सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

षड्रिपु-मत्सर

षड्रिपुंपैकी सहावा शत्रू हा मत्सर होय. हा अतिशय सुप्त असा रिपु आपल्यामध्ये दडलेला असतो हे आपलं आपल्यालाच माहिती नसते. सहज म्हणून आपली नकळत इतरांशी तुलना होत असते. जर ही तुलना मनाला त्रास करून घेणारी नसेल तर काहीच हरकत नाही. पण त्याच्याकडे आहे ते माझ्याकडे का नाही, एखाद्याला आपणच आपल्यापेक्षा कमी लायक समजत असू आणि अशा व्यक्तीने आपल्यापेक्षा जास्त प्रगती केली की मत्सर जास्तच उफाळून येतो. मी जास्त लायक असून हे त्याला कसं मिळालं हा भाव आपलंच मन खात असतो. जोवर मत्सराला इतर रिपुंची साथ नाही तोवर तो फक्त आपलं मानसिक नुकसान करत असतो.

कधी कधी मत्सर हा भावंडांमध्येही बघायला मिळतो, शेजाऱ्यांबद्दल असू शकतो, इतर नातेवाईकांबद्दल असू शकतो, मित्रमैत्रीणींबद्दल असू शकतो आणि सर्वात महत्त्वाचा न टाळता येणारा मत्सर हा ऑफिस सहकारी आणि व्यवसाय असेल तर इतर व्यावसायिक यांच्याबद्दल असतो. कारण यामध्ये थेट आपली प्रतिष्ठा कमी जास्त होत असते. समान पदावर काम करणाऱ्या दोन सहकार्यांपैकी एकाला बढती किंवा जास्त पगार मिळू लागला की दुसरा आपोआपच कमी लायक ठरतो आणि ही गोष्ट बहुधा कोणालाच सहज घेता येत नाही. कधी याचा फायदा असाही होऊ शकतो की मग ती नोकरी बदलून आपण इतर ठिकाणी जास्त पद-पगाराची नोकरी शोधतो.

अशा प्रकारे आपण आपल्या प्रगतीसाठी मत्सराचा वापर केला तर तो वाईट नाही. पण अशक्य गोष्टींमध्ये तुलना करून आपल्या मनाला त्रास देणे, किंवा क्रोध आणि मद हेही उत्पन्न होऊन आपल्याला ज्याच्याबद्दल मत्सर वाटतो त्याला त्रास देणे गुन्हा असते. लोभ आणि मोहामुळे तर मत्सर निर्माण होतोच पण कामामुळेही मत्सर निर्माण होऊ शकतो अमुक व्यक्तीला इतर कोणी दुसरी व्यक्ती आवडतेय, मी का नाही हा तो मत्सर असू शकतो.

रावणाने रामाचा योद्धा म्हणून मत्सर केला आणि मोक्षप्राप्ती करवून घेतली. आपण इतरांचा मत्सर करतो की नाही, तुलना करतो की नाही हे आपलं आपल्याला माहिती असतं. मत्सर सोडून देऊन निखळ मनाने इतरांचं कौतुक करता येणं हे निरोगी मनाचं लक्षण आहे. आणि असं निरोगी मन आपल्याजवळ असेल तर इतरांकडे भौतिकदृष्ट्या आपल्यापेक्षा जास्त गोष्टी असतील तरी निरोगी मनाचं समाधान त्यापेक्षा कितीतरी मोठं आहे.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

षड्रिपु-मद

माणसाला चांगल्या गोष्टींचा अभिमान असणे ही चांगली गोष्ट आहे. पण त्या अभिमानाचा उन्माद झाला किंवा अहंकार झाला की तो मद असतो. माणसाकडे सत्ता असेल तर तो मदांध होणे खूप सोपे असते. एकदा एखाद्याला समजलं की काही ना काही कारणाने कोणी त्याचा विरोध करू शकत नाही की अशा माणसाला मद उत्पन्न होतो. मग इतरांशी वागताना सारासार विचार राहत नाही. ज्यांना गरज असेल त्यांची आणखी पिळवणूक करण्याची वृत्ती निर्माण होते.

धन-संपत्ती-सत्ता प्राप्त होऊनही ज्यांना मद उत्पन्न होत नाही त्यांच्यावर खरोखर चांगले संस्कार प्राप्त झालेले असतात. कधीकधी काहीजण उन्मत्तपणा उघड दाखवतात तरी काहींना मंद असतो पण ते आपली प्रतिमा एवढी संपत्ती-सत्ता असूनही आमचे पाय मातीचेच आहेत अशी करण्यात यशस्वी झालेले असतात. उघड काही दाखवण्यापेक्षा सत्तेचा छुपा वापर करणे त्यांना साधलेले असते. अशा वेळी माणसाची प्रतिमा मालिन होत नाही पण चुकून असलेली सत्ता गेली तर त्यांच्या मदाचा पूर्ण निचरा होतो. 

जर आपण शून्यातून उभे राहिलेले असू तर आज आपल्याकडे संपत्ती आहे म्हणून मदोन्मत्त होऊ नये. जरी आपण आपल्या बळावर ते कमावलेलं असलं तरी कालच्या पायावर हा आज उभा आहे हे कायम लक्षात असू द्यावे. आज आपल्याकडे सर्व काही आहे म्हणून अहंकार करू नये. मला माझ्या संपत्तीचा अहंकार असेल, तर जगात माझ्यापेक्षा श्रीमंत लोकही असतील, आज नसतील तर उद्या निर्माण होतील. आज माझ्याकडे सत्ता असेल तर उद्या कदाचित नसेल. आज मला ज्ञानी असल्याचा अहंकार असेल तर चांगदेवांना मुक्ताई भेटायला वेळ लागत नाही. सौंदर्याचा अहंकार असेल तर उद्या वृद्धत्व येणार आहे हे विसरू नये. 

