शनिवार, २५ जुलै, २०२६

धक्का


एखाद्याने माशाला झाडावर राहण्याची सक्ती केली तर काय होईल?
गरुडाला आकाशात विहरण्याऐवजी  पाण्यातच वास्तव्य करावयास सांगितले तर त्याला कसं वाटेल?
सिंहाला फक्त गवत खाऊ घातले तर त्याची कशी प्रतिक्रिया असेल?
हरीण किंवा गाय-बकरीला मांस खायला पुढ्यात दिले आणि गवत दिलेच नाही तर ते काय करतील?
नारळाला वाळवंटात आणून लावले आणि खजुराला किनारपट्टीवर तर त्यांची वाढ कोणत्या प्रकारे होईल?
घुबडाला दिवसा फिरून रात्री झोपायला लावले तर त्याला जमेल?

सांस्कृतिक धक्के, कल्चरल शॉक्स कधी ना कधी आपल्याला बसत असतात. पण एखाद्याला त्यातच आयुष्य काढावं लागणार असेल तर तो त्याची सवय करून घेईल की त्याची घुसमट होऊन जगेल? असा माणूस होईल की नंतर वाटणार पण नाही की अमुक गोष्ट याच्यासाठी धक्का होती पण आता इतका मुरलाय की कोणाला खरं पण वाटणार नाही. आधी पूर्ण शाकाहारी असलेला माणूस पट्टीचा मांसाहारी झाला. किंवा आधी रोजच्या सामिष जेवणाची सवय असणारी व्यक्ती पूर्ण सात्विक जेवणाकडे वळाली. अशी उदाहरणे आपल्याला दिसतात.

कोणाला लग्नानंतर, तर कोणाला देशांतर केल्याने सांस्कृतिक धक्के सहन करावे लागू शकतात. आता जग जवळ आलंय. माणसेही पूर्वीसारखी विशिष्ट समाज वगैरे पाळून राहताना दिसत नाहीत. आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरराज्यीय, आंतरभाषिक आणि आंतरराष्ट्रीय विवाह आता सर्रास होताना दिसतात. त्यात सुरुवातीला नक्कीच दोन्ही बाजूंना सांस्कृतिक धक्के बसतच असणार.

काही सांस्कृतिक धक्के वयातील, पिढ्यांमधील अंतरामुळे वेगळ्या पिढीवर झालेल्या वेगळ्या संस्कारांमुळे एकाच घरामध्ये राहूनही मिळू शकतात. आताआता म्हणजे मागच्या पिढीपर्यंत एका घराचे एक विशिष्ट नियम असायचे, मोठ्यांच्या ठरवलेल्या नियमांच्या बाहेर घरातील कोणी जात नसे, त्यांच्यावर तेवढा विश्वास होता की हे असं चालत आलंय तर ते आपल्या भल्यासाठी असेल. पण आता जनरेशन गॅप काय काय धक्के सहन करायला लावेल ते कल्पना करण्यापलीकडचे आहे.

पूर्वी जगात काय वाईट गोष्टी चालायच्या ते सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचे खूप कमी पर्याय उपलब्ध होते, त्यामुळे अज्ञानात सुख होतं की जग सगळं चांगलं आहे. सामाजिक दबावामुळे एखाद्याचं वाकडं पाऊल पाडण्याचं प्रमाण कमी होतं. अगदी चुकीची संगत चुकून लागली असेल तरच कोणी चुकीच्या मार्गाला जायचा. सध्या असा काळ आहे की जगात काय काय चाललंय आणि चुकीचंसुद्धा हे सहज पाहण्यासाठी, माहिती करून घेण्यासाठी उपलब्ध आहे, त्यामुळे आपण हे केलं तर काय बिघडलं असं वाटून नकळत्या वयात मुलांकडून अशी चुकीची वर्तणूक होऊ शकते जी घरच्यांसाठी कल्चरल शॉक असू शकते.

