संकुचित मनोवृत्ती म्हणजे काय असते? डबक्यातले विचार वगैरे ठीकच पण रोजच्या आयुष्यात समजा मला कोणी काही अप्रिय बोललं, तर मी ते जे बोलले त्यामध्ये तथ्य आहे का, आणि त्यानुसार स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणणे शक्य आहे का याचा विचार करण्यापेक्षा सर्वांत पहिली प्रतिक्रिया असते ती म्हणजे मला कसे काय हे बोलतात. दुसरं एक उदाहरण म्हणजे चुका होतात, गैरसमज होतात पण ते दुसऱ्यांनी मुद्दामच केले अशी धारणा ठेवणे. एखाद्या व्यक्तीचा तसा वारंवार अनुभव आला तर गोष्ट वेगळी आहे, पण अशा व्यक्तीकडूनही नेहमीच मुद्दाम केलं जात नसेल ना.
पूर्वतरंग....
सोमवार, ६ जुलै, २०२६
संकुचित
तर माझीसुद्धा अशीच संकुचित मनोवृत्तीच होती पूर्वी. मी काही लहान नव्हते, पण सज्ञान कोणाला म्हणावं हे अठरा या वयावरून ठरण्याइतकं सोपं नक्कीच नाही. मानसिकरीत्या तर नाहीच नाही. तर मी सुद्धा काही लहान नव्हते पण संकुचित होते. कोणी एखादा शब्द अप्रिय बोलला की मला असे कसे म्हणाले, आणि असं का झालं याचं आत्मपरीक्षण करण्यापेक्षा सबबी देत बसणे यामध्ये धन्यता वाटायची. जणू आपलं कधी काही चुकतच नाही असाच नेहमी अविर्भाव असायचा. कोणी बोलल्यावरच कशाला, कधी कुठे आलेल्या अपयशाला सुद्धा सबबीच पुढे असायच्या.
मग आयुष्याच्या एका सुंदर वळणावर तो भेटला. त्याला कोणी काही बोललं, कुठे काही चुकलं की तो आधी त्याच्याकडून काय करता आलं असतं याचा विचार करायचा. मी कधी म्हणाले ते तुला असं असं म्हणाले तर न चिडता ठीक आहे, त्यातला एवढा भाग तर खरा आहे ना असं म्हणून शांत असायचा. कोणत्याही अपमानाला अपयशाला त्याची विक्षिप्त प्रतिक्रिया कधीच नसायची. भले कोणी मुद्दाम त्याच्याशी चुकीचं वागलेलं असू देत. पण त्यातून तो ते माझ्याशी असे वागलेपेक्षा त्यांच्याकडून असं का झालं असावं अशा दृष्टीने विचार करायचा. आणि असं असतानाही लोकांना अशा स्वभावाचा गैरफायदा घेऊ द्यायचा नाही. पण त्यामुळे त्याचं आयुष्य किती सोपं, सुटसुटीत आणि सुंदर आहे हे मला उमगत गेलं.
माझा पटकन प्रतिक्रिया देणारा स्वभावदेखील मग हळू हळू बदलत गेला. ज्यांना मुद्दाम वागायचं ते त्यांच्यापाशी. आपण त्यातून त्यांची काय अगतिकता असेल म्हणून ते असे वागले असतील हाच विचार करायचा. गैरसमज असतील तर आपण म्हणतो माझीच बाजू खरी ते ठीके, पण दुसऱ्याचीही काही बाजू असेलच, ती काय असेल ते पण बघू, समजावून घेऊ असा बदल होत गेला. त्याचा मला आयुष्यात सगळीकडेच फायदा होतो. कुटुंबातील सगळ्या व्यक्तींमध्ये वावरताना, ऑफिसातील लोकांमध्ये काम करताना, मैत्रीमध्ये आणि सगळीकडेच. राग येतच नाही असं नाही. पण तो धुमसत राहण्यापेक्षा शांत होत जातो. स्पष्ट बोलल्याने गैरसमज दूर होत जातात.
एखाद्याच्या सहवासाने आपलं आयुष्य बदलते असं म्हणतात ना. अशी आपलं आयुष्य सुंदर करणारी माणसं माझ्याप्रमाणेच सर्वांना त्यांच्या आयुष्यात लाभू देत हीच देवाकडे प्रार्थना!
