मंगळवार, २८ जुलै, २०२६

षड्रिपु-काम

षड्रिपूंपैकी आणखी एक रिपु म्हणजे काम. काम म्हणजे वासना. अनिवार शारीरिक इच्छा किंवा कोणताही गोष्टीचा हव्यास. क्रोधाप्रमाणेच अतिकाम देखील आरोग्याला हानी पोहोचवणारा रिपु आहे. काम अनावर झाला की त्यातूनही क्रोध निर्माण होतो. मग माणसाचे एकातून दोन शत्रू तयार होतात. असेच सहाही रिपु एकमेकांशी संलग्न आहेत. कामाला आवर न घालता येण्याचे प्रकार आणि त्यातून उद्भवणारे सामाजिक दुष्परिणाम आपण बघतच आहोत.

एप्सटिन फाईल्स असेल, अनैतिक संबंध आणि त्यातून होणारी भांडणे, मारामाऱ्या आणि खून असतील, किंवा लहान बालक बालिकांवरचे अत्याचार असतील किंवा असंख्य प्रमाणात वाढलेल्या बलात्काराच्या केसेस असतील. हे सगळे काम नियंत्रित न ठेवल्याने दिसणारे दुष्परिणाम आहेत. माणसाच्या एका क्षणाच्या वासनेचे गंभीर दुष्परिणाम इतरांनाही भोगावे लागतात. ज्याचा नैतिक पाया उत्तम असतो त्याला कामवासनेला आवर घालणे कठीण जात नाही.

आज जग जवळ आल्याने आणि मुलं मुलींची लग्नाची वये वाढल्याने तरुण उमलत्या वयात या षड्रीपुसाठी मुले वाहवत जाताना दिसतात. मग लग्नाचे आमिष दाखवून फसवले अशा बातम्या वारंवार ऐकायला मिळतात. पण लग्नाचे आमिष दाखवले असेल तर लग्न होईपर्यंत संबंध न ठेवणे त्यातल्या मुलीलाही जमलेले नसते, हा तिच्यातल्या काम रिपुचा विजय असतो. किंवा ऑनलाईन ओळख होऊन एखाद्या मुलीने मुलांकडून लाखो रुपये वारंवार उकळले असे समजते ते त्या मुलाला काम रिपुला नियंत्रणात न ठेवता आल्याने झालेले असते. पुराणकाळातील गोष्टींमध्ये वेगवेगळ्या स्त्रियांनी विशिष्ट हेतूने अनेक ऋषींची तपस्या भंग केल्याचे विविध कथांमधून आपल्याला माहिती आहे. हे त्या ऋषींना इतर सर्व रिपुंवर विजय मिळवूनही कामवासनेवर विजय मिळवता न आल्याने शक्य होते. हनी ट्रॅप मध्ये भले भले लोक फसलेले आपल्याला दिसतात. 

काम आणि एका व्यक्तीशी एकनिष्ठ असणे हे आपल्या समाजात आदर्श मानले जाते. हिंदूंसाठी एका पत्नीशी किंवा पतीशी घटस्फोट घेतल्याशिवाय व्यक्ती इतरांशी संबंध ठेवू शकत नाही, दुसरे लग्न करू शकत नाही. तसे केल्यास त्यास अनैतिक समजले जाते. भारतीय समाजात काम या गोष्टीचा एकनिष्ठतेशी असा घनिष्ठ संबंध आहे. माणूस इतर कोणत्याही रिपुपेक्षा कामवासनेने लिप्त असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सर्वात जास्त नाचक्की होते. स्त्रीने स्त्रीशी किंवा पुरुषाने पुरुषाशी संबंध ठेवणे हेदेखील वहिवाटीबाहेरचं मानलं गेलं आहे. कारण निसर्गाने प्राण्यांना काम दिला त्याचा मूळ हेतू आहे प्रजनन जो समलिंगी संबंधांनी साध्य होत नाही.

प्रजनन होण्यासाठी काम महत्त्वाचा आहे, पण काम आणि नैतिकता हे एकमेकांसोबत गुंफलेले असतील तरच तो समाजमान्य आहे. अन्यथा प्रत्येक जीवाची ती मूलभूत गरज असूनही स्वैरपणा केल्यास तो आपला शत्रू ठरतो.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

सोमवार, २७ जुलै, २०२६

षड्रिपु-क्रोध

षड्रिपुंपैकी एक असलेला क्रोध म्हणजेच राग! मनाचा राग फार वाईट, तो आपले इतरांसोबतचे संबंध तर बिघडवतोच शिवाय आपल्याही आरोग्यावर वाईट परिणाम करतो. आणि असं असूनही जाऊदेत या रंगाचे इतके तोटे असतात तर नको आपण रागवायला असं होत नाही. सगळ्या षड्रिपूंपैकी राग हा सर्वात जास्त सामान्यतः आढळणारा षड्रिपू आहे. रागाच्या भरात माणसे काय काय करून बसतील याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. भरपूर साधना, ध्यानधारणा करूनही रागावर नियंत्रण मिळवलंय असा माणूस सापडणे विरळाच.

