सोमवार, १३ जुलै, २०२६

नियोजन


नियोजन यासाठी सध्या सर्रास वापरला जाणारा शब्द म्हणजे प्लॅन/प्लॅनिंग. काही लोकांच्या आयुष्यात सर्व काही कसं प्लॅनिंग प्रमाणे ठरवून चाललेलं असतं. एखादं नियोजन बनवणं आणि ते पूर्णत्वास नेणं ही खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. ऑफिसमध्ये तर प्लॅन्स बनवून त्याप्रमाणे कामे तडीस न्यावीच लागतात. आणि त्याची आपल्याला सवयही होऊन जाते. पण आयुष्य म्हणजे ऑफिस नाही. ऑफिसात एखादं काम पूर्ण करण्यासाठी आपल्या कामाच्या वाट्याला जितके पैलू आलेले असतात त्यापेक्षा कितीतरी जास्त पैलू आयुष्याला असतात.

अमुक शाखेतच शिक्षण घेणे, अमुक वयातच लग्न करणे, अमुक वयात मनासारखं घर घेऊन ते मनाप्रमाणे सजवणे, अमुक वयात आणि अमुक आर्थिक परिस्थितीमध्ये असताना मुलांना जन्म देणे, मुलांचे संगोपन ठराविक प्लॅनिंगनेच करणे, हे फारच कमी लोकांना जमत असणार. पहिली सुरुवातच करिअर पासून होते. काही जणांना कितीही मोठं होऊनही आपला कल नक्की कुठे आहे तेच समजत नाही. मग वेगळंच शिक्षण घेऊन आयुष्यभर मनाविरुद्ध काम करत बसणं वाट्यास येतं.

कोणाकोणाला मनासारखा जोडीदार मिळत नाही, मग पुढच्या प्लॅनिंगऐवजी घटस्फोट वगैरे गोष्टींमध्ये पडणं किंवा आहे ते सहन करणं अशा गोष्टी कोणाच्याच नियोजनामध्ये नसतात. इच्छा असूनही सर्वांनाच ठराविक वयात किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये मूल होईलच असं सांगता येत नाही. न सांगता येणारी आजारपणं, ज्येष्ठांचे वेगळे प्रश्न हे सगळं हाताळण्यामध्ये नियोजन कुठे ना कुठे कोलमडतेच. पण तेच एखादा सण-समारंभ साजरा करणे असेल तर त्याचं नियोजन करूनच आपण ते तडीस नेऊ शकतो. अशा वेळी मात्र नियोजन न करण्याने सगळा गलथान कारभार होऊन जाऊ शकतो. 

सणा-समारंभाचं नियोजन करणे आणि पूर्ण आयुष्याचं नियोजन करणे यात खूपच फरक आहे. समारंभ वगैरे आपल्याला एका दिवशी पूर्णत्वास न्यायचा असतो त्यामुळे तो दिवस येईपर्यंत आपण उत्साहाने प्लॅनिंग करून ते पारही पाडतो. पण समारंभाचा जसा शेवटचा दिवस किंवा साजरा होण्याचा दिवस आपल्याला माहिती असतो तसं आयुष्याचं नसते ना.  त्यामुळे आयुष्याचे छोटे छोटे भाग बनवून छोटं छोटं प्लॅनिंग पार पाडणं केव्हाही उत्तम! 

आयुष्याच्या बाबतीत मला तर नेहमी असं वाटतं की नियोजन करून त्याप्रमाणेच वागणाऱ्या लोकांमध्ये नशिबाचाच भाग जास्त असावा. त्यामुळेच वूडी ऍलन चा हा सुविचार माझ्या खूपच जवळचा आहे.

“If you want to make God laugh, tell Him about your plans.” 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

रविवार, १२ जुलै, २०२६

कौशल्य


प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत कुशल, निपुण असतो. काहीजण अनेक कलागुणांमध्ये कुशल असतात. कधीकधी काही विशिष्ट शिक्षण घेतल्याने काही कौशल्ये प्राप्त होतात, कधीकधी काही जणांमध्ये उपजत काही कौशल्ये असतात तर कधी शिक्षण आणि अभ्यासाने काही कौशल्ये आत्मसात करता येतात. पण जगात काही जण असेही असतात की त्यांच्यामध्ये काहीच कौशल्य नाही, किंवा काही असेही असतात की अतिशय साध्या वाटणाऱ्या एखाद्याला सहज जमतील अशा गोष्टीही त्यांना कौशल्य वाटतात.

