बुधवार, १५ जुलै, २०२६

राहणी


प्रत्येकाचं एक ठरलेलं राहणीमान असते, जे कालांतराने बदलत पण जाते. कधी राहणीमान समाज, भौगोलिक प्रदेश, पंथ, संप्रदाय याप्रमाणेदेखील बदलत जाते. आणि सर्वात मुख्य म्हणजे आर्थिक स्तर. आर्थिक स्तराप्रमाणेही राहणीमान बदलत जाते. पेहराव बदलत जातो. आपल्या मराठी मनाने नेहमीच "साधी राहणी, उच्च विचारसरणी" यावर विश्वास ठेवलेला आहे. आपल्याला शिकवलंच असं जातं की नीटनेटकं, स्वच्छ राहावं पण साधंच राहावं. संत चोखामेळा यांनीही म्हणून ठेवलंय "का रे भुललासी वरलिया रंगा"!

यामागे असा विचार नक्कीच असेल की पैसा आज आहे उद्या नाही, महागड्या जीवनशैलीची सवय लावून घेऊन उद्या दिवाळखोरीची पाळी आली तरी कर्जबाजारी न होता तग धरून राहता आलं पाहिजे. आपण मराठी माणसं तशी मध्यमवर्गीयच. आहे त्यात समाधान मानून घेणे वगैरे आपल्या रक्तातच असते. सवय म्हणून हे खरंच चांगलं आहे, त्याने भरपूर व्याप कमी होतात, सुखाने राहता येते. पण काहीजण असे असतात की ज्यांची स्वप्नं मोठी असतात.

एकतर आता आपण ग्लोबल झालो आहोत, पूर्ण जगाशी आपला संपर्क येतो. त्यामुळे कोणाचीही समोरच्यावर पहिली छाप पडते ती दिसण्यातून पडते, पेहरावातून पडते. त्यामुळे ज्या त्या क्षेत्राला साजेसा पेहराव करणे ही आजची चैन नसून गरज आहे. वरल्या रंगालाच भुलण्याचा जमाना आहे. एकदा आपण कोणीतरी बनलो की मग मात्र आपण स्वतः काही कल स्थापित करू शकतो. आजही पहा, श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांमध्ये भरपूर मराठी माणसे दिसतील, पण जग त्यांना किती साधा माणूस असं म्हणूनच ओळखतात.  

या साध्या संस्कारांमुळे पाय जमिनीवर ठेवून राहणं मराठी माणसाला छान जमतं. साधा माणूस असतो तो कशाचाही बडेजाव, ढोंग करत नाही. पण यामुळे कदाचित थोडी महत्त्वाकांक्षा कमीदेखील पडते. आपल्याला एवढं पुरतंय तेवढं बास झालं हीच वृत्ती तयार होणं साहजिक आहे. स्वतःची जाहिरातबाजी कमी पडते. यामध्ये छक्के-पंजे वाले पुढे निघून जातात. आणि साध्या माणसाचं मात्र कौशल्य मागे पडून साधा म्हणूनच कौतुक होत राहतं.

जग बदलतंय तसं होतं काय आहे, की गरजेपुरतं ऐटीत पॉश राहाणं तर ठीक आहे, पण समारंभ भलतेच विनाकारण महागडे होत चालले आहेत. तिकडे दिखावा करावा अशी गरज साध्या साध्या लोकांनाही पडू लागली आहे, त्यासाठी लोकं कर्जबाजारीही होत आहेत. त्या बाबतीत मात्र मी "साधी राहणी, उच्च विचारसरणी" याचाच पुरस्कार करेन. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

मंगळवार, १४ जुलै, २०२६

माहेर


"अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं"

असं भोंडल्याच्या गाण्यांमध्ये लहानपणी म्हणताना मजा यायची. कोणत्याही विवाहित स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माहेर. भले आजकाल शेजारी का माहेर असेना पण माहेर ते माहेर. तसं तर आता कोंडून मारणारी सासरे क्वचितच कुठे असतील. पण तरीही मुलीचा खूप दिवस माहेरी जायला मिळालं नाही की कोंडमारा होतोच. माहेरचं कौतुक करताना कोणतीही मुलगी कधीच थकत नाही. एवढंच का पण माहेरची उणीदुणी असतील तर ती झाकून ठेवते आणि कौतुक मात्र वारेमाप करते.

पूर्वीच्या काळी मुलीला माहेरी जायचं म्हटलं तर माहेराशी निगडित सणांची वाट बघावी लागायची. खूप महिन्यांनी आणि कधी कधी तर खूप वर्षांनी माहेरी जायला मिळायचं. शारीरिक मानसिक सगळे कष्ट सहन करून बिचारी दमून थकून जायची. आता शारीरिक छळ वगैरे नसला तरी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मानसिक थकवा येतोच. सासरी सगळे प्रेमाने वागणारे सगळे असतील तरी माहेरची माया आणि ओढ वेगळीच असते. सासरी भरपूर ऐश्वर्य असेल आणि माहेरी गरीबी असेल तरी त्याही मुलीला माहेर हवंच असतं.

पूर्वी माहेरी जाणाऱ्या मुलीला अनेक भाऊ भावजयाही असत. आईचे लाड तर वेगळेच पण त्यांच्याकडूनही कोडकौतुक होत असे. हल्ली बऱ्याच मुलींना भाऊ नसतो, अशा काही मुलींना सासरी सगळं सांभाळून माहेरही लक्ष द्यावं लागतं तरीसुद्धा ती अतिरिक्त जबाबदारी न मानता त्या ते आनंदाने करतात. लहानपणापासून आपण जिथे राहीलो त्या घराशी आणि जागेशीही आपली भावनिक जवळीक असते. शेजारीपाजारी देखील प्रेमाने विचारणारी माणसे असतात. पण खऱ्या अर्थाने जोवर आई माहेरी असते तोवरच माहेर हे महेर वाटतं.

लहानपणी आई तिच्या माहेरी जायची म्हणजेच आपण आपल्या आजोळी जायचो ती मजादेखील वेगळीच असायची, आईच्या लाडांमुळे तिच्याबरोबर आपलेही लाड व्हायचे. पण माहेरी आलो आता राहा निवांत असं कोणतीच मुलगी करत नाही. तेव्हा आईला माहेरी गेली तरी आजीची काळजी घेताना पाहिलं, आता माहेरी जाऊन नुसताच आराम करण्यापेक्षा आईला काय हवं नको ते बघताना एका ठराविक वयानंतर माहेरी जाऊनही आई आजीची काळजी घ्यायची ते आपसूकच आठवतं.

सासरी जरी सगळं छान असेल पण त्यात एक व्यावहारिकपणा दिसतोच, आपल्याला स्त्रियांना तो जाणवतो. मग व्यवहारांची, कर्तव्याची लोढणी सोडून मायेची फुंकर मिळवण्यासाठी मुलगी माहेरी जाण्यासाठी आसुसलेली असते. माहेर म्हणजे औपचारिकता सोडून आपलेपणाने केलेली विचारपूस, स्नेहाचा वाहणारा झरा. माहेर या शब्दातच किती जिव्हाळा, माया, प्रेम, काळजी आहे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की माहेरासाठी आसुसलेल्यांसाठी आपल्यालाही कोणाचं माहेर होऊन राहता आलं तर ते किती छान असेल.   

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

सोमवार, १३ जुलै, २०२६

नियोजन


नियोजन यासाठी सध्या सर्रास वापरला जाणारा शब्द म्हणजे प्लॅन/प्लॅनिंग. काही लोकांच्या आयुष्यात सर्व काही कसं प्लॅनिंग प्रमाणे ठरवून चाललेलं असतं. एखादं नियोजन बनवणं आणि ते पूर्णत्वास नेणं ही खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. ऑफिसमध्ये तर प्लॅन्स बनवून त्याप्रमाणे कामे तडीस न्यावीच लागतात. आणि त्याची आपल्याला सवयही होऊन जाते. पण आयुष्य म्हणजे ऑफिस नाही. ऑफिसात एखादं काम पूर्ण करण्यासाठी आपल्या कामाच्या वाट्याला जितके पैलू आलेले असतात त्यापेक्षा कितीतरी जास्त पैलू आयुष्याला असतात.

अमुक शाखेतच शिक्षण घेणे, अमुक वयातच लग्न करणे, अमुक वयात मनासारखं घर घेऊन ते मनाप्रमाणे सजवणे, अमुक वयात आणि अमुक आर्थिक परिस्थितीमध्ये असताना मुलांना जन्म देणे, मुलांचे संगोपन ठराविक प्लॅनिंगनेच करणे, हे फारच कमी लोकांना जमत असणार. पहिली सुरुवातच करिअर पासून होते. काही जणांना कितीही मोठं होऊनही आपला कल नक्की कुठे आहे तेच समजत नाही. मग वेगळंच शिक्षण घेऊन आयुष्यभर मनाविरुद्ध काम करत बसणं वाट्यास येतं.

कोणाकोणाला मनासारखा जोडीदार मिळत नाही, मग पुढच्या प्लॅनिंगऐवजी घटस्फोट वगैरे गोष्टींमध्ये पडणं किंवा आहे ते सहन करणं अशा गोष्टी कोणाच्याच नियोजनामध्ये नसतात. इच्छा असूनही सर्वांनाच ठराविक वयात किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये मूल होईलच असं सांगता येत नाही. न सांगता येणारी आजारपणं, ज्येष्ठांचे वेगळे प्रश्न हे सगळं हाताळण्यामध्ये नियोजन कुठे ना कुठे कोलमडतेच. पण तेच एखादा सण-समारंभ साजरा करणे असेल तर त्याचं नियोजन करूनच आपण ते तडीस नेऊ शकतो. अशा वेळी मात्र नियोजन न करण्याने सगळा गलथान कारभार होऊन जाऊ शकतो. 

सणा-समारंभाचं नियोजन करणे आणि पूर्ण आयुष्याचं नियोजन करणे यात खूपच फरक आहे. समारंभ वगैरे आपल्याला एका दिवशी पूर्णत्वास न्यायचा असतो त्यामुळे तो दिवस येईपर्यंत आपण उत्साहाने प्लॅनिंग करून ते पारही पाडतो. पण समारंभाचा जसा शेवटचा दिवस किंवा साजरा होण्याचा दिवस आपल्याला माहिती असतो तसं आयुष्याचं नसते ना.  त्यामुळे आयुष्याचे छोटे छोटे भाग बनवून छोटं छोटं प्लॅनिंग पार पाडणं केव्हाही उत्तम! 

आयुष्याच्या बाबतीत मला तर नेहमी असं वाटतं की नियोजन करून त्याप्रमाणेच वागणाऱ्या लोकांमध्ये नशिबाचाच भाग जास्त असावा. त्यामुळेच वूडी ऍलन चा हा सुविचार माझ्या खूपच जवळचा आहे.

“If you want to make God laugh, tell Him about your plans.” 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६