एखादी व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागली नाही किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे बोलली नाही आपल्याशी वाद घातला की आपल्याला राग येतो. आपली ज्या गोष्टींवरून चिडचिड होते त्याच गोष्टी सतत करत असेल, आपल्याला जे अप्रिय असेल तेच सतत बोलत असेल तर आपण रागाला आवर घालू शकत नाही. कोणी आपला अपमान केला तर आपल्याला राग येतो. कोणी आपल्याला कमी लेखले किंवा विनाकारण चिडवले, डिवचले की आपल्याला राग येतो.

पुराणकाळात असं म्हणतात की कोपगृहे असत. जिला राग आलाय अशी व्यक्ती त्या कोपगृहात जाऊन बसत असे, मग इतरांनी समजून जायचं असायचं की तिला राग आलाय आणि मग तिथे जाऊन त्या व्यक्तीची समजूत काढणे अपेक्षित असे. जिला राग आलाय ती व्यक्तीही नक्कीच तितकी महत्त्वाची असली पाहिजे, नाहीतर आपल्याला कधी कधी राग येतो, पण कोणाला काळातही नाही की आपण रागावलोय. काहींना स्वतःचा राग म्हणजे फार अभिमानास्पद गोष्ट वाटते, आपण रागावलो की सगळे कसे घाबरतात, सगळे आपल्या कसे धाकात आहेत याने काहींना समाधान मिळते, पण ही एक विकृतीच म्हटली पाहिजे.

काही व्यक्ती रागावतात तेव्हा आकांडतांडव करतात, इतरांना शिवीगाळ, मारहाणही करू शकतात, तर काही व्यक्ती फक्त मनातून रागावतात, फक्त धुसफूस करतात, त्या रागावल्या आहेत हे इतरांना कळतही नाही असा त्यांचा राग असतो. असं म्हणतात की राग आला की तो व्यक्त करून टाकणे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगले असते, पण नाती सांभाळताना असे वागणे नक्कीच त्रासदायी ठरू शकते. आणि मनात राग ठेवण्याने नात्यांमधले  वादविवाद टळले तरी त्या व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

काहींना रागात कोणाला काही बोललं तरी नंतर ते नातं सांभाळून घेता येते तर काहींना अगदी असह्य झाल्यावरच इतरांना रागात काही बोलले असतील तरी आपण असे का व्यक्त झालो, ज्याला बोललो त्याला किती वाईट वाटले असेल असं वाटून स्वतःलाच अपराधगंड येतो. पण धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही म्हणतात. त्यामुळे आपण कोणाला रागामुळे दुखावत असू तर राग आवरण्यासाठीचे उपाय शोधणे कधीही चांगले.

रागीट असणे हा एक प्रकारचा स्वभाव आहे, आणि स्वभावाला औषध नसते म्हणतात. पण ज्यांना मनापासून चुकीच्या स्वभावात बदल करण्याची इच्छा असते ते त्यासाठी प्रयत्न नक्कीच करतात. मग राग आलाय असे वाटताना आकडे मोजणे असो, वा मौन राहणे असो वा थ्री इडियट्स मधल्या व्हायरससारखे राग आला की मुद्दाम उलट क्रिया म्हणजे हसणे असो ज्यांना बदलायचंय ते काही ना काही उपाय करून पाहतात.         

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

रविवार, २६ जुलै, २०२६

मर्यादा

कोणत्याही गोष्टीला एखादी सीमा असते, आणि ती ओलांडू नये असा शिष्टाचार आहे. तर हे जे कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात करणे असते ती त्या गोष्टीची मर्यादा असते. खाण्याची मर्यादा, बोलण्याची मर्यादा, पोषाखातली मर्यादा, वागण्याची मर्यादा, नात्यांमध्ये अपेक्षित असलेली मर्यादा, एक सुसंकृत माणूस म्हणून अशा अनेक मर्यादा आपण पाळणे अपेक्षित असते. तेच एखादी व्यक्ती सुसंस्कृत नसेल तर त्याच्याकडून आपण मर्यादांची अपेक्षा करत नाही. उलट समजून घेतो की अमुक अपरिहार्यतेमुळे ही व्यक्ती अशीच वागेल, तर आपणच सावध रहावे हे बरे.