प्रत्येक कौशल्य पैसे मिळवण्यासाठीच असावे असे काही नाही, काही कौशल्ये आपण मनाच्या समाधानासाठी देखील शिकतो किंवा उपजत असेल तर त्यामध्ये गोडी वाढवतो. मात्र आपल्यामध्ये असणाऱ्या कौशल्याविषयी अनभिज्ञ असणे, किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याची कदर नसणे हे मात्र खरोखर दुर्दैवी आहे. काही स्वतः अनभिज्ञ असणाऱ्या लोकांना त्यांच्या आजूबाजूला अशी माणसे मिळतात की त्यांना त्याबद्दल जाणीव करून देतील. आपल्या आजूबाजूला असे पारखी लोकं मिळणेही भाग्याचेच आहे.  

काही वर्षांपूर्वीपर्यंत सहज वाटणाऱ्या गोष्टी, आधीच्या पिढीतले लोक सहज करत होते अशा काही गोष्टीही हल्ली कौशल्य झाल्या आहेत. उत्तम स्वयंपाक, छान रांगोळ्या, कलाकुसर, भरतकाम, विणकाम, शिवणकाम हे पूर्वीच्या स्त्रियांना सहज जमत असे, एवढेच का त्या गोष्टी इतक्या सहज मानल्या जायच्या की हे कौशल्य आहे असं करणाऱ्यांनाही माहिती नसे आणि पाहणाऱ्यांनाही. याउलट एखाद्या स्त्रीमध्ये ही कौशल्ये नसतील किंवा काही कमी असतील तर तिला स्त्री म्हणून कमी हुशार समजले जाई.

त्याच स्त्रिया आजच्या पिढीकडे पाहत असतील आणि छोट्या छोट्या गोष्टींचे क्लासेस पाहून आणि वरीलपैकी एखादी गोष्ट जरी छान जमत असेल तर होणारे वारेमाप कौतुक बघून निश्चितच त्यांना हेवा वाटत असेल. मुळात भारतीय समाजात काही गोष्टी म्हणजे कौशल्ये आहेत हेच खूप उशिरा रुजले. आपण सहज मानतो त्या गोष्टी म्हणजे कौशल्ये असू शकतात हेच आपण पाश्चिमात्यांकडून शिकलो आहोत, त्यामुळे कौशल्यांचे मार्केटिंग तर दूरच राहीले.

व्यक्ती जितकी निम्न स्तरातील असेल, मध्यमवर्गीय असेल, तितकी आजही तिच्यामध्ये जास्त कौशल्ये असतात त्याउलट उच्चवर्गीय लोकांमध्ये सगळं आयतं मिळत गेल्याने असेल, कमी कौशल्ये असतात. किंवा जी गोष्ट मध्यमवर्गीयाला सहज वाटत असेल ते उच्चवर्गीयाला कौशल्य वाटू शकते. हे माझे वैयक्तिक निरीक्षण आहे, कदाचित चुकीचेही असेल. आणि उच्चवर्गीयाला स्वतः कौशल्ये आत्मसात करण्यापेक्षा मोबदला देऊन ज्याच्याकडे कौशल्ये आहेत त्यांच्याकडून हवे ते साध्य करता येणार असेल तर तसेही त्याला स्वतःला ती कौशल्ये शिकण्याचे कारणच नाही.   

काही वर्षांपूर्वी आपल्या घरी एखादा सुतार काम करत असे त्यामध्ये जे बारकावे तो बघत असे, तसे काम आज आपल्याला खूप पिच्छा पुरवल्याशिवाय करून मिळत नाही. पूर्वी एखाद्या गोष्टीला मोबदला देऊन जशी कामे करून मिळत तशी कोणत्याच क्षेत्रात आज करून मिळत नाहीत. कामातला प्रामाणिकपणा कधीच लोप पावला आहे. मोबदला देऊन काम करून घेण्यामध्ये डोळ्यात तेल घालून लक्ष दिले नाही तर निकृष्ट दर्जाचे काम पदरी पाडून घ्यावे लागते. किंवा मग त्यासाठी जास्त मोबदला मोजावा लागतो. चांगली कामे करणारी माणसे मिळणे अवघड होत चालले आहे.
  
