सोमवार, २० जुलै, २०२६

पिच्छा


मराठीतला पिच्छा हा शब्द हिंदीतल्या पीछा वरून आलेला असावा. पण पिच्छा मध्ये जो हट्ट आणि वैताग आहे तो काही पीछा मध्ये वाटत नाही. एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणाऱ्या माणसाला आयुष्यात हवं तसं यश नक्कीच मिळतं. काही जण काही गोष्टींचा पिच्छा पुरवतात तर काही जण माणसांचा पिच्छा पुरवतात. एखाद्या ध्येयाचा पिच्छा पुरवणे माणसांचा पिच्छा पुरवण्यापेक्षा नक्कीच सोपं असेल असं वाटतं.

सर्वांनाच जिद्दीने पिच्छा पुरवणं जमत नाही. माणसांचा पिच्छा पुरवायचा म्हणजे एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी सारखं सारखं भंडावून सोडायचं. उदाहरणार्थ जसे आपल्याला सध्या काही बँकांचे किंवा वित्तीय कंपन्यांचे नकोसे कॉल्स सारखे येत असतात. मार्केटिंग, विमा आणि अशा अनेक जाहिरातबाजीवाल्या लोकांना इतर लोकांचा पिच्छा पुरवावाच लागतो. शंभर लोकांपैकी दोन जण जरी त्यांच्या गळाला लागले तरी त्यांचा उद्देश सफलच होणारा असतो.

मला स्वतःला मात्र माणसांचा पिच्छा मुळीच पुरवता येत नाही. आणि आपली घरगुती काही व्यवसाय कौशल्य आधारित कामे असतात, ती आजकाल पिच्छा पुरवल्याशिवाय पूर्णच होत नाहीत. एखाद्याचा पिच्छा न पुरवल्यास माणसे त्यांची कामे प्रामाणिकपणे करताना दिसत नाहीत. अपवाद असतातच. एखाद्याला आपण एखाद्या कामाचा ते मागतील तेवढा मोबदला देत असू तर त्यांचा पिच्छा का पुरवावा लागला पाहिजे? पण त्याशिवाय मनासारखं काम होत नाही. हाही एक प्रकारचा भ्रष्टाचारच नाही का.

काहीजण एखाद्या जोडीदारासाठी त्या व्यक्तीचा तर कधी त्या व्यक्तीसाठी इतरांचा पिच्छा पुरवतात, आणि हवा तोच जोडीदार मिळवतात. नंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात पुढे काय होत असेल ती वेगळी गोष्ट आहे. काही जणांना लग्नाच्या काही वर्षांनंतर पाहून असं वाटतं यासाठीच का इतका अट्टाहास केला होता यांनी. एखादी गोष्ट असो वा व्यक्ती ती मिळेपर्यंतच त्याचं अप्रूप असतं. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप पिच्छा पुरवून ती एकदा मिळाली कि मग मात्र तो केलेला पिच्छा विस्मृतीमध्ये जातो.

पण सगळेच जण पिच्छा पुरवताना केलेल्या कष्टांना विसरून जाणाऱ्यांपैकी नसतात. बऱ्याच जणांना आधी केलेल्या कष्टाची जाणीव कायम राहते. आणि पिच्छा पुरवणे नक्कीच आकर्षणाच्या नियमांपैकीच एक असावे असे मला नेहमी वाटते. 
 
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६


रविवार, १९ जुलै, २०२६

सख्खा


आपल्या जन्मापासून काही सख्खी नाती आपल्याला लाभतात. आणि काही जोडलेली नाती लाभतात. आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, मामा, मावशी, काका, आत्या त्यांची मुलं हे सगळे आपले सख्खे नातेवाईक असतात. मामाचं लग्न होऊन मामी आली, काकाचं लग्न होऊन काकू आली तर त्यांच्याबरोबर येतात ती जोडलेली नाती. सख्खी नाती नेहमी आपली पक्की असतात असं आपल्याला वाटत असतं.

कधी कधी सख्खे दोन भाऊ वा बहिणी यांच्यामध्ये इतकं साम्य असते की हा त्याचा/तिचा भाऊ आहे किंवा ही बहीण आहे असं सांगण्याचीसुद्धा गरज पडत नाही. आणि कधी इतके वेगळे असतात की ते सख्खे आहेत यावर सांगूनही विश्वास बसत नाही. सवयीचंदेखील तसंच जरी सख्खी भावंडं असतील तरी साध्या साध्या सवयीसुद्धा त्यांच्या एकमेकांसारख्या नसतात, किंवा कधी विचार खूप वेगळे असतात की हे एकाच घरातल्या माणसांचे विचार असतील असं खरं वाटत नाही.

जोडलेल्या नात्यांमध्ये थोडी औपचारिकता असते. जोपर्यंत एकमेकांना चांगलं ओळखत नाही तोपर्यंत थोडा कमी मोकळेढाकळेपणा असतो. जोडलेल्या नात्यांमध्येही आपल्याला आपला नातेसंग्रह संपन्न करणारी माणसेही भेटतात. एकसारखे विचार जुळले तर यांच्याबरोबर आपलं नातं वयाच्या बऱ्याच काळानंतर जोडलं गेलंय हे लक्षातदेखील राहत नाही. जरी विचार जुळणं मने जुळण्यासाठी महत्त्वाचं असतं तरी सख्ख्याला आपण जितकी संधी देतो तितकी कधी कधी जोडलेल्याना देत नाही.

