गुरुवार, २३ जुलै, २०२६

चक्रव्यूह


चक्रव्यूह हा एक सापळा होता. त्यामध्ये एकदा योद्धा ते तोडण्यासाठी आत गेला की बाहेर येण्याचा मार्ग त्याला सापडत नसे कारण चक्रव्यूहाची रचना योद्धा आत गेल्यानंतरही गोल गोल फिरत राही. मग लक्षात ठेवणे अवघड असे की बाहेर पडण्याचा मार्ग कोणता. कधीकधी वाटतं आपलं आयुष्यदेखील असंच चक्रव्यूह आहे. प्रत्येक क्षणाला आपल्याशी लढणारे योद्धे नसतात या चक्रव्युहामध्ये, पण आपण आपलं दैनंदिन जीवन जगणं हाच एक  चक्रव्यूह आहे. कधीकधी एखाद्या प्रसंगातून असं वाटतं आपण कधी बाहेर पडणार. मग बऱ्याच प्रयत्नांनी आणि सहनशीलतेने आपण त्यातून बाहेर आलो की समजतं हा तर चक्रव्यूहाचा एक छोटासा भाग होता ज्यातून आपण बाहेर आलो, खरं चक्रव्यूह तर भेदलंच नाही अजून.


कधी कोणाची न आवडणारी साथसंगत असेल, कधी रोजचं ऑफिसचं रुटीन असेल, कधी मागे लागलेलं; गळ्यात पडलेलं एखादं काम असेल, किंवा कधी आपणच हौसेने मागून घेतलेली एखादी जबाबदारी असेल, कधीतरी असा काळ येतोच की मला यातून मुक्त करा. मला हे नाही करायचं. मला बदल हवाय. मग बदल म्हणून कधी आपण हिंडून-फिरून येतो, पण ती चक्रव्यूहातून मिळालेली छोटीशी सूट असते. त्यानंतर पुन्हा आपलं रुटीनसोबत युद्ध चालू होतं.

कधी आपल्या एकदम जवळचं एखादं माणूस असतं ज्याच्या वागण्याने आपण एकदम वैतागलेले असतो, पण त्याला सोडून द्यावं इतकीही वाईट परिस्थिती नसते किंवा असंच सोडून देऊ शकत नाही. मग ते अजून एक चक्रव्यूह असते, हे कधी बदलेल, याचं वागणं कधी सुधारेल. समजा तसं झालं तर पुढे दुसरं काहीतरी अजून वाढून ठेवलेलं असतं. असं काहीतरी की ज्याचा आपल्याला कंटाळा येऊन आपण म्हणतो की सगळं सोडून कुठेतरी पळून जावं असं वाटतं.

काहींचं आयुष्य आपल्याला समोर दिसत असते की त्यांना काय काय संकटांना सामोरे जावे लागते. पण आपलं चक्रव्यूह मात्र कोणालाच दिसत नसतं. कारण ती मनाची एक अवस्था असते फक्त. खरंच फार मोठं संकट वगैरे आलं तर छान लढतो आपण त्याच्याशी. पण रोजची न सांगता येणारी मरगळ, रुटीनचा कंटाळा हा खरं संकट नसतोच पण ते एक चक्रव्यूह नक्कीच असतं ज्यात आपण पुरते अडकलेले असतो. चक्र शब्द आलाय म्हणजेच समजून जायचं की या फेऱ्यांमध्ये आपण पुन्हा पुन्हा अडकणार.

आजूबाजूची माणसं बदलली, जागा बदलली किंवा नोकरी बदलली म्हणून आपण चक्रव्यूहातून बाहेर येणार नसतो, चक्रव्यूह फिरून आपण फक्त त्याच्या दुसऱ्या एखाद्या परिघात पोहोचणार असतो. प्रत्येक मनुष्याला देवाने त्याच्या जन्मासोबतच एका अभेद्य अशा चक्रव्यूहाची भेट देऊन पाठवलेलं असतं. आणि शेवटपर्यंत ज्याचं त्याला ते चक्रव्यूह भेदत लढत राहायचं असतं.   