जसजसे जग वृद्धत्वाकडे झुकत आहे, माणसाची प्रगती होत चालली आहे, आणि जगाचा वेग वाढला आहे, तसतशी मर्यादा मात्र कमी कमी होत चालली आहे. पूर्वी व्यसनेच न करणे ही मर्यादा होती. आता प्रमाणात व्यसने करावीत ही मर्यादा आहे. पूर्वी मोठ्यांना उलट बोलणे मर्यादाभंग समजले जाई. आता कोणत्याही बाबीचा मोठ्यांनाही जाब विचारणे मर्यादेत मानले जाऊ लागले आहे. पूर्वी असं मानत असतील कदाचित की मोठे अनुभवावरून सांगतात तर आपल्या भल्याचे असेल, आणि बऱ्याचदा ते तसे असायचे देखील.

आता माहितीचे अनेक स्रोत उपलब्ध असल्याने वयाने लहान व्यक्तीदेखील मुबलक प्रमाणात ज्ञानी असतात. पण तांत्रिक ज्ञान वेगळे आणि आयुष्य कोळून प्यायल्याने भावनिकदृष्ट्या काय योग्य असेल याचे ज्ञान वेगळे. जेव्हा एखादा भावनिक निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तिथे अनुभवी माणसाच्या सल्ल्याची गरज असते, तंत्रज्ञानाची नाही. पण काही गोष्टीत आपल्याला मोठ्यांपेक्षा जास्त समजते म्हणून मोठ्यांना काहीच समजत नाही असे नसते. फक्त एका क्षेत्राची तुलना आयुष्यभराच्या अनुभवाशी, आणि सारासार विचार करण्याची बुद्धी जी अनुभवाने प्राप्त झाली आहे तिच्याशी होऊ शकत नाही.

सोशल मीडियामुळे आणि ओटीटी मुळे तारुण्याच्या बहरात असलेल्या मुलांना तेच जग वाटतं पण तसं नसतं. मग मर्यादा ओलांडली गेली की कधीकधी नसती लचांडेही मागे लागू शकतात. सोशल मीडियामुळे अभिव्यक्ती इतकी सोपी झाली आहे की एखाद्याला एखादी अपमानास्पद गोष्ट समोर बोलण्याचे धाडस एखादी व्यक्ती करू शकणार नाही तीच ते सहज लिहून जाते. वयाचा वगैरेही विचार राहत नाही. वादविवाद साधे न राहता हमरीतुमरी आणि शिवीगाळ भाषेवर घसरतात. हेच आपण समोरासमोर असतो तर एखाद्याला पटकन असे बोललो असतो का हा विचार कोणीच करत नाही. आणि हे केवळ प्रतिसादाची मर्यादा न संभाळल्याने होते.

पोषाखातली मर्यादा फक्त स्त्रीच्या बाबतीतच बदलत चालली आहे. पुरुषांचे पोशाख वर्षानुवर्षे बदलत चालले तरी त्यामध्ये ज्या भागात जितके अंग झाकले जाईल असे पोशाख असत त्या भागांमध्ये तेवढेच कपडे अजूनही घातले जातात. धोतराऐवजी पँट आली असेल, अर्ध्या लुंगीऐवजी बर्मुडा आली असेल. गंजीच्या जागी शर्ट असेल पण कापडाची लांबीरुंदी कमी झालेली नाही. पण स्त्रिया कपड्यांना कात्री लावण्याच्या नवनवीन मर्यादा पार करताना दिसतात अर्थातच कोणी काय घालावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

खाण्याच्या मर्यादा सोडल्या की वेगवेगळे आजार मागे लागतात, आणि ही वैयक्तिक समस्या असल्याने ती मर्यादा देखील ज्याची त्यानेच ठरवायची असते. नात्यांशी प्रामाणिक राहणे, मोठ्यांशी आदराने वागणे या काही कौटुंबिक मर्यादा आहेत तर उघड्यावर रस्त्यावर न थुंकणे, लघुशंका न करणे, वाहतूक शिस्त पाळणे या काही सामाजिक मर्यादा आहेत. पण हल्ली मर्यादा सांभाळणे ही जबाबदारीची किंवा अभिमानाची गोष्ट राहिली नसून ते एक बंधन वाटते. बोलू नये ते बोलणे, वागू नये तसे वागणे या स्वैराचाराला मात्र स्वातंत्र्य किंवा आधुनिकता समजले जाते.      

प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणतात कारण त्यांनी मानव देह धारण करून त्या रूपामध्ये एक सर्वोत्तम मुलगा, पती आणि राजा म्हणून सर्व मर्यादांचे पालन केले. आपण म्हणतो एखाद्या माणसाच्या बोलावरून त्यांनी सीतामातेला वनवासी धाडायला नको होते, पण जनरेट्यापुढे सत्ता किती हतबल असते हे आपण पाहतोच आहोत. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६