शनिवार, १८ जुलै, २०२६

वाढदिवस


कोणालाही आपला वाढदिवस म्हणजे मोठा आनंदाचा दिवस असतो. एक काळ असायचा, ज्या काळात मुलांना शाळेत घालण्याच्या वेळेस सगळ्या मुलांची जन्मतारीख ही एक जूनच असायची. कधीकधी जनसालही लक्षात नसे. डोक्यावरून हात पलीकडच्या कानाला लागला की मूल शाळेत घालण्याच्या वयाचे झालेले असे.
आजी-पणजीच्या काळात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, होळीच्या आदल्या दिवशी, गौरीपूजनाच्या दिवशी असे त्यांचे जन्मदिवस लक्षात ठेवलेले असायचे. आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे कोणताही महिना त्यामध्ये एक तरी उल्लेखनीय सण किंवा घटना असल्याशिवाय जात नाही. त्यामुळे त्यांची पद्धतही चांगलीच म्हणायची.

आताचा एक काळ आहे की पालक बाळाची जन्मतारीख-वार-महिना  जन्मवेळ मिलिसेकंदासहित नोंद करून ठेवतात. अशा वेळी वाढदिवसाचे महत्त्व वाढले नसेल तरच नवल. माझ्या लहानपणी काही ठराविक वर्षांचे होईपर्यंत हौस म्हणून लहान मुलांचे वाढदिवस केले जात. त्यातही फार मोठा सोहळा वगैरे नसे. घराजवळचीच थोडीफार बच्चेकंपनी बोलावून त्यांना केक-चॉकलेट आणि थोडा खाऊ दिला जाई. त्या दिवशी उत्सवमूर्ती असल्याने असेल कदाचित, वाढदिवस म्हणजे काहीतरी खास असं  लहानपणापासून मनावर बिंबलं जातं.

पण माझ्यासारखे काहीजण असतात ज्यांना आपला वाढदिवस म्हणजे विशेष काही न वाटता इतर दिवसांप्रमाणे एक सामान्य दिवस वाटतो. काही माणसे पाहण्यात आहेत की कितीही वय झालं तरी अमक्यातमक्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून रुसून बसतात. मला तर याच्या अगदी उलट वाटतं. कोणी शुभेच्छा नाही देऊ शकले तर विशेष काय आहे त्यात एवढे. इतरांसाठी तर तोसुद्धा इतर अनेक दिवसांसारखाच आणखी एक दिवस असतो. मार्केटिंगसाठी आपल्याला सेवा पुरवणाऱ्या काही संस्था आपल्याला इमेल किंवा मेसेजवर शुभेच्छा पाठवतात.

कोणाच्या शुभेच्छा आलेल्या आवडत नाहीत असं नाही, एखाद्याने आपण इतके महत्त्वाचे नसतानाही आठवून फोन किंवा मेसेज केला तर नक्कीच छान वाटते. पंतप्रधानांची एक साईट आहे. बहुतेक तिकडे रजिस्टर केलं असेल तर तिथूनही शुभेच्छांचं एक पत्र इमेलवर प्राप्त होते. पंतप्रधान या पदावर व्यक्ती कोणीही असो पद देशातील सर्वांत मोठ्या पदांपैकी एक आहे. आणि एखाद्याला वैयक्तिकरित्या ओळखत नसताना त्यांचा द्वेष वा जवळचे समजणारे आपण कोण. तर हे पत्र ऑटोमेटेड आहे हे पूर्णपणे माहीती असूनही ते मिळाल्याचाही आनंद होतो. पण खूप थाटमाट करावा आणि भरपूर लोकांना बोलावून आपलं कौतुक करून घ्यावं इतका महत्त्वाचा हा दिवस मला नक्कीच वाटत नाही.

बरेच जण वाढदिवशी अनाथाश्रमांना दान करणे, धार्मिक दानधर्म करणे, वृक्षारोपण करणे, सामाजिक उपक्रम