शनिवार, ११ जुलै, २०२६

घर


आपण लहानपणापासून एखाद्या घरामध्ये राहत असतो. काहींना नोकरीतल्या बदल्यांमुळे सारखं घर बदलावं लागतं, त्यांना वेगवेगळ्या घरांमध्ये राहावं लागतं. आपले काही नातेवाईक किंवा मित्रमंडळी अशी असतात की त्यांचं घर आपल्याला खूप आवडत असतं. आपणही नेहमी आपलं घर कसही असो, त्यातही ते छान नीटनेटकं कसं ठेवता येईल या प्रयत्नात असतो. काही लोकांची गोष्ट वेगळी असते. त्यांना भटकण्यातून एवढा वेळच मिळत नाही की घराचा काही विचार करावा. कधीही येऊन चार घास खाऊन झोपण्याची सोय झाली म्हणजे काम झालं.

आजकाल सोशल मीडियामुळे लोकं छान छान इंटेरिअर करून त्याचे व्हिडीओ आणि रील्स सोमीवर टाकत असतात. ते पाहून काही घरं पाहून खूप छान वाटतं, काही कल्पनांची नक्कल करावीशी वाटते. काही इतकी चकचकीत असतात की हे घर आहे की हॉटेल असाही प्रश्न पडतो. काही इतकी किचकट नक्षीकामाची असतात की हे घर हे लोकं स्वच्छ आणि आहे तसं कसं ठेवत असतील हाच प्रश्न पडतो.

कोणतेही घर हा त्या घरातील कर्त्या व्यक्तींचा आरसा असतो. काही घरे पाहून आपल्याला असं वाटतेही की माझं घर इतकं छान असतं तर किती मजा आली असती. पण खरं तर झोपडीमध्ये रहा किंवा राजमहालामध्ये, घर हे घरातल्या माणसांनीच बनतं. आयुष्यात कधी ना कधी आपल्याला नव्या किंवा वेगळ्या घरामध्ये घर बदलण्याचे प्रसंग येतात. पण घरातील माणसे तीच असतील तर आपण फक्त वेगळ्या जागेत जातो आणि घराची स्पंदने मात्र तीच राहतात. शेवटी कुठेही राहीलो तरी घरातल्यांशी आपली नाती तीच राहणार असतात. त्याने मनात उमटणारे भाव तेच राहणार असतात. 

मला खरं तर भरलं घर खूप आवडतं, काही जणांकडे असं बघायला मिळतं की, सणावाराला भरपूर माणसे एकत्र जमतात, निदान गणपतीसाठी तरी सगळे एकत्र येतात. ते पाहून असं वाटतं आपल्याकडे एवढी माणसं असती तर किती मजा आली असती. पण बाबांकडे माझे आजोबा एकटेच एकुलता एक मुलगा, आणि आईकडेही माझी आजी एकटीच एकुलती एक. मागच्या पिढीपासूनच त्यांना भावंडेच नाहीत. मग पुढल्या पिढीतही मला एकच काका, एक मामा आणि एक मावशी. गोतावळा जमवायचा तरी कुठून. 

पण भरल्या घरातही सर्वांनाच एकमेकांशी चांगली नाती जपता येतातच असं नाही. हेवेदावेही दिसतात. अनेक वेगवेगळ्या स्वभावांमध्ये हे होणारच. जर घराचे काही नियम करून ते  पाळायचं ठरवलं आणि ते सगळ्यांकडूनच पाळले गेले तरच ते घर माणसांनी भरून आणि टिकून राहील. तरीही प्रत्येक कुटुंब वेगळं राहत असेल आणि वेळप्रसंगीच एकत्र येत असतील तर हल्ली तेवढं नक्कीच जमवून घेतात सगळे, तेवढ्यातच समाधान आहे.   

वास्तू नेहमी तथास्तु म्हणते असं म्हणतात, त्यामुळे सगळ्यांची घरं भरलेली राहोत आणि सर्वांना त्यांच्या घरी आनंदी राहण्याची स्पंदने मिळोत हीच देवाकडे प्रार्थना.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

शुक्रवार, १० जुलै, २०२६

गरज

आपल्याकडून नकळत असं होत असते की आपल्याला असं वाटतं की अमुक माणसाची मला अजिबात गरज नाही, असली तर त्यालाच असेल. म्हणून आपण अशा लोकांशी नकळतपणे का होईना थोडं अधिकारवाणीने वागतो. मी म्हणजे कोणीतरी भारी आणि तुम्ही नेहमी माझंच ऐकलं पाहिजे असा आपला आविर्भाव असतो. पण गरज त्यालाच म्हणत असावेत जी पडली कीच आपल्याला त्याचं महत्त्व समजतं. कोणत्या गरजेला आपल्याला कोण उपयोगी पडेल याचे आपण अंदाज सुद्धा बांधू शकत नाही.

