गुरुवार, १६ जुलै, २०२६

अस्तित्व


एखाद्याचं अस्तित्व आपल्याला मुखत्वे त्याच्या दिसण्यामुळे कळून येतं. डोळ्यांचा मुख्य सहभाग असतो. एखादी अदृश्य गोष्ट अस्तित्वात आहे हे मान्य करणं अवघडच जातं. तरी काही गोष्टी अशा असतात की त्या न दिसूनही त्यांचं अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागतं. ध्वनी-कान, सुगंध-नाक, हवा-त्वचा, आणि चव-रसना या डोळे आणि इतर पंचेंद्रियांना जे जे काही जाणवेल ते सगळं अस्तित्वात असतंच. एखादी व्यक्तीचा आवाज येतो, काही गोष्टींचा ठराविक वास येतो त्याने ती गोष्ट जवळपास असेल असे वाटते, कोणी मागून पाठीवर थाप मारली की कोणीतरी आहे हा संदेश मेंदूला जातो. आणि पदार्थांच्या अस्तित्वाला चव असेल तरच अर्थ आहे. 

आपल्या अस्तित्वाची लोकांनी दखल घ्यावी असं सर्वांनाच वाटतं. ऑफिसमध्ये दोन सहकर्मचारी एकमेकांसमोर आले की एकमेकांना हाय-हॅलो करतात, वरिष्ठांना अभिवादन करतात. ही त्यांनी एकमेकांच्या अस्तित्वाची घेतलेली दखल असते. आपल्या कुटुंबात आपल्या अस्तित्वाची सगळेच दखल घेतात. शाळा कॉलेजात ठराविक मित्र-मंडळी दखल घेतात, जर तुम्ही खूप हुशार किंवा काही स्पर्धांमध्ये भाग घेऊन शाळेचं नाव उंचावणाऱ्यांपैकी असाल तर थोडे अजून सहाध्यायी आणि शिक्षकही तुमची दखल घेतात. आणि जर तुम्ही कोणी सेलेब्रिटी झालात तर अनोळखी ठिकाणी जाऊनही जास्तीत जास्त लोक तुमची दखल घेतात. कधी कधी माणसाला हे अति अस्तित्व पण नकोसं होतं, मग ते निर्जन किंवा अनोळखी ठिकाणी जाणं पसंत करतात.

अस् म्हणजे असणे, अस्ति म्हणजे आहे, आणि त्व हा त्याला लागलेला प्रत्यय. एखाद्या गोष्टीची उपस्थिती किंवा फक्त असणे. पण त्या काही गोष्टींच्या आणि काही व्यक्तींच्या नुसत्या असण्याने एखाद्याच्या आयुष्यात खूप फरक पडत असतो. तू आहेस ही भावनाच खूप सुखद असते. कधी कधी काही गोष्टींना आणि माणसांना आपण इतकं गृहीत धरलेलं असतं की त्यांच्या अस्तित्वाची आपल्याला दखलही नसते. किंवा आपल्याला काही जणांनी इतकं गृहीत धरलेलं असतं की काहींना आपल्या अस्तित्वाची जाणीव नसते.

एखादी घरातली व्यक्ती मृत पावली तरी त्यांच्या वस्तूंमधून किंवा नेहमी उठण्याबसण्याच्या जागांवरून त्यांचं अस्तित्व नंतरही बराच काळ आपल्याला जाणवत राहतं. एखादा असा गोतावळाही असतो की आपल्या अस्तित्वाची तिथे कोणी दखल घेत नाही, मग हळू हळू आपणच आपलं अस्तित्व तिथून कमी करू लागतो. पण ही खरं तर पळवाट आहे. जिथे आपल्या अस्तित्वाची दखल घेतली जात नाही तिथून अस्तित्व कमी करण्यापेक्षा त्यांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडणं जास्त जिद्दीचं ठरेल.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६


बुधवार, १५ जुलै, २०२६

राहणी


प्रत्येकाचं एक ठरलेलं राहणीमान असते, जे कालांतराने बदलत पण जाते. कधी राहणीमान समाज, भौगोलिक प्रदेश, पंथ, संप्रदाय याप्रमाणेदेखील बदलत जाते. आणि सर्वात मुख्य म्हणजे आर्थिक स्तर. आर्थिक स्तराप्रमाणेही राहणीमान बदलत जाते. पेहराव बदलत जातो. आपल्या मराठी मनाने नेहमीच "साधी राहणी, उच्च विचारसरणी" यावर विश्वास ठेवलेला आहे. आपल्याला शिकवलंच असं जातं की नीटनेटकं, स्वच्छ राहावं पण साधंच राहावं. संत चोखामेळा यांनीही म्हणून ठेवलंय "का रे भुललासी वरलिया रंगा"!

यामागे असा विचार नक्कीच असेल की पैसा आज आहे उद्या नाही, महागड्या जीवनशैलीची सवय लावून घेऊन उद्या दिवाळखोरीची पाळी आली तरी कर्जबाजारी न होता तग धरून राहता आलं पाहिजे. आपण मराठी माणसं तशी मध्यमवर्गीयच. आहे त्यात समाधान मानून घेणे वगैरे आपल्या रक्तातच असते. सवय म्हणून हे खरंच चांगलं आहे, त्याने भरपूर व्याप कमी होतात, सुखाने राहता येते. पण काहीजण असे असतात की ज्यांची स्वप्नं मोठी असतात.

