मंगळवार, २१ जुलै, २०२६

भीती


जगातल्या कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही असा माणूस अस्तित्वात असणं शक्य नाही. हा आता दाखवत नसतील काहीजण पण कसली ना कसली भीती तर प्रत्येकालाच असते. कोणाला पाण्याची, कोणाला उंचीची, कोणाला विदयुत उपकरणांची, कोणाला गर्दीची, कोणाला गाडी चालवण्याची, कोणाला एकटेपणाची! खरं तर हे खूपच ढोबळ प्रकार झाले. अमका फोबिया तमका फोबिया असं आपण ऐकत असतो. पण खरंच प्रत्येक प्रकारच्या भीतीला एखाद्या फोबियाचं नाव देणं इतकं अशक्य आहे की ती यादी अगणित संख्यांची होईल.

लोकांना अंघोळीची सुद्धा भीती असू शकते, एखाद्या रंगाची भीती असू शकते, कोणाशी बोलण्याची, इतरांमध्ये मिसळण्याची, नोकरीसाठी मुलाखती देण्याची, अंधाराची, अमानवीय शक्तींची आणि कशाकशाची नाही. भीती वाटत असेल तर माणूस त्या गोष्टीचा विचार करूनही इतका घाबरतो की प्रयत्न करून पाहणे तर फारच लांब राहिलं. कोणत्याही एखाद्या बाबतीत आत्मविश्वास कमी असला की त्याची भीती वाटू लागते.

कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला इतकी अनभिज्ञ असते की त्यामुळे काय वाढून ठेवले असेल म्हणून भीती वाटते, तर कधी एखादी गोष्ट बऱ्याचदा प्रयत्न करूनही जमली नाही म्हणून त्याची भीती निर्माण होते. कधीकधी एखाद्या गोष्टीची नुसतीच इतरांना भीती वाटते म्हणून आपल्यालाही भीती वाटते. काही प्रकारच्या भीती अगदीच अनाकलनीय असतात, एखाद्याला अमकी भीती का आहे हे ती व्यक्ती स्वतःदेखील सांगू शकत नाही, कदाचित ती भीती गुणसूत्रांमधून किंवा पालकांचं , घरातल्या इतरांचं वागणं पाहून येत असावी.

कातरवेळी माणसाचं मन बऱ्याचदा उदास, खिन्न होते, किंवा प्रिय व्यक्ती जवळ नसेल तर आठवण येते. किंवा जुन्या आठवणी मनात उचंबळून येऊन मनाचीही कातर अवस्था होते. एकटं एकांतात असू तर संधिप्रकाश अजूनच उदासीन करून जातो. संध्याछाया भिवविती मना अशी अवस्था बहुतेक जणांची असते. एकतर दिवस संपून रात्र सुरु होणार आहे याची ही चाहूल असते. पूर्ण उजेड आणि पूर्ण अंधार या दोहोंच्या मधली ही वेळ असते.

या भीतीचं मूळ मानवाच्या उत्क्रांतीच्या अवस्थेपासून आलं आहे. जंगलांमध्ये राहताना संध्याकाळी अंधार झाल्यावर शिकार करणाऱ्या श्वापदांची भीती वाढत असे. ही अंधारात हिंस्र किंवा विषारी प्राण्यांची वाढलेली भीती, आणि यातून एखादा हिंस्र प्राणी मागे लागला तर जीव मुठीत घेऊन पलायन करणे, यांमुळे आजही संधिप्रकाश पसरला की प्रत्येक मानवाला हुरहूर दाटून येते. आजही अंधाराची भीती वाटते, आणि आजही दिवसा रम्य भासणार निसर्ग, समुद्र, पर्वत, नद्या, जंगले रात्री भयाण वाटतात. त्यामुळे संध्याकाळी देवापुढे दिवा लावणे, शुभंकरोति म्हणणे या गोष्टी करून आपण मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतो.

तर तुम्हाला कोणत्या एखाद्या किंवा अनेक गोष्टींची अशी भीती होती किंवा आहे, आणि त्यावर तुम्ही मात केलीत की करण्याचा प्रयत्न चालू आहे. किंवा असं आहे की ही भीती राहू देत अशीच मला याचं काहीच करायचं नाही. भीतीवर जिद्दीने मात करणारी माणसेच आयुष्यात काही मिळवू शकतात. आजकाल ते काहीतरी म्हणतात ना 'डर के आगे जीत है'. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

सोमवार, २० जुलै, २०२६

पिच्छा


मराठीतला पिच्छा हा शब्द हिंदीतल्या पीछा वरून आलेला असावा. पण पिच्छा मध्ये जो हट्ट आणि वैताग आहे तो काही पीछा मध्ये वाटत नाही. एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणाऱ्या माणसाला आयुष्यात हवं तसं यश नक्कीच मिळतं. काही जण काही गोष्टींचा पिच्छा पुरवतात तर काही जण माणसांचा पिच्छा पुरवतात. एखाद्या ध्येयाचा पिच्छा पुरवणे माणसांचा पिच्छा पुरवण्यापेक्षा नक्कीच सोपं असेल असं वाटतं.

सर्वांनाच जिद्दीने पिच्छा पुरवणं जमत नाही. माणसांचा पिच्छा पुरवायचा म्हणजे एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी सारखं सारखं भंडावून सोडायचं. उदाहरणार्थ जसे आपल्याला सध्या काही बँकांचे किंवा वित्तीय कंपन्यांचे नकोसे कॉल्स सारखे येत असतात. मार्केटिंग, विमा आणि अशा अनेक जाहिरातबाजीवाल्या लोकांना इतर लोकांचा पिच्छा पुरवावाच लागतो. शंभर लोकांपैकी दोन जण जरी त्यांच्या गळाला लागले तरी त्यांचा उद्देश सफलच होणारा असतो.