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

बुधवार, २२ जुलै, २०२६

वाचन



वाचनाचा छंद हल्ली लोप पावत चालला आहे असं म्हणतात. एक काळ असा होता की कोणतेही ज्ञान किंवा माहिती मिळवण्यासाठी वाचन हा एकमेव पर्याय असायचा. त्यामुळे एरवी वाचनाची अगदी आवड किंवा छंद नसलेली माणसेसुद्धा निदान रोजचे वर्तमानपत्र तरी वाचायचे. पण आता माहितीचे इतके स्रोत निर्माण झाले आहेत की एकदा शालेय, महाविद्यालयीन शिक्षण संपले की काही वाचावेच अशी सक्ती राहत नाही. काही अगदी अपरिहार्य गोष्टी, नोटिसा, फॉर्म्स, ऑफिसमध्ये कामाचे तपशील फक्त एवढ्याच गोष्टींवर त्यांचे वाचन थांबते.

सध्या ऑडिओ बुक्सचा पर्याय उपलब्ध आहे. ज्यांना वाचन आवडत किंवा जमत नाही अशांसाठी निदान कोणी काही लिहिलेले ऑडिओ बुक्स मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचते. शाळा कॉलेजमध्ये असताना सक्तीने अभ्यास म्हणून वाचन करावेच लागते. ज्याला वाचनाचा कंटाळा असेल त्याला गुणही कमीच मिळणार. अशा प्रकारे वाचनाचा संबंध हुशारीशी देखील आहे. काही जण वाचतच नाहीत, या पुढची पायरी म्हणजे काहीजण वाचतात पण वाचलेल्याचं आकलन होत नाही.

माझीदेखील अशी अवस्था होते बऱ्याचदा. डोळे तर अक्षरांवरुन फिरत असतात, पण मेंदूमध्ये काहीच शिरत नसते. आणि कॉलेजला असताना तर खुपदाच व्हायचं असं. एकतर सगळे किचकट विषय आणि पूर्ण सेमिस्टर मध्ये न केलेला अभ्यास किंवा कमी पडलेला वेळ यांच्यामुळे अचानक परीक्षा जवळ आल्यावर नवीन काही वाचायला घेतलं की नुसतेच अक्षरांवरुन डोळे फिरायचे. त्यात ते लक्षात ठेवण्यासाठी वेळेचं बंधन असायचं मग अजूनच मेधाशक्ती मंदावायची. खूपदा ठरवलं की आपण खूप आधीच अभ्यास तयार ठेवायचा म्हणजे ऐन परीक्षेवेळी असं होणार नाही. पण दर वेळेस ये रे माझ्या मागल्या.

वाचनासाठी सुद्धा एक मूड असावा लागतो, किंवा कधीकधी उलटही होते. काही वाचताना लगेच विषयामध्ये मुग्ध झालो तर मूड आपोआप बनतो. तेच जे वाचतोय तो विषय क्लिष्ट असला आणि त्यातून मूडही नसला की अजूनही नुसतेच डोळे फिरतात, आकलन होत नाही. आणि कधीकधी काही लिखाण असं असते की नुसते डोळे फिरवले आणि शब्द न शब्द नाही वाचला तरी विषयाचे आकलन होते.

पाठांतर हा वाचनाचा आणखी एक पैलू आहे. अनेकदा वाचलं की आपोआपच ते पाठ होते. ज्याचं पाठांतर खूप उत्तम असेल अशा एकपाठी माणसाचे नुसते डोळे जरी अक्षरांवर फिरले तरी आकलन न होताही त्यांना वाचलेले तोंडपाठ होऊ शकते. माझ्यासारख्यांना वाचून आकलन झाल्याशिवाय एखादी गोष्ट पाठ होत नाही. द्रुक की श्राव्य हा प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे ठरणारा प्रकार आहे. लहानपणी आई म्हणायची सिनेमाची गाणी बरी एकदा ऐकली तरी पाठ होतात.

तेव्हा असं वाटायचं ऐकलेलं वाचलेल्यापेक्षा लवकर पाठ होते. पण आता मला एखादे पुस्तक वगैरे असेल तर ऐकण्यापेक्षा वाचायलाच जास्त आवडते. ऐकून आपल्या कल्पनाशक्तीला आपण थोडं सीमित करतो. जो वाचतोय त्या लयीप्रमाणे आपण ऐकतोय त्याचा अर्थ लावतो. पण आपण वाचत असू तर ती लय आपल्याला वाचून काय आकलन झाले त्याप्रमाणे वेगळी असू शकते. वयाप्रमाणे कोणाची दृष्टी अधू होते तर कोणाची श्रवणशक्ती. माझी देवाकडे प्रार्थना आहे, निदान वाचत राहता येईल एवढी माझी दृष्टी शेवटपर्यंत निरोगी ठेव.  