कधी काही सख्खी नाती अशी पण दिसतात की इवल्याशा मतभेदाने एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत. नात्यापेक्षा अहंकाराला जास्त कुरवाळले जाते. सख्खेपणाचा लवलेशही त्यांच्यामध्ये उरलेला नसतो. छोटंसं निमित्त आणि एकमेकांमध्ये कायमचा दुरावा आलेला असतो. मला वाटत नाही नुसत्या अहंकाराने सख्ख्यांपासून इतकं तोडून वागता येत असेल. खरं कारण तर हे असेल की त्यांचे एकमेकांशी सख्ख्यांप्रमाणे कधी बंधच जुळले नाहीत. सख्खी असोत वा जोडलेली नाती आपल्याला निभावून न्यावीच लागतात. 

बाकी मनाने गुंफलेली नाती असतात काही, त्यामध्ये सखा किंवा सखी असते, सख्खा किंवा सख्खी यासारखेच असणारे म्हणून त्यांना सखा वा सखी म्हणत असावेत नक्कीच. काही काही गोष्टी आपण सख्ख्यांना आपण सांगू शकत नाही, पण सख्यांना सांगून आपलं मन मोकळं करू शकतो. या नात्यामध्ये कोणतंच बंधन नसते. कोणताच मानपान नसतो, कोणतीच अपेक्षा नसते. फक्त निखळ मैत्री असते. म्हणूनच कवि योगेश म्हणतात,

कहीं तो ये, दिल कभी, मिल नहीं पाते
कहीं से निकल आए, जनमों के नाते

शनिवार, १८ जुलै, २०२६

वाढदिवस


कोणालाही आपला वाढदिवस म्हणजे मोठा आनंदाचा दिवस असतो. एक काळ असायचा, ज्या काळात मुलांना शाळेत घालण्याच्या वेळेस सगळ्या मुलांची जन्मतारीख ही एक जूनच असायची. कधीकधी जनसालही लक्षात नसे. डोक्यावरून हात पलीकडच्या कानाला लागला की मूल शाळेत घालण्याच्या वयाचे झालेले असे.
आजी-पणजीच्या काळात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, होळीच्या आदल्या दिवशी, गौरीपूजनाच्या दिवशी असे त्यांचे जन्मदिवस लक्षात ठेवलेले असायचे. आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे कोणताही महिना त्यामध्ये एक तरी उल्लेखनीय सण किंवा घटना असल्याशिवाय जात नाही. त्यामुळे त्यांची पद्धतही चांगलीच म्हणायची.

आताचा एक काळ आहे की पालक बाळाची जन्मतारीख-वार-महिना  जन्मवेळ मिलिसेकंदासहित नोंद करून ठेवतात. अशा वेळी वाढदिवसाचे महत्त्व वाढले नसेल तरच नवल. माझ्या लहानपणी काही ठराविक वर्षांचे होईपर्यंत हौस म्हणून लहान मुलांचे वाढदिवस केले जात. त्यातही फार मोठा सोहळा वगैरे नसे. घराजवळचीच थोडीफार बच्चेकंपनी बोलावून त्यांना केक-चॉकलेट आणि थोडा खाऊ दिला जाई. त्या दिवशी उत्सवमूर्ती असल्याने असेल कदाचित, वाढदिवस म्हणजे काहीतरी खास असं  लहानपणापासून मनावर बिंबलं जातं.

पण माझ्यासारखे काहीजण असतात ज्यांना आपला वाढदिवस म्हणजे विशेष काही न वाटता इतर दिवसांप्रमाणे एक सामान्य दिवस वाटतो. काही माणसे पाहण्यात आहेत की कितीही वय झालं तरी अमक्यातमक्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून रुसून बसतात. मला तर याच्या अगदी उलट वाटतं. कोणी शुभेच्छा नाही देऊ शकले तर विशेष काय आहे त्यात एवढे. इतरांसाठी तर तोसुद्धा इतर अनेक दिवसांसारखाच आणखी एक दिवस असतो. मार्केटिंगसाठी आपल्याला सेवा पुरवणाऱ्या काही संस्था आपल्याला इमेल किंवा मेसेजवर शुभेच्छा पाठवतात.

कोणाच्या शुभेच्छा आलेल्या आवडत नाहीत असं नाही, एखाद्याने आपण इतके महत्त्वाचे नसतानाही आठवून फोन किंवा मेसेज केला तर नक्कीच छान वाटते. पंतप्रधानांची एक साईट आहे. बहुतेक तिकडे रजिस्टर केलं असेल तर तिथूनही शुभेच्छांचं एक पत्र इमेलवर प्राप्त होते. पंतप्रधान या पदावर व्यक्ती कोणीही असो पद देशातील सर्वांत मोठ्या पदांपैकी एक आहे. आणि एखाद्याला वैयक्तिकरित्या ओळखत नसताना त्यांचा द्वेष वा जवळचे समजणारे आपण कोण. तर हे पत्र ऑटोमेटेड आहे हे पूर्णपणे माहीती असूनही ते मिळाल्याचाही आनंद होतो. पण खूप थाटमाट करावा आणि भरपूर लोकांना बोलावून आपलं कौतुक करून घ्यावं इतका महत्त्वाचा हा दिवस मला नक्कीच वाटत नाही.

बरेच जण वाढदिवशी अनाथाश्रमांना दान करणे, धार्मिक दानधर्म करणे, वृक्षारोपण करणे, सामाजिक उपक्रम राबवणे वगैरे चांगल्या प्रकारे आपला दिवस व्यतित करतात. खूप गोतावळा न आवडणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना उत्सवमूर्ती व्हायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. आणि अगदी काहीच न करणे हादेखील पर्याय आहेच.      

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६