मला स्वतःला मात्र माणसांचा पिच्छा मुळीच पुरवता येत नाही. आणि आपली घरगुती काही व्यवसाय कौशल्य आधारित कामे असतात, ती आजकाल पिच्छा पुरवल्याशिवाय पूर्णच होत नाहीत. एखाद्याचा पिच्छा न पुरवल्यास माणसे त्यांची कामे प्रामाणिकपणे करताना दिसत नाहीत. अपवाद असतातच. एखाद्याला आपण एखाद्या कामाचा ते मागतील तेवढा मोबदला देत असू तर त्यांचा पिच्छा का पुरवावा लागला पाहिजे? पण त्याशिवाय मनासारखं काम होत नाही. हाही एक प्रकारचा भ्रष्टाचारच नाही का.

काहीजण एखाद्या जोडीदारासाठी त्या व्यक्तीचा तर कधी त्या व्यक्तीसाठी इतरांचा पिच्छा पुरवतात, आणि हवा तोच जोडीदार मिळवतात. नंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात पुढे काय होत असेल ती वेगळी गोष्ट आहे. काही जणांना लग्नाच्या काही वर्षांनंतर पाहून असं वाटतं यासाठीच का इतका अट्टाहास केला होता यांनी. एखादी गोष्ट असो वा व्यक्ती ती मिळेपर्यंतच त्याचं अप्रूप असतं. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप पिच्छा पुरवून ती एकदा मिळाली कि मग मात्र तो केलेला पिच्छा विस्मृतीमध्ये जातो.

पण सगळेच जण पिच्छा पुरवताना केलेल्या कष्टांना विसरून जाणाऱ्यांपैकी नसतात. बऱ्याच जणांना आधी केलेल्या कष्टाची जाणीव कायम राहते. आणि पिच्छा पुरवणे नक्कीच आकर्षणाच्या नियमांपैकीच एक असावे असे मला नेहमी वाटते. 
 
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६


रविवार, १९ जुलै, २०२६

सख्खा


आपल्या जन्मापासून काही सख्खी नाती आपल्याला लाभतात. आणि काही जोडलेली नाती लाभतात. आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, मामा, मावशी, काका, आत्या त्यांची मुलं हे सगळे आपले सख्खे नातेवाईक असतात. मामाचं लग्न होऊन मामी आली, काकाचं लग्न होऊन काकू आली तर त्यांच्याबरोबर येतात ती जोडलेली नाती. सख्खी नाती नेहमी आपली पक्की असतात असं आपल्याला वाटत असतं.

कधी कधी सख्खे दोन भाऊ वा बहिणी यांच्यामध्ये इतकं साम्य असते की हा त्याचा/तिचा भाऊ आहे किंवा ही बहीण आहे असं सांगण्याचीसुद्धा गरज पडत नाही. आणि कधी इतके वेगळे असतात की ते सख्खे आहेत यावर सांगूनही विश्वास बसत नाही. सवयीचंदेखील तसंच जरी सख्खी भावंडं असतील तरी साध्या साध्या सवयीसुद्धा त्यांच्या एकमेकांसारख्या नसतात, किंवा कधी विचार खूप वेगळे असतात की हे एकाच घरातल्या माणसांचे विचार असतील असं खरं वाटत नाही.

जोडलेल्या नात्यांमध्ये थोडी औपचारिकता असते. जोपर्यंत एकमेकांना चांगलं ओळखत नाही तोपर्यंत थोडा कमी मोकळेढाकळेपणा असतो. जोडलेल्या नात्यांमध्येही आपल्याला आपला नातेसंग्रह संपन्न करणारी माणसेही भेटतात. एकसारखे विचार जुळले तर यांच्याबरोबर आपलं नातं वयाच्या बऱ्याच काळानंतर जोडलं गेलंय हे लक्षातदेखील राहत नाही. जरी विचार जुळणं मने जुळण्यासाठी महत्त्वाचं असतं तरी सख्ख्याला आपण जितकी संधी देतो तितकी कधी कधी जोडलेल्याना देत नाही.

कधी काही सख्खी नाती अशी पण दिसतात की इवल्याशा मतभेदाने एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत. नात्यापेक्षा अहंकाराला जास्त कुरवाळले जाते. सख्खेपणाचा लवलेशही त्यांच्यामध्ये उरलेला नसतो. छोटंसं निमित्त आणि एकमेकांमध्ये कायमचा दुरावा आलेला असतो. मला वाटत नाही नुसत्या अहंकाराने सख्ख्यांपासून इतकं तोडून वागता येत असेल. खरं कारण तर हे असेल की त्यांचे एकमेकांशी सख्ख्यांप्रमाणे कधी बंधच जुळले नाहीत. सख्खी असोत वा जोडलेली नाती आपल्याला निभावून न्यावीच लागतात. 

बाकी मनाने गुंफलेली नाती असतात काही, त्यामध्ये सखा किंवा सखी असते, सख्खा किंवा सख्खी यासारखेच असणारे म्हणून त्यांना सखा वा सखी म्हणत असावेत नक्कीच. काही काही गोष्टी आपण सख्ख्यांना आपण सांगू शकत नाही, पण सख्यांना सांगून आपलं मन मोकळं करू शकतो. या नात्यामध्ये कोणतंच बंधन नसते. कोणताच मानपान नसतो, कोणतीच अपेक्षा नसते. फक्त निखळ मैत्री असते. म्हणूनच कवि योगेश म्हणतात,

कहीं तो ये, दिल कभी, मिल नहीं पाते
कहीं से निकल आए, जनमों के नाते