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

मंगळवार, २१ जुलै, २०२६

भीती


जगातल्या कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही असा माणूस अस्तित्वात असणं शक्य नाही. हा आता दाखवत नसतील काहीजण पण कसली ना कसली भीती तर प्रत्येकालाच असते. कोणाला पाण्याची, कोणाला उंचीची, कोणाला विदयुत उपकरणांची, कोणाला गर्दीची, कोणाला गाडी चालवण्याची, कोणाला एकटेपणाची! खरं तर हे खूपच ढोबळ प्रकार झाले. अमका फोबिया तमका फोबिया असं आपण ऐकत असतो. पण खरंच प्रत्येक प्रकारच्या भीतीला एखाद्या फोबियाचं नाव देणं इतकं अशक्य आहे की ती यादी अगणित संख्यांची होईल.

लोकांना अंघोळीची सुद्धा भीती असू शकते, एखाद्या रंगाची भीती असू शकते, कोणाशी बोलण्याची, इतरांमध्ये मिसळण्याची, नोकरीसाठी मुलाखती देण्याची, अंधाराची, अमानवीय शक्तींची आणि कशाकशाची नाही. भीती वाटत असेल तर माणूस त्या गोष्टीचा विचार करूनही इतका घाबरतो की प्रयत्न करून पाहणे तर फारच लांब राहिलं. कोणत्याही एखाद्या बाबतीत आत्मविश्वास कमी असला की त्याची भीती वाटू लागते.

कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला इतकी अनभिज्ञ असते की त्यामुळे काय वाढून ठेवले असेल म्हणून भीती वाटते, तर कधी एखादी गोष्ट बऱ्याचदा प्रयत्न करूनही जमली नाही म्हणून त्याची भीती निर्माण होते. कधीकधी एखाद्या गोष्टीची नुसतीच इतरांना भीती वाटते म्हणून आपल्यालाही भीती वाटते. काही प्रकारच्या भीती अगदीच अनाकलनीय असतात, एखाद्याला अमकी भीती का आहे हे ती व्यक्ती स्वतःदेखील सांगू शकत नाही, कदाचित ती भीती गुणसूत्रांमधून किंवा पालकांचं , घरातल्या इतरांचं वागणं पाहून येत असावी.

कातरवेळी माणसाचं मन बऱ्याचदा उदास, खिन्न होते, किंवा प्रिय व्यक्ती जवळ नसेल तर आठवण येते. किंवा जुन्या आठवणी मनात उचंबळून येऊन मनाचीही कातर अवस्था होते. एकटं एकांतात असू तर संधिप्रकाश अजूनच उदासीन करून जातो. संध्याछाया भिवविती मना अशी अवस्था बहुतेक जणांची असते. एकतर दिवस संपून रात्र सुरु होणार आहे याची ही चाहूल असते. पूर्ण उजेड आणि पूर्ण अंधार या दोहोंच्या मधली ही वेळ असते.

या भीतीचं मूळ मानवाच्या उत्क्रांतीच्या अवस्थेपासून आलं आहे. जंगलांमध्ये राहताना संध्याकाळी अंधार झाल्यावर शिकार करणाऱ्या श्वापदांची भीती वाढत असे. ही अंधारात हिंस्र किंवा विषारी प्राण्यांची वाढलेली भीती, आणि यातून एखादा हिंस्र प्राणी मागे लागला तर जीव मुठीत घेऊन पलायन करणे, यांमुळे आजही संधिप्रकाश पसरला की प्रत्येक मानवाला हुरहूर दाटून येते. आजही अंधाराची भीती वाटते, आणि आजही दिवसा रम्य भासणार निसर्ग, समुद्र, पर्वत, नद्या, जंगले रात्री भयाण वाटतात. त्यामुळे संध्याकाळी देवापुढे दिवा लावणे, शुभंकरोति म्हणणे या गोष्टी करून आपण मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतो.

तर तुम्हाला कोणत्या एखाद्या किंवा अनेक गोष्टींची अशी भीती होती किंवा आहे, आणि त्यावर तुम्ही मात केलीत की करण्याचा प्रयत्न चालू आहे. किंवा असं आहे की ही भीती राहू देत अशीच मला याचं काहीच करायचं नाही. भीतीवर जिद्दीने मात करणारी माणसेच आयुष्यात काही मिळवू शकतात. आजकाल ते काहीतरी म्हणतात ना 'डर के आगे जीत है'. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६