रियांनी विशिष्ट हेतूने अनेक ऋषींची तपस्या भंग केल्याचे विविध कथांमधून आपल्याला माहिती आहे. हे त्या ऋषींना इतर सर्व रिपुंवर विजय मिळवूनही कामवासनेवर विजय मिळवता न आल्याने शक्य होते. हनी ट्रॅप मध्ये भले भले लोक फसलेले आपल्याला दिसतात. 

काम आणि एका व्यक्तीशी एकनिष्ठ असणे हे आपल्या समाजात आदर्श मानले जाते. हिंदूंसाठी एका पत्नीशी किंवा पतीशी घटस्फोट घेतल्याशिवाय व्यक्ती इतरांशी संबंध ठेवू शकत नाही, दुसरे लग्न करू शकत नाही. तसे केल्यास त्यास अनैतिक समजले जाते. भारतीय समाजात काम या गोष्टीचा एकनिष्ठतेशी असा घनिष्ठ संबंध आहे. माणूस इतर कोणत्याही रिपुपेक्षा कामवासनेने लिप्त असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सर्वात जास्त नाचक्की होते. स्त्रीने स्त्रीशी किंवा पुरुषाने पुरुषाशी संबंध ठेवणे हेदेखील वहिवाटीबाहेरचं मानलं गेलं आहे. कारण निसर्गाने प्राण्यांना काम दिला त्याचा मूळ हेतू आहे प्रजनन जो समलिंगी संबंधांनी साध्य होत नाही.

प्रजनन होण्यासाठी काम महत्त्वाचा आहे, पण काम आणि नैतिकता हे एकमेकांसोबत गुंफलेले असतील तरच तो समाजमान्य आहे. अन्यथा प्रत्येक जीवाची ती मूलभूत गरज असूनही स्वैरपणा केल्यास तो आपला शत्रू ठरतो.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६