जर बदल स्वतः काहीतरी मनाशी ठरवून केला असेल तर माणूस त्या धक्क्यावर मात करू शकतो, पण परिस्थितीमुळे, नाईलाजाने जर एखाद्याला सांस्कृतिक धक्का पचवण्याची जबाबदारी येऊन पडली तर त्या माणसाची नक्कीच वर उदाहरणे दिली आहेत त्यांच्यासारखी गत होईल. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

गुरुवार, २३ जुलै, २०२६

चक्रव्यूह


चक्रव्यूह हा एक सापळा होता. त्यामध्ये एकदा योद्धा ते तोडण्यासाठी आत गेला की बाहेर येण्याचा मार्ग त्याला सापडत नसे कारण चक्रव्यूहाची रचना योद्धा आत गेल्यानंतरही गोल गोल फिरत राही. मग लक्षात ठेवणे अवघड असे की बाहेर पडण्याचा मार्ग कोणता. कधीकधी वाटतं आपलं आयुष्यदेखील असंच चक्रव्यूह आहे. प्रत्येक क्षणाला आपल्याशी लढणारे योद्धे नसतात या चक्रव्युहामध्ये, पण आपण आपलं दैनंदिन जीवन जगणं हाच एक  चक्रव्यूह आहे. कधीकधी एखाद्या प्रसंगातून असं वाटतं आपण कधी बाहेर पडणार. मग बऱ्याच प्रयत्नांनी आणि सहनशीलतेने आपण त्यातून बाहेर आलो की समजतं हा तर चक्रव्यूहाचा एक छोटासा भाग होता ज्यातून आपण बाहेर आलो, खरं चक्रव्यूह तर भेदलंच नाही अजून.


कधी कोणाची न आवडणारी साथसंगत असेल, कधी रोजचं ऑफिसचं रुटीन असेल, कधी मागे लागलेलं; गळ्यात पडलेलं एखादं काम असेल, किंवा कधी आपणच हौसेने मागून घेतलेली एखादी जबाबदारी असेल, कधीतरी असा काळ येतोच की मला यातून मुक्त करा. मला हे नाही करायचं. मला बदल हवाय. मग बदल म्हणून कधी आपण हिंडून-फिरून येतो, पण ती चक्रव्यूहातून मिळालेली छोटीशी सूट असते. त्यानंतर पुन्हा आपलं रुटीनसोबत युद्ध चालू होतं.

कधी आपल्या एकदम जवळचं एखादं माणूस असतं ज्याच्या वागण्याने आपण एकदम वैतागलेले असतो, पण त्याला सोडून द्यावं इतकीही वाईट परिस्थिती नसते किंवा असंच सोडून देऊ शकत नाही. मग ते अजून एक चक्रव्यूह असते, हे कधी बदलेल, याचं वागणं कधी सुधारेल. समजा तसं झालं तर पुढे दुसरं काहीतरी अजून वाढून ठेवलेलं असतं. असं काहीतरी की ज्याचा आपल्याला कंटाळा येऊन आपण म्हणतो की सगळं सोडून कुठेतरी पळून जावं असं वाटतं.

काहींचं आयुष्य आपल्याला समोर दिसत असते की त्यांना काय काय संकटांना सामोरे जावे लागते. पण आपलं चक्रव्यूह मात्र कोणालाच दिसत नसतं. कारण ती मनाची एक अवस्था असते फक्त. खरंच फार मोठं संकट वगैरे आलं तर छान लढतो आपण त्याच्याशी. पण रोजची न सांगता येणारी मरगळ, रुटीनचा कंटाळा हा खरं संकट नसतोच पण ते एक चक्रव्यूह नक्कीच असतं ज्यात आपण पुरते अडकलेले असतो. चक्र शब्द आलाय म्हणजेच समजून जायचं की या फेऱ्यांमध्ये आपण पुन्हा पुन्हा अडकणार.

आजूबाजूची माणसं बदलली, जागा बदलली किंवा नोकरी बदलली म्हणून आपण चक्रव्यूहातून बाहेर येणार नसतो, चक्रव्यूह फिरून आपण फक्त त्याच्या दुसऱ्या एखाद्या परिघात पोहोचणार असतो. प्रत्येक मनुष्याला देवाने त्याच्या जन्मासोबतच एका अभेद्य अशा चक्रव्यूहाची भेट देऊन पाठवलेलं असतं. आणि शेवटपर्यंत ज्याचं त्याला ते चक्रव्यूह भेदत लढत राहायचं असतं.   

