गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२६

महालक्ष्मी

"महालक्षुम्या आल्या", "कशाच्या पायी?", "सुख समृद्धीच्या पायी"!

महालक्षुम्यांना घरात घेताना तुळशीपासून ताम्हणात हळद-चुना मिसळलेल्या पाण्यात एकीने हाताचे तळवे बुडवून हात उमटवायचे, दुसरीने मुखवटे हातात घेतलेलं ताट त्यावर ठेवायचं आणि महालक्षुम्या कशाच्या पायी आल्या आहेत ते सांगत राहायचं. देवघरापाशी, तुळशीपाशी "देवाधर्माच्या पायी", कपाटापाशी "सोन्यारूप्याच्या पायी" "हिऱ्या माणकाच्या पायी", स्वयंपाकघरात "धनधान्याच्या पायी" असं करत करत शेवटी त्यांना स्थानापन्न करण्याच्या जागी आणलं की सुखसमृद्धीच्या पायी त्या तेथे विसावत!


गौरी-गणपती म्हणजे आठदहा दिवस आधीच लगबग सुरु. घराची स्वच्छता, फराळाची तयारी. मी शाळेत असताना सजावटीसाठी काहीतरी नवीन वस्तू घरी बनवत असे. पितळेचे मुखवटे घासून लख्ख करून त्यांना भुवया, डोळे, ओठ, गंध काढत असे. पूर्वी आमच्याकडे गौरींचे धातूचे तीन पाय असलेले स्टॅन्ड होते. त्यामध्ये सर्वात खाली एक मोठा डबा, त्यावर एक लहान डबा आणि त्यावर गडवा असे ठेवायचे. त्यावर स्टँड बसवून त्याला साड्या नेसवून गडव्यावर मुखवटा बसवायचा. डब्यांमध्ये धान्य, बदाम, सुपारी, हळकुंड, रुपया, खारीक असं सवाष्णीची ओटी भरताना ठेवतात ते साहित्य ठेवलं जाई. एका डब्यात फराळ केलेल्यातले गोड पदार्थ लाडू करंज्या वगैरे ठेवलं जात असे. मला स्वतःला पूर्वीपासूनच गोड आवडत नसे आणि आई सांगे या गौरी म्हणजे माहेरी आलेल्या लेकी असतात. तेव्हा मी आईला म्हणे अगं मग त्यामध्ये लाडू करंजी ऐवजी चकली चिवडा भर. आई म्हणे तू बसवशील तेव्हा कर तसं, मला बाई गोडाचंच देऊदेत. आता त्या स्टॅन्ड ऐवजी तयार फायबरचे पाय आणि मुखवटे आईने आणले आहेत. फराळ सगळा पोटात जाण्याऐवजी समोर असतो. आईचं हे एक मला आवडतं. बदलत्या काळाप्रमाणे आपणही बदलायचं तरी मनी भाव तोच. उगीच कर्मकांडाला चिकटून बसायचं नाही.

पूर्वी घरातलं आवरणे, गौरींसाठी मागची आरास वगैरे यात वेळ जात असल्याने आई संध्याकाळी गौरींना आणायची. दुपारी आवरून झालं असलं तरी भर उन्हात नको त्यांना आणायला, संध्याकाळचं येऊदेत म्हणायची. मी खूप लहान असताना आई एकटीच दोन्ही गौरींचं आवरायची. एकदा मी तिला एका गौरीला या वेळेस मी साडी नेसवते म्हणाले आणि छान जमली तेव्हापासून एक गौर ती आणि एक मी तयार करतो. आत्ता मुखवटे असणाऱ्या गौरी साक्षात देवीचं रूप धारण करतात, त्यांच्या हातांवर हळदीकुंकवाचे करंडे दिल्या बरोबर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जिवंत होतात. बहुतेक घरात मध्ये गणपती आणि पुढे बाजूला दोन गौरी असतात, पण आमच्याकडे आजी म्हणायची गौरींच्या मध्ये गणपती बसवू नये, कारण माहिती नाही पण आमच्याकडे गणपती बाजूला असतो. पहिल्या दिवशी आमच्याकडे मेथीची भाजी, बाजरीची भाकरी आणि वरण भात हा नैवेद्य असतो.
 