आपल्या अवतीभवती अशीही माणसे असतील जे आपल्याबद्दल असं समजत असतील की यांचा मला काय उपयोग, पडली तर यांनाच माझी गरज पडेल. विशेषतः अनेक नातेवाईकांमध्ये एखाद्याची परिस्थिती थोडी निम्न असेल अशा वेळी तर इतर सगळे त्यांना गृहीतच धरतात. अमुक व्यक्ती वयस्कर आहे तर तिलाच माझी गरज लागणार, अमुक कमी आर्थिक स्तरातील असेल तरी त्यालाच माझी गरज पडेल. असे बऱ्याच जणांचे गैरसमज असतात. पण प्रत्येकच गरज फक्त पैशाने भागेल अशी नसते ना. म्हणून तर 'गरजवंताला अक्कल नसते' आणि 'अडला हरी गाढवाचे पाय धरी' अशा म्हणींचा उगम झाला असावा.

विचार करा एखाद्या व्यक्तीचा आपल्याकडून अपमान झाला असेल, किंवा आपल्याला कधी कोणी खूप अद्वातद्वा बोललं असेल आणि उद्या आपल्याला त्यांचीच किंवा आपल्या अपमानकर्त्याला आपली गरज पडली तर नाक घासत जावेच लागणार. गरज अहंकाराला दूर ठेवण्याचे काम करते. आणि हे जगच असं बनलंय की कितीही पैसा असला तरी माणसाला माणसाची गरज पडतेच. जर कोणाला वाटत असेल माझ्याकडे खूप ऐश्वर्य आहे म्हणून मला कोणाची गरज नाही किंवा मी कोणाला कसंही वागवेन तर असे अहंकार उतरायला वेळ लागत नाही.

लहानपणी आपण गोष्ट शिकलेली असते ती अशी की जंगलाचा राजा सिंह एकदा झाडाखाली झोपलेला असतो आणि झंवर खेळत असलेला उंदीर त्याच्या अंगावर पडतो. सिंह झोप मोडली म्हणून खूप रागावतो, आणि त्या उंदराला मारून टाकण्याच्या तयारीमध्ये असतो. पण उंदीर गयावया करतो म्हणून सिंह त्याला सोडून देतो. काही दिवसांनी सिंह एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकतो तेव्हा हाच उंदीर ते जाळं कुरतडून सिंहाची सुटका करतो. किती छान छान गोष्टी आपण ऐकलेल्या असतात पण प्रत्यक्ष आयुष्यात वागताना त्याचे मतितार्थ मात्र विसरून गेलेलो असतो.

आणि फक्त एखाद्याची गरज कधीतरी पडू शकते असा स्वार्थी विचार ठेवून सगळ्यांशी खोटं गोड वागण्यापेक्षा नेहमीच सगळ्यांशी हेवेदावे, कटुता किंवा काही पूर्वग्रह असतील ते सगळं बाजूला ठेवून चांगलं वागायला काय हरकत आहे.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

गुरुवार, ९ जुलै, २०२६

मनिम्याऊ

मी खूप लहान असताना बाबांनी एक मांजरीचं पिल्लू कुठूनसं आणलं होतं. मी आणि माझी बहीणही लहानच होतो. त्या पिलासोबत खेळायला, त्याला काय हवं नको ते बघायला आम्हाला खूप आवडू लागलं. तिचं फार मोठं वेगळं नाव वगैरे आम्ही ठेवलं नव्हतं, तिला आम्ही मनीच म्हणायचो. तर मांजर हा फार लाघवी प्राणी. स्वतःचे लाड कसे करून घ्यायचे ते तिला छान जमायचं. आमचं घर खालीच होतं, घरासमोर बाग वगैरे होती. तर ती मनी तिचे विधी त्या बागेतल्या मातीमध्ये जाऊन उरकायची.

ती तिला हवं तेव्हा भटकायला जायची आणि तिला हवं तेव्हा घरी यायची. मनी मोठी होत गेली तशी तिचे निरागस निळसर डोळे करारी हिरव्या डोळ्यांमध्ये रूपांतरित झाले, पण लाडिकपणा मात्र तोच राहिला. मग एकदा असं समजलं की तिला पिल्ले होणार आहेत. तिला ४  पिल्ले झाली. पिल्ले झाली की मनी त्यांना सात जागी फिरवते. आम्ही मोजलं नाही कधी पण थोड्या थोड्या दिवसांनी मनी त्यांची जागा बदलायची खरी. अंगणात आंब्याचं झाड होतं, स्वतः त्यावर जाऊन बसायची आणि खाली पिल्लाना आवाज देत बसायची. झाडाच्या खोडाला पिलांना पुढच्या पायांच्या नखांना धार लावायला शिकवायची. पिल्ले आपलीच शेपटी पकडण्यासाठी गोल गोल फिरत खेळत ते बघायला खूप मौज वाटे. 