मदोन्मत्त माणसाला काम-क्रोध-लोभ-मोह आणि मत्सर हे इतर षड्रिपु आपोआप येऊन मिळतात. यातला एक एक शत्रूच इतका घातक आहे की अहंकाराने हे सगळे शत्रू आपल्या ठायी जमा झाले तर माणसाची काय अवस्था होईल याची कल्पनाच न केलेले बरे. रावण हा सर्वज्ञ असूनही मदोन्मत्त झाल्यामुळे त्याला काम पूर्ण करण्यासाठी इतरांच्या स्त्रीया पळविण्याची दुर्बुद्धी झाली, सर्व देवांवर विजय मिळवण्याचा लोभ निर्माण झाला, प्रभू श्रीरामांनी आव्हान दिले असता क्रोध उत्पन्न झाला, सीतामातेला स्वतःजवळच ठेवण्याचा मोह झाला आणि श्रीरामांबद्दल एक योद्धा म्हणून मत्सर निर्माण होऊन त्यातच त्याचा नायनाट झाला. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

गुरुवार, ३० जुलै, २०२६

षड्रिपु-मोह

मोह आणि लोभ हे एकच वाटू शकतात पण तसे नाही. मोह हा क्षणिक देखील असू शकतो पण लोभ हा स्वभावाचाच एक भाग बनून जातो. मोहासाठी एक क्षण पुरतो म्हणतात, पण तो एकच क्षण इतका भयानक असू शकतो की आयुष्यभराचं नुकसान करू शकतो. रस्त्यावर पडलेली मौल्यवान वस्तू उचलावी की उचलू नये, उचलली तर कोणाची आहे शोधून ज्याची त्याला परत द्यावी की आपल्याजवळच ठेवण्याचा मोह बाळगावा. यामध्ये मोह सारासार विवेकबुद्धीवर भारी पडू शकतो.

मोह एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या क्षणी एखाद्या प्रकारे वागण्याचाच असेल असं नाही. मोह हा नात्यांचादेखील असतो. कधीकधी आपल्या मोहपाशाने आपण आपल्या जवळच्या लोकांना मोकळं न सोडल्याने त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. वस्तू, वास्तू आणि माणसे यांपैकी कशाचाच मोह नाही असा निर्मोही माणूस सापडणे कठीण आहे. काहींना खाण्यावर नियंत्रण राहत नाही. आवडीचा पदार्थ समोर आला आणि पथ्यामुळे तो वर्ज्य असेल तरी तो खाण्याचा मोह बऱ्याच लोकांना आवरता येत नाही. त्यामुळेच काटेकोर पथ्य पाळणारी माणसे फार कमी दिसतात.

जर मनाचा निग्रह मोठा असेल तर माणूस मोहाला दूर सारू शकतो. मोह न होण्यामागे नैतिकता तर क्षणाची असते पण मनाचा निग्रह फार कठोर असावा लागतो. नाहीतर खरेदीला गेलं आणि काही घ्यायचं नसेल, आवश्यकता नसेल तरी आवडलं म्हणून घेणं, चटपटीत पदार्थ दिसले की त्यावर ताव मारणे या गोष्टींचा मोह आवरता आवरत नाही. मार्केटिंगवाले आपल्याला मोहात अडकवण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत असतात. व्यसनाधीन माणसाला रोज मनाचा निश्चय करूनही रोज व्यसनाचा मोह होतो. व्यसन हे मोहाचं चक्र आहे अशा चक्रातून बाहेर पडता न आल्यास मोह हा माणसाचा मोठा शत्रू होऊन जातो.

मोहापायी जमवलेल्या वस्तुंनी घरही अपुरं पडायला लागतं. एखादी वस्तू खूप जुनी झाली तरी त्याचाही मोह आपल्याला सुटत नाही, काहींमध्ये आपल्या आठवणी लपलेल्या असतात, तर काही येतील उपयोगी या मोहाने जमवून ठेवलेल्या असतात. कुठे चार दिवस बाहेर गेलो की बदल म्हणून बरे वाटते आणि परत मनाला घराची ओढ लागते, हा आपल्याला आपल्या घराबद्दल असलेला मोह असतो, त्या घरातल्या माणसांबद्दल असलेला मोह असतो. हौसेने प्राणी पाळले तर त्यांचाही लळा लागतो. हा कोणाचा लळा लागणेही मोहच आहे. थोड्या प्रमाणात मोह असणे वाईट नाही, पण मोहाने माणूस अंध होणे चुकीचे आहे. कोणतीही गोष्ट त्याज्य करायची वेळ आली तर तिचा मोह पटकन सोडता आला पाहिजे.

मोहवून टाकणाऱ्या अनेक गोष्टी अनेक प्रलोभने आपल्या सतत समोर येत असतात, पण क्षणभरच मोहरून जाऊन मोहामध्ये न अडकता स्वतःला त्या मोहजालातून वेळीच बाहेर काढणे ज्याला जमते तोच मोहावर विजय मिळवू शकतो. रामायणातही मोहाचा उत्तम वापर करून घेतलेला आहे, कैकेयीला पुत्रमोह आणि सीतामातेला सुवर्णमृगाचा मोह झाला नसता तर रामायण ना घडते!

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६