दुसऱ्या दिवशी गौरींना पुरणाचा नैवेद्य असतो. आजी होती तेव्हा सोळा भाज्यांचा असायचा, आता पाच भाज्यांचा असतो. लहान असताना नुसत्या सजावटीची जबाबदारी घेणारी मी स्वयंपाकात कधी मदत करायला लागले समजलंच नाही. आता पाच भाज्या, तिखट पंचामृत, कढी, पाच चटण्या कोशिंबिरी यांची जबाबदारी माझी, पुरणपोळ्या आमटी मात्र अजूनही आईच बनवते. गौरींना नैवेद्य दाखवून सवाष्णी जेवू घालते. म्हणायचं सवाष्णी पण लहान, मोठे, म्हातारे असे सगळेच असतात त्यात. जेवणाच्या पंगती अजून आहेत तोवरच हळदीकुंकवासाठी गौरींच्या आराशीची तयारी सुरु होते. हळदीकुंकवाला येणाऱ्या बायका आईने कोणती गौर केली आणि मी कोणती केली ते ओळखतात. माझ्या लग्नानंतर नवऱ्याला पण हे कोडं घातलं, इतक्या दोन्ही गौरी एकसारख्या दिसून पण तोदेखील दर वेळेस बरोबर ओळखतो. हा दुसरा दिवस फारच लगबगीचा असतो. मी एक वेळ दमून जाते पण आई अजूनही हा लगबगीचा दिवस कसा न दमता पार पाडते याचं कौतुकच वाटतं.
 
तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन असतं. दही-साखर-भात आणि कानवल्यांचा नैवेद्य दाखवून आई मुखवटे थोडे हलवून ठेवते. पण तसं केल्याबरोबर त्या मूर्तींचे जिवंत भाव नाहीसे होतात. खूप भक्तिभावाने आईने प्रतिकूल परिस्थितीत देखील गौरींचं कधी काही कमी नाही पडू दिलं, आज त्यांनी तिला काही कमी ठेवलेलं नाही. आदल्या दिवशी रात्री आईने कुंकवाचे सपाट करंडे झाकण लावून देवींच्या पुढे ठेवलेले असतात. दुसऱ्या दिवशी ती ते उघडून त्यामध्ये बोटे उमटली आहेत का ते बघते. त्या करंड्यांमध्ये पुसटशा रेषा दिसतात तिला समाधान वाटते. 



गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२६

आळस


दिवसभर लेखाचा विषय लिहून ठेवला, पण लिहिण्याचा आळसच आला. कधीकधी अशी मानसिकता होते की कोणी काही मागितलं नाही, काही डेडलाईन नाही तोपर्यंत एखादी गोष्ट करायचीच नाही. याला सहजरित्या आळसाचं नाव दिलं जातं. पण हा खरंच आळस असतो की थकवा असतो? बऱ्याचदा बराच निवांत वेळ घालवणाऱ्या माणसालादेखील काही गोष्टी पटकन करण्याचा हुरूप येत नाही. अशा माणसाला आपण आळशीच म्हणतो, पण त्यालादेखील मानसिक थकवा असेल कदाचित. शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा जास्तच धोकादायक. शरीराचा थकवा एखाद्या झोपेनंतर निघून जाऊ शकतो, पण मनाचा थकवा झोपही येऊ देत नाही.

आळशी म्हणजे थकवा नसलेले आणि खरोखर आळशी अशा लोकांचं एक बरं असतं, कोणतंच काम पार पाडण्याची यांना चिंताच नसते. बघू, करू यामध्ये यांना छान वेळ मारून नेता येते. मुळात आळशी माणसे कसलं दडपणच घेत नाहीत. यांना आयुष्याचं मोलाचं तत्त्व समजलेलं असतं आणि ते म्हणजे आपण नाही केलं तर दुसरं कोणीतरी करेल, पण काम काही झाल्यावाचून राहणार नाही. कोणीनाकोणी एखादी गोष्ट करणारच आहे तर आपण का कष्ट घ्या. आणि नाहीच झाल्या काही गोष्टी तरी यांना काही फरक पडत नाही. जगबुडी होत नाही, डोंगर कोसळत नाही.