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६
रविवार, ५ जुलै, २०२६
रुबाब
आपल्याला आयुष्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटतात. त्यातली काही अशी असतात की मी म्हणजे कोणीतरी आहे. माझे सर्वांनी लाड करा. मला सर्वांनी महत्त्व द्या. माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. काही जण प्रसिद्ध व्यक्ती वगैरे झाल्यावर असे होऊ शकतात, तर काहीजण काहीही कुवत नसतानाही असे असतात. ज्यांना असं घेणं माहिती असतं त्यांना अवतीभवती माणसेही अशीच भेटतात जी त्यांना देतच जातात. स्वतःचे लाड, हट्ट पुरवून घेणं छान जमतं त्यांना. शिवाय केलेल्या छोटाशा गोष्टीचे श्रेय घेणेही छान जमते त्यांना.
अशी व्यक्ती जर प्रसिद्धीच्या झोतात आली, तर ती स्वतःचा रुबाब अगदी छान मिरवू शकते. मिळणारा मानमरातब आपला हक्कच आहे अशीच धारणा तिथे दिसते. त्यांना नेम - फेम मिळालं की स्वतःचं महत्त्व अधिकच चांगल्या रीतीने अधोरेखित करता येतं. त्यांचा जन्मच राजा म्हणून जगण्यासाठी झालेला असतो. राजासारखेच कोणी मागितली तर मदतीलाही पुढे असतात पण त्यामध्ये मला मी केलेल्या मदतीचे पूर्ण श्रेय द्या ही भावना असते. आणि जरी ही व्यक्ती सामान्य माणूस म्हणूनच राहिली तरीदेखील ती राजा म्हणूनच जगते, स्वतःचं मन वगैरे मारून जगत नाही. रुबाब करण्यासाठी माणसाने श्रीमंत किंवा प्रसिद्धच असावं असं काही नाही, ते ज्यांना जमतं त्यांनाच जमतं.
याविरुद्ध असे काही असतात की यांच्यासाठी कोणी काही साधी गोष्ट जरी केली तरी त्यांना ती खूप मोठी वाटते, कोणी काही साधीशीच मदत केली असेल, तेही सहज शक्य होतं म्हणून तर त्याचे यांना फार मोठे उपकार वाटतात. स्वतःहून कोणाला काही काम सांगणं तर लांबच राहिलं, कोणी स्वतःहून यांचं काम करत असेल तरी त्यांना अवघडल्यासारखं वाटतं. मी म्हणजे कोण यत्किंचित प्राणी, माझ्यासाठी कशाला कोणी काही करेल, आणि करत असेल तरी माझ्यासाठी कोणी काही करूच नये. हट्ट आणि लाड हे शब्दही त्यांच्या गावी नसतात.
आता अशी व्यक्ती जर प्रसिद्ध नामांकित कोणी झाली तर पहिल्यांदा त्यांना स्वतःलाच विश्वास नसतो की लोक आपल्याला इतकं ओळखतात आणि इतकं मानतात. कोणी केलेला आदरसत्कार घेणं देखील त्यांना अवघडलेपणाचंच वाटतं. का माझ्यासाठी इतकं करतात, मी कोणी नाही असे काहीसे भाव दिसतात. रुबाब आणि मिरवून घेणं असलं काही यांना जमत नसतं. नेम - फेम मिळूनही हे साधे ते साधेच राहतात. मग लोक त्यांना डाऊन-टू-अर्थ वगैरे म्हणतात. आणि काहीजण प्रसिद्ध नाही झाले तरी ते सर्वांसाठी करतच जातात, तेही कसल्याही श्रेयाची अपेक्षा न करता.
आपण मात्र प्रसंगानुरूप या दोघांच्या मध्ये कुठेतरी असतो. कधीतरी सगळ्यांनी कौतुक केलेलं आपल्याला आवडतं, कधीतरी आपणही कोणाला न मागता काही मदत करतो. कधी कोणासमोर आपण रुबाबाने वागतो तर कधी एकदम साधे होऊन जातो. तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहिलीत का अशी दोन टोकाची माणसे? किंवा तुम्ही स्वतः आहात का यापैकी एक? पहिला झाला राजा प्रकारचा माणूस. राजाच्या विरुद्धार्थी नेहमी रंक असेल असं काही नाही. आता यातल्या दुसऱ्या प्रकारच्या देतच जाणाऱ्या आणि तरीही राजा नसणाऱ्या माणसांना काय नाव द्यायचं?