जेव्हा आपण मानवजातीच्या इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा असे जाणवते की काही वर्षांपूर्वीचा मानव आजच्या माणसापेक्षा जास्त कुशल होता. काही अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या हजारो वर्षांपूर्वी माणसाने सहज करून ठेवल्या त्या आज तंत्रज्ञान वापरूनही शक्य नाहीत. कौशल्य विकसित करणे आणि ते वापरून अजरामर कलाकृती करून ठेवणे यासाठी लागणारा संयम आता माणसामध्ये राहिलेला नाही. जगाने इतका वेग पकडला आहे की कौशल्य शिकायचं तेही पैसे मिळवण्यासाठीच. अन्यथा तो वेळेचा अपव्यय ठरतो. त्यामुळे अशी इच्छा आहे की कधीतरी जगाचा वेग कमी व्हावा आणि प्रत्येकालाच आपल्या कौशल्यामध्ये मनापासून रमण्याची संधी मिळावी.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

शनिवार, ११ जुलै, २०२६

घर


आपण लहानपणापासून एखाद्या घरामध्ये राहत असतो. काहींना नोकरीतल्या बदल्यांमुळे सारखं घर बदलावं लागतं, त्यांना वेगवेगळ्या घरांमध्ये राहावं लागतं. आपले काही नातेवाईक किंवा मित्रमंडळी अशी असतात की त्यांचं घर आपल्याला खूप आवडत असतं. आपणही नेहमी आपलं घर कसही असो, त्यातही ते छान नीटनेटकं कसं ठेवता येईल या प्रयत्नात असतो. काही लोकांची गोष्ट वेगळी असते. त्यांना भटकण्यातून एवढा वेळच मिळत नाही की घराचा काही विचार करावा. कधीही येऊन चार घास खाऊन झोपण्याची सोय झाली म्हणजे काम झालं.

आजकाल सोशल मीडियामुळे लोकं छान छान इंटेरिअर करून त्याचे व्हिडीओ आणि रील्स सोमीवर टाकत असतात. ते पाहून काही घरं पाहून खूप छान वाटतं, काही कल्पनांची नक्कल करावीशी वाटते. काही इतकी चकचकीत असतात की हे घर आहे की हॉटेल असाही प्रश्न पडतो. काही इतकी किचकट नक्षीकामाची असतात की हे घर हे लोकं स्वच्छ आणि आहे तसं कसं ठेवत असतील हाच प्रश्न पडतो.

कोणतेही घर हा त्या घरातील कर्त्या व्यक्तींचा आरसा असतो. काही घरे पाहून आपल्याला असं वाटतेही की माझं घर इतकं छान असतं तर किती मजा आली असती. पण खरं तर झोपडीमध्ये रहा किंवा राजमहालामध्ये, घर हे घरातल्या माणसांनीच बनतं. आयुष्यात कधी ना कधी आपल्याला नव्या किंवा वेगळ्या घरामध्ये घर बदलण्याचे प्रसंग येतात. पण घरातील माणसे तीच असतील तर आपण फक्त वेगळ्या जागेत जातो आणि घराची स्पंदने मात्र तीच राहतात. शेवटी कुठेही राहीलो तरी घरातल्यांशी आपली नाती तीच राहणार असतात. त्याने मनात उमटणारे भाव तेच राहणार असतात. 

मला खरं तर भरलं घर खूप आवडतं, काही जणांकडे असं बघायला मिळतं की, सणावाराला भरपूर माणसे एकत्र जमतात, निदान गणपतीसाठी तरी सगळे एकत्र येतात. ते पाहून असं वाटतं आपल्याकडे एवढी माणसं असती तर किती मजा आली असती. पण बाबांकडे माझे आजोबा एकटेच एकुलता एक मुलगा, आणि आईकडेही माझी आजी एकटीच एकुलती एक. मागच्या पिढीपासूनच त्यांना भावंडेच नाहीत. मग पुढल्या पिढीतही मला एकच काका, एक मामा आणि एक मावशी. गोतावळा जमवायचा तरी कुठून. 

पण भरल्या घरातही सर्वांनाच एकमेकांशी चांगली नाती जपता येतातच असं नाही. हेवेदावेही दिसतात. अनेक वेगवेगळ्या स्वभावांमध्ये हे होणारच. जर घराचे काही नियम करून ते  पाळायचं ठरवलं आणि ते सगळ्यांकडूनच पाळले गेले तरच ते घर माणसांनी भरून आणि टिकून राहील. तरीही प्रत्येक कुटुंब वेगळं राहत असेल आणि वेळप्रसंगीच एकत्र येत असतील तर हल्ली तेवढं नक्कीच जमवून घेतात सगळे, तेवढ्यातच समाधान आहे.   

वास्तू नेहमी तथास्तु म्हणते असं म्हणतात, त्यामुळे सगळ्यांची घरं भरलेली राहोत आणि सर्वांना त्यांच्या घरी आनंदी राहण्याची स्पंदने मिळोत हीच देवाकडे प्रार्थना.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६