बौद्धिक आळशी लोकांची अजून एक जमात असते, यांना शारीरिक चार कामे सांगा पण विचार करावा लागेल असलं काही सांगू नका. पुस्तक वाचायला सांगू नका, अभ्यास करायला सांगू नका, कोडी सोडवायला सांगू नका, काही लक्षात ठेवायला सांगू नका. थोडासा मेंदूला ताण पडायला लागला की ते विचारच सोडून देतात. इतर घरातले हुशार, विचारवंत बघून घेतील. आपलंच डोकं खपवलं पाहिजे असं काही नाही. खरंतर संगणक आणि एआय यांनी मारलेल्या मजलीमुळे आपण सगळेच बौद्धिक आळशी होत चाललो आहोत. सहज हाताच्या बोटांवर माहिती मिळते मग वाचन करून ज्ञान मेंदूमध्ये साठवून काय करायचंय?

त्यातून आळशी आणि निगरगट्ट हे जर समीकरण जुळून आलं तर अशा लोकांच्या सहवासात असणाऱ्यांची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची कीवच केलेली बरी. यांना लहानपणापासूनच अशी सवय लागलेली असते की चार बोलणी  खा पण काम वाचतंय ना मग बोलणी खाल्ल्याने काही शरीराला भोकं पडत नाहीत. बोला काय बोलायचं ते पण सांगितलेलं काम करणार नाही. एक मात्र छान असतं यांचं की त्यांना अहंकार वगैरे आजिबात नसतो. मत्सर नसतो, क्रोधही नसतो. निम्म्या षड्रिपूंवर इथेच विजय मिळवल्याने बाकीचे तीन सहज हाताळता येतात. शिवाय काही महत्त्वाकांक्षा नसल्याने डोक्यालाही कधी ताप नाही.

घरात टंगळमंगळ केली की ज्याला राहवत नाही असे ते काम करून टाकतात, ऑफिसात टंगळमंगळ केली पण निदान जुजबी दाखवता येत असेल तर ऑफिसमध्येही बाकीचेच काम ओढून नेतात, भले अप्रेजल थोडं कमी होईल पण डोक्याला ताप तर नाही. ठेविले अनंते तैसेचि राहावे ही उक्ती मात्र हे लोक तंतोतंत पाळतात. यांचं कधी बीपी हाय वगैरे होत नाही, पण त्यांच्या आजूबाजूच्यांचं नक्कीच होऊ शकतं. तर तुमच्या सहवासात आहेत का अशी कूल माणसं, जी कूल असतात पण आपण त्यांना आळशी म्हणतो? 

ज्या अवयवांचा मानवाला वापर आणि उपयोग नाही अशा गोष्टी मानवाच्या उत्क्रांतीमध्ये आपोआप बोथट आणि नष्ट होत जातात. अशा या बौद्धिक आणि शारीरिक आळसाने होणार काय तर मेंदू आणि शरीर दोन्ही हळूहळू मानव गमावून बसेल. अशा या काहीही शिल्लक नसलेल्या माणसाला एआय आणि भविष्यातील प्रगत रोबो सहज हरवून मानव जमत नष्ट न होईल तरच नवल. आता हे रोचक असेल की कृत्रिम बुध्दीमत्तेकडून हरून माणूस नष्ट होईल, की नैसर्गिक आपत्तींनी नष्ट होईल, की आपापसात भांडत नष्ट होईल की उत्क्रांतीच्याच उलट्या गंगेने नष्ट होईल. असो आपण तर नसू बघायला. 

सोमवार, १० ऑगस्ट, २०२६

फोटो

खूप पूर्वी फोटोचे तंत्रज्ञान माहिती नव्हते तेव्हा कसलेले कलाकार मोठ्या लोकांची चित्रे काढत. मोठ्या लोकांचीच का, तर चित्रकला ही कला असण्याबरोबरच ते तंत्रज्ञान देखील होते, आणि आपली कला आणि तंत्रज्ञान यांचा केलेला योग्य वापर, आणि कौशल्य यासाठी त्यांना भरघोस मोबदला मिळे. हा मोबदला सामान्य माणूस कुठून देणार, म्हणून चित्रेही मोठ्यांचीच असत. रंग वगैरे तयार करावे लागायचे. आणि ते ही तंत्रज्ञान नसेल तेव्हा माणूस स्वतःला पाण्यात, किंवा प्रतिबिंब पडेल अशा ठिकाणी स्वतःचा चेहरा पाहत असेल तेच त्याचं स्वतःला पाहणं. पण त्याचं रंगरूप जतन मात्र होत नव्हतं. एखाद्याला दुसऱ्या माणसाला आठवायचं असेल तर कल्पनेतच आठवायचं, समोर चित्र किंवा फोटो असं काही नाही.