आधी मनी उंदीर कुठे कधी खायची आम्हाला कधी समजलं नाही, पण पिलांसाठी दोनतीनदा तिने अर्धमेले उंदीर आणले होते. घरामध्ये त्याची घाण मात्र ठेवली नाही. तिच्या पिलांना शी करायला कुठे जायचं ते आम्ही बाहेर मातीमध्ये ठेवून शिकवायचो. तिला शेवग्याच्या शेंगा आणि उडदाचे तळलेले पापडही खूप आवडायचे. आम्ही शाकाहारी असल्याने आमच्याकडून मात्र तिला फक्त दूध-पोळीच मिळायची. मांसाहारासाठी ती स्वतःवरच पूर्णपणे अवलंबून होती. सकाळी आमचे दूधवाले आले की त्यांच्या मापट्याने तिच्या बशीत पण थोडं दूध ओतायचे.

तिच्या पिलांपैकी दोन थोडी मोठी झाल्यावर आम्ही सोडून आलो, दोन घरातच थांबली. त्यातीलही एक बोका होता तो नंतर घर सोडून निघून गेला. मनीची पिल्ले आल्यानंतर आम्ही पुन्हा पिलांशी खेळण्यात दंग होऊन गेलो. अशी मनीला बऱ्याचदा पिल्ले झाली. त्यातली बरीचशी घरात राहीली काही निघून गेली, बहुतेक करून बोके होते ते निघून गेले. काही आम्ही सोडून आलो. पिल्ले जास्त मोठी झाल्यावर सोडली तर कुठेही अगदी गाडीवर जाऊन त्यांना सोडून आलो असलो तरी ती काही दिवसांनी घरी परतत असत, त्याचं आम्हाला फार आश्चर्य वाटे. 

एकदा एक पिल्लू खूपच सुंदर झालं होतं मनीला तिचं नाव आम्ही ऐश्वर्या ठेवलं होतं. आतपर्यंत जितक्या मांजरी झाल्या त्यात खरोखर ती खूपच देखणी होती. ती आजिबात घराबाहेरच पडत नसे, बरीच मोठी झाली तरी ती कधीच घराबाहेर गेली नाही. तिचा स्वभाव खूपच भेदरट होता. कुठून काही पडल्याचा आवाज आला तरी ती घाबरून मांडीवर येऊन बसत असे. हिचं कसं होणार अशी आम्हालाच चिंता लागून होती. एकदाच पहिल्यांदा ती घराबाहेर गेली आणि नंतर घरी पुन्हा कधी आलीच नाही. ती इतकी घाबरट होती की तिला कदाचित रस्ताही ओलांडता येत नसेल आणि मांजर घरी परततेच तेव्हा तिचं काही बरंवाईट झालं असेल असा आमचा आम्हीच समज करून घेतला आणि वाईट वाटून घेतलं.

तर मनीपासून सुरु झालेला हा प्रवास, मनी म्हातारी होऊन गेली तरी तिची वंशवेल आमच्याकडे चालूच राहीली होती. काही पिल्ले कधी घरातच दगावत तेव्हा त्यांना टेकडीवर जाऊन आम्ही पुरून येत असू. खूप वाईट वाटे. अनेकदा मन्यांची नवजात पिल्ले बोक्यांनी येऊन पळवली. खूप आश्चर्य वाटायचं. मग ते समजल्यावर तीही खबरदारी घेऊ लागलो. पण नंतर नंतर काही पिलांचं घरात असताना मरून जाणं, पिल्ले नवीन असताना मांजरीने घरात उंदरे आणणं त्याची घाण होणं, बोक्यांनी पिल्ले पळवून नेणं या गोष्टींचा त्रास होऊ लागला.

आमच्याकडे शेवटची मांजर राहिली होती तिला जरा जास्तच वर्षे पिल्ले झाली. म्हणजे आम्हाला वाटायचं ही म्हातारी झाली आहे, कधीही जाईल. पण काही दिवसांतच तिचं पोट फुगलेलं दिसायचं. खूप जास्त वयात पिल्ले झाल्याने की काय पण ती पहिलीच अशी मांजर निघाली जिने शेवटी शेवटी स्वतःचीच पिल्ले खाल्ली, बोक्यांनी तर नेलीच काही. नंतर नंतर ती खूप घाणेरडीही राहू लागली. तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती नेमकी चतुर्थी-एकादशीलाच घरात उंदरे-पक्षी मारून आणायची, ती पूर्ण न खाता त्यांचे अवशेष घरात सोडून द्यायची. एकदा देवघरातच मेलेला उंदीर ठेवून गेली होती.

या शेवटच्या अनुभवांनंतर मात्र आम्ही मांजरी पाळणं बंद केलं, तरी साधारण पंधरा ते वीस वर्षे आम्ही मांजरींच्या सहवासात राहीलो, त्याही आमचं कुटुंबच होत्या. त्यांच्या सहवासात ताणतणाव खरंच जाणवत नसतील पण तेव्हा तशी जाणीव नव्हती. आता फ्लॅट सिस्टीममुळे मांजर काय कोणताच प्राणी पाळणं मला शक्य वाटत नाही. आणि इतकी वर्षे त्यांच्या संगतीमध्ये राहून मन भरलं असेल कदाचित.