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६
शनिवार, ४ जुलै, २०२६
लहर
तुम्ही लहरी व्यक्ती आहात की अगदी शिस्तशीर आणि कर्तव्यदक्ष आहात? मी तर अगदीच लहरी असल्याने कर्तव्यदक्ष लोकांबाबत मला खूपच आदर आहे. अगदी मनाचा चंग बांधून वगैरे फार कमीच गोष्टी होतात माझ्याच्याने. किंवा मग आता अगदी आणीबाणीची परिस्थिती आहे तेव्हाच लहर पळून जाते. आणि एखादं काम जेव्हा करण्याची लहर येते तेव्हा मात्र मी एवढं त्याच्या हात धुवून मागे लागेन की तसं काम कधी कोणी केलंच नसेल. शाळेत अभ्यासही असाच लहर असेल तेव्हा केला, पण परीक्षा आली की मग मात्र त्या विषयाच्या हात धुवून मागे. पण या आयत्या वेळी ताण घेण्याच्या सवयीमुळे होतं काय की अजूनही अधून मधून अशी स्वप्नं पडतात की उद्या वेगळाच पेपर आहे आणि मी वेगळाच अभ्यास केलाय. किंवा परीक्षा एका केंद्रावर आहे आणि मी भलत्याच केंद्रावर, आणि मग नंतर स्वप्नच आहे समजलं आणि आता नाही बाबा कोणती परीक्षा द्यायचीये असं लक्षात आलं की हायसं वाटतं.
लहर हे खरं तर स्वच्छंदी असण्याचं लक्षण आहे. समुद्राच्या लाटांना उगीच का लहरी म्हणतात. त्या त्यांना हव्या तशा येतात आणि त्यांना हव्या तशा जातात. पण त्यानेच समुद्राचं सौंदर्य आहे ना. कल्पना करा की प्रत्येक लाट अगदी शिस्तीने पुढे येतेय, एवढे मीटर अंतर ठेवून, ताशी एवढ्याच गतीने वगैरे, तर आपल्याला समुद्रावर फिरण्याची मजा घेता येईल का. एखाद्या छानशा फुलझाडाला रोज एकाच आकाराचं फूल येत नसतं ना. ऋतूसुद्धा वर्षभरात त्याच्या तीन वेगवेगळ्या लहरी आपल्याला दाखवतो. सूर्याचा रोज पसरणारा संधिप्रकाश रोज वेगवेगळा भासतो, आकाशातल्या प्रत्येक नभाचा आकार वेगवेगळा असतो. एवढंच का देव कुठे आपल्या प्रत्येक माणसाला एकसारखं बनवतो. निसर्गामध्येच इतकी लहर आहे, तर माणसाने तरी इतकी शिस्त आणायची कुठून. जो माणूस निसर्गाला जवळचं मानत असेल तो लहरीच असणार.
पण हे असं लहरी असण्याचे खूप तोटे आहेत. तुमच्याइतकीच कुवत असलेली पण जास्त शिस्त असलेली माणसं तुमच्या खूप पुढे निघून जातात. कारण ते लहरीला नाही तर कर्तव्याला महत्त्व देतात. लहानपणी आजीने एखादं काम सांगितलं आणि मी म्हटलं की मूड नाहीये किंवा बोअर झालंय की ती ओरडायची. कसला तुमचा मूड आणि कसला तुमचा बोअर, आमच्या वेळी नव्हतं असलं काही. पण जसजसं वय वाढत जातं, जबाबदाऱ्या येत जातात, तशी लहरीला मुरड घालावीच लागते. कदाचित सगळं जग जिंकण्याइतके नाही आपण पुढे जाणार पण स्वतःचं कुटुंब आणि त्यांचा जिव्हाळा जिंकण्याइतकी शिस्त स्वतःला लावावीच लागते. लहर आणि शिस्तीचा तराजू सांभाळत स्वतःला पुढे न्यावं लागतं.
मनाला लहरच जवळची वाटते पण हेच मन देवाने इतर प्राण्यांपेक्षा जास्तीचं दिलंय माणसाला देवाने. इतर निसर्ग आणि प्राणी लहरी असतात, पण ही लहर आहे हे समजणारं मनच त्यांच्याकडे नसतं. या लहरी मनाला आवरण्यासाठी मग साधूसंतांना अभंग ओव्या रचाव्या लागतात, रामदास स्वामींना मनाचे श्लोक लिहावे लागतात. आणि आपल्यालाही आपली लहर संधी मिळेल तशीच सांभाळावी लागते. मग होते सवय हळू हळू आणि उमगून जातं की उनाड दिवस एखादाच असू शकतो, रोज रोज नाही.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)