एखाद्याने माशाला झाडावर राहण्याची सक्ती केली तर काय होईल?
गरुडाला आकाशात विहरण्याऐवजी पाण्यातच वास्तव्य करावयास सांगितले तर त्याला कसं वाटेल?
सिंहाला फक्त गवत खाऊ घातले तर त्याची कशी प्रतिक्रिया असेल?
हरीण किंवा गाय-बकरीला मांस खायला पुढ्यात दिले आणि गवत दिलेच नाही तर ते काय करतील?
नारळाला वाळवंटात आणून लावले आणि खजुराला किनारपट्टीवर तर त्यांची वाढ कोणत्या प्रकारे होईल?
घुबडाला दिवसा फिरून रात्री झोपायला लावले तर त्याला जमेल?
सांस्कृतिक धक्के, कल्चरल शॉक्स कधी ना कधी आपल्याला बसत असतात. पण एखाद्याला त्यातच आयुष्य काढावं लागणार असेल तर तो त्याची सवय करून घेईल की त्याची घुसमट होऊन जगेल? असा माणूस होईल की नंतर वाटणार पण नाही की अमुक गोष्ट याच्यासाठी धक्का होती पण आता इतका मुरलाय की कोणाला खरं पण वाटणार नाही. आधी पूर्ण शाकाहारी असलेला माणूस पट्टीचा मांसाहारी झाला. किंवा आधी रोजच्या सामिष जेवणाची सवय असणारी व्यक्ती पूर्ण सात्विक जेवणाकडे वळाली. अशी उदाहरणे आपल्याला दिसतात.
कोणाला लग्नानंतर, तर कोणाला देशांतर केल्याने सांस्कृतिक धक्के सहन करावे लागू शकतात. आता जग जवळ आलंय. माणसेही पूर्वीसारखी विशिष्ट समाज वगैरे पाळून राहताना दिसत नाहीत. आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरराज्यीय, आंतरभाषिक आणि आंतरराष्ट्रीय विवाह आता सर्रास होताना दिसतात. त्यात सुरुवातीला नक्कीच दोन्ही बाजूंना सांस्कृतिक धक्के बसतच असणार.
काही सांस्कृतिक धक्के वयातील, पिढ्यांमधील अंतरामुळे वेगळ्या पिढीवर झालेल्या वेगळ्या संस्कारांमुळे एकाच घरामध्ये राहूनही मिळू शकतात. आताआता म्हणजे मागच्या पिढीपर्यंत एका घराचे एक विशिष्ट नियम असायचे, मोठ्यांच्या ठरवलेल्या नियमांच्या बाहेर घरातील कोणी जात नसे, त्यांच्यावर तेवढा विश्वास होता की हे असं चालत आलंय तर ते आपल्या भल्यासाठी असेल. पण आता जनरेशन गॅप काय काय धक्के सहन करायला लावेल ते कल्पना करण्यापलीकडचे आहे.
पूर्वी जगात काय वाईट गोष्टी चालायच्या ते सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचे खूप कमी पर्याय उपलब्ध होते, त्यामुळे अज्ञानात सुख होतं की जग सगळं चांगलं आहे. सामाजिक दबावामुळे एखाद्याचं वाकडं पाऊल पाडण्याचं प्रमाण कमी होतं. अगदी चुकीची संगत चुकून लागली असेल तरच कोणी चुकीच्या मार्गाला जायचा. सध्या असा काळ आहे की जगात काय काय चाललंय आणि चुकीचंसुद्धा हे सहज पाहण्यासाठी, माहिती करून घेण्यासाठी उपलब्ध आहे, त्यामुळे आपण हे केलं तर काय बिघडलं असं वाटून नकळत्या वयात मुलांकडून अशी चुकीची वर्तणूक होऊ शकते जी घरच्यांसाठी कल्चरल शॉक असू शकते.
जर बदल स्वतः काहीतरी मनाशी ठरवून केला असेल तर माणूस त्या धक्क्यावर मात करू शकतो, पण परिस्थितीमुळे, नाईलाजाने जर एखाद्याला सांस्कृतिक धक्का पचवण्याची जबाबदारी येऊन पडली तर त्या माणसाची नक्कीच वर उदाहरणे दिली आहेत त्यांच्यासारखी गत होईल.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६