एकतर आता आपण ग्लोबल झालो आहोत, पूर्ण जगाशी आपला संपर्क येतो. त्यामुळे कोणाचीही समोरच्यावर पहिली छाप पडते ती दिसण्यातून पडते, पेहरावातून पडते. त्यामुळे ज्या त्या क्षेत्राला साजेसा पेहराव करणे ही आजची चैन नसून गरज आहे. वरल्या रंगालाच भुलण्याचा जमाना आहे. एकदा आपण कोणीतरी बनलो की मग मात्र आपण स्वतः काही कल स्थापित करू शकतो. आजही पहा, श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांमध्ये भरपूर मराठी माणसे दिसतील, पण जग त्यांना किती साधा माणूस असं म्हणूनच ओळखतात.  

या साध्या संस्कारांमुळे पाय जमिनीवर ठेवून राहणं मराठी माणसाला छान जमतं. साधा माणूस असतो तो कशाचाही बडेजाव, ढोंग करत नाही. पण यामुळे कदाचित थोडी महत्त्वाकांक्षा कमीदेखील पडते. आपल्याला एवढं पुरतंय तेवढं बास झालं हीच वृत्ती तयार होणं साहजिक आहे. स्वतःची जाहिरातबाजी कमी पडते. यामध्ये छक्के-पंजे वाले पुढे निघून जातात. आणि साध्या माणसाचं मात्र कौशल्य मागे पडून साधा म्हणूनच कौतुक होत राहतं.

जग बदलतंय तसं होतं काय आहे, की गरजेपुरतं ऐटीत पॉश राहाणं तर ठीक आहे, पण समारंभ भलतेच विनाकारण महागडे होत चालले आहेत. तिकडे दिखावा करावा अशी गरज साध्या साध्या लोकांनाही पडू लागली आहे, त्यासाठी लोकं कर्जबाजारीही होत आहेत. त्या बाबतीत मात्र मी "साधी राहणी, उच्च विचारसरणी" याचाच पुरस्कार करेन. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

मंगळवार, १४ जुलै, २०२६

माहेर


"अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं"

असं भोंडल्याच्या गाण्यांमध्ये लहानपणी म्हणताना मजा यायची. कोणत्याही विवाहित स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माहेर. भले आजकाल शेजारी का माहेर असेना पण माहेर ते माहेर. तसं तर आता कोंडून मारणारी सासरे क्वचितच कुठे असतील. पण तरीही मुलीचा खूप दिवस माहेरी जायला मिळालं नाही की कोंडमारा होतोच. माहेरचं कौतुक करताना कोणतीही मुलगी कधीच थकत नाही. एवढंच का पण माहेरची उणीदुणी असतील तर ती झाकून ठेवते आणि कौतुक मात्र वारेमाप करते.

पूर्वीच्या काळी मुलीला माहेरी जायचं म्हटलं तर माहेराशी निगडित सणांची वाट बघावी लागायची. खूप महिन्यांनी आणि कधी कधी तर खूप वर्षांनी माहेरी जायला मिळायचं. शारीरिक मानसिक सगळे कष्ट सहन करून बिचारी दमून थकून जायची. आता शारीरिक छळ वगैरे नसला तरी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मानसिक थकवा येतोच. सासरी सगळे प्रेमाने वागणारे सगळे असतील तरी माहेरची माया आणि ओढ वेगळीच असते. सासरी भरपूर ऐश्वर्य असेल आणि माहेरी गरीबी असेल तरी त्याही मुलीला माहेर हवंच असतं.

पूर्वी माहेरी जाणाऱ्या मुलीला अनेक भाऊ भावजयाही असत. आईचे लाड तर वेगळेच पण त्यांच्याकडूनही कोडकौतुक होत असे. हल्ली बऱ्याच मुलींना भाऊ नसतो, अशा काही मुलींना सासरी सगळं सांभाळून माहेरही लक्ष द्यावं लागतं तरीसुद्धा ती अतिरिक्त जबाबदारी न मानता त्या ते आनंदाने करतात. लहानपणापासून आपण जिथे राहीलो त्या घराशी आणि जागेशीही आपली भावनिक जवळीक असते. शेजारीपाजारी देखील प्रेमाने विचारणारी माणसे असतात. पण खऱ्या अर्थाने जोवर आई माहेरी असते तोवरच माहेर हे महेर वाटतं.

लहानपणी आई तिच्या माहेरी जायची म्हणजेच आपण आपल्या आजोळी जायचो ती मजादेखील वेगळीच असायची, आईच्या लाडांमुळे तिच्याबरोबर आपलेही लाड व्हायचे. पण माहेरी आलो आता राहा निवांत असं कोणतीच मुलगी करत नाही. तेव्हा आईला माहेरी गेली तरी आजीची काळजी घेताना पाहिलं, आता माहेरी जाऊन नुसताच आराम करण्यापेक्षा आईला काय हवं नको ते बघताना एका ठराविक वयानंतर माहेरी जाऊनही आई आजीची काळजी घ्यायची ते आपसूकच आठवतं.

सासरी जरी सगळं छान असेल पण त्यात एक व्यावहारिकपणा दिसतोच, आपल्याला स्त्रियांना तो जाणवतो. मग व्यवहारांची, कर्तव्याची लोढणी सोडून मायेची फुंकर मिळवण्यासाठी मुलगी माहेरी जाण्यासाठी आसुसलेली असते. माहेर म्हणजे औपचारिकता सोडून आपलेपणाने केलेली विचारपूस, स्नेहाचा वाहणारा झरा. माहेर या शब्दातच किती जिव्हाळा, माया, प्रेम, काळजी आहे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की माहेरासाठी आसुसलेल्यांसाठी आपल्यालाही कोणाचं माहेर होऊन राहता आलं तर ते किती छान असेल.   

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६