सर्वांनाच जिद्दीने पिच्छा पुरवणं जमत नाही. माणसांचा पिच्छा पुरवायचा म्हणजे एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी सारखं सारखं भंडावून सोडायचं. उदाहरणार्थ जसे आपल्याला सध्या काही बँकांचे किंवा वित्तीय कंपन्यांचे नकोसे कॉल्स सारखे येत असतात. मार्केटिंग, विमा आणि अशा अनेक जाहिरातबाजीवाल्या लोकांना इतर लोकांचा पिच्छा पुरवावाच लागतो. शंभर लोकांपैकी दोन जण जरी त्यांच्या गळाला लागले तरी त्यांचा उद्देश सफलच होणारा असतो.
मला स्वतःला मात्र माणसांचा पिच्छा मुळीच पुरवता येत नाही. आणि आपली घरगुती काही व्यवसाय कौशल्य आधारित कामे असतात, ती आजकाल पिच्छा पुरवल्याशिवाय पूर्णच होत नाहीत. एखाद्याचा पिच्छा न पुरवल्यास माणसे त्यांची कामे प्रामाणिकपणे करताना दिसत नाहीत. अपवाद असतातच. एखाद्याला आपण एखाद्या कामाचा ते मागतील तेवढा मोबदला देत असू तर त्यांचा पिच्छा का पुरवावा लागला पाहिजे? पण त्याशिवाय मनासारखं काम होत नाही. हाही एक प्रकारचा भ्रष्टाचारच नाही का.
काहीजण एखाद्या जोडीदारासाठी त्या व्यक्तीचा तर कधी त्या व्यक्तीसाठी इतरांचा पिच्छा पुरवतात, आणि हवा तोच जोडीदार मिळवतात. नंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात पुढे काय होत असेल ती वेगळी गोष्ट आहे. काही जणांना लग्नाच्या काही वर्षांनंतर पाहून असं वाटतं यासाठीच का इतका अट्टाहास केला होता यांनी. एखादी गोष्ट असो वा व्यक्ती ती मिळेपर्यंतच त्याचं अप्रूप असतं. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप पिच्छा पुरवून ती एकदा मिळाली कि मग मात्र तो केलेला पिच्छा विस्मृतीमध्ये जातो.
पण सगळेच जण पिच्छा पुरवताना केलेल्या कष्टांना विसरून जाणाऱ्यांपैकी नसतात. बऱ्याच जणांना आधी केलेल्या कष्टाची जाणीव कायम राहते. आणि पिच्छा पुरवणे नक्कीच आकर्षणाच्या नियमांपैकीच एक असावे असे मला नेहमी वाटते.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६