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

बुधवार, २२ जुलै, २०२६

वाचन



वाचनाचा छंद हल्ली लोप पावत चालला आहे असं म्हणतात. एक काळ असा होता की कोणतेही ज्ञान किंवा माहिती मिळवण्यासाठी वाचन हा एकमेव पर्याय असायचा. त्यामुळे एरवी वाचनाची अगदी आवड किंवा छंद नसलेली माणसेसुद्धा निदान रोजचे वर्तमानपत्र तरी वाचायचे. पण आता माहितीचे इतके स्रोत निर्माण झाले आहेत की एकदा शालेय, महाविद्यालयीन शिक्षण संपले की काही वाचावेच अशी सक्ती राहत नाही. काही अगदी अपरिहार्य गोष्टी, नोटिसा, फॉर्म्स, ऑफिसमध्ये कामाचे तपशील फक्त एवढ्याच गोष्टींवर त्यांचे वाचन थांबते.

सध्या ऑडिओ बुक्सचा पर्याय उपलब्ध आहे. ज्यांना वाचन आवडत किंवा जमत नाही अशांसाठी निदान कोणी काही लिहिलेले ऑडिओ बुक्स मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचते. शाळा कॉलेजमध्ये असताना सक्तीने अभ्यास म्हणून वाचन करावेच लागते. ज्याला वाचनाचा कंटाळा असेल त्याला गुणही कमीच मिळणार. अशा प्रकारे वाचनाचा संबंध हुशारीशी देखील आहे. काही जण वाचतच नाहीत, या पुढची पायरी म्हणजे काहीजण वाचतात पण वाचलेल्याचं आकलन होत नाही.

माझीदेखील अशी अवस्था होते बऱ्याचदा. डोळे तर अक्षरांवरुन फिरत असतात, पण मेंदूमध्ये काहीच शिरत नसते. आणि कॉलेजला असताना तर खुपदाच व्हायचं असं. एकतर सगळे किचकट विषय आणि पूर्ण सेमिस्टर मध्ये न केलेला अभ्यास किंवा कमी पडलेला वेळ यांच्यामुळे अचानक परीक्षा जवळ आल्यावर नवीन काही वाचायला घेतलं की नुसतेच अक्षरांवरुन डोळे फिरायचे. त्यात ते लक्षात ठेवण्यासाठी वेळेचं बंधन असायचं मग अजूनच मेधाशक्ती मंदावायची. खूपदा ठरवलं की आपण खूप आधीच अभ्यास तयार ठेवायचा म्हणजे ऐन परीक्षेवेळी असं होणार नाही. पण दर वेळेस ये रे माझ्या मागल्या.

वाचनासाठी सुद्धा एक मूड असावा लागतो, किंवा कधीकधी उलटही होते. काही वाचताना लगेच विषयामध्ये मुग्ध झालो तर मूड आपोआप बनतो. तेच जे वाचतोय तो विषय क्लिष्ट असला आणि त्यातून मूडही नसला की अजूनही नुसतेच डोळे फिरतात, आकलन होत नाही. आणि कधीकधी काही लिखाण असं असते की नुसते डोळे फिरवले आणि शब्द न शब्द नाही वाचला तरी विषयाचे आकलन होते.

पाठांतर हा वाचनाचा आणखी एक पैलू आहे. अनेकदा वाचलं की आपोआपच ते पाठ होते. ज्याचं पाठांतर खूप उत्तम असेल अशा एकपाठी माणसाचे नुसते डोळे जरी अक्षरांवर फिरले तरी आकलन न होताही त्यांना वाचलेले तोंडपाठ होऊ शकते. माझ्यासारख्यांना वाचून आकलन झाल्याशिवाय एखादी गोष्ट पाठ होत नाही. द्रुक की श्राव्य हा प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे ठरणारा प्रकार आहे. लहानपणी आई म्हणायची सिनेमाची गाणी बरी एकदा ऐकली तरी पाठ होतात.

तेव्हा असं वाटायचं ऐकलेलं वाचलेल्यापेक्षा लवकर पाठ होते. पण आता मला एखादे पुस्तक वगैरे असेल तर ऐकण्यापेक्षा वाचायलाच जास्त आवडते. ऐकून आपल्या कल्पनाशक्तीला आपण थोडं सीमित करतो. जो वाचतोय त्या लयीप्रमाणे आपण ऐकतोय त्याचा अर्थ लावतो. पण आपण वाचत असू तर ती लय आपल्याला वाचून काय आकलन झाले त्याप्रमाणे वेगळी असू शकते. वयाप्रमाणे कोणाची दृष्टी अधू होते तर कोणाची श्रवणशक्ती. माझी देवाकडे प्रार्थना आहे, निदान वाचत राहता येईल एवढी माझी दृष्टी शेवटपर्यंत निरोगी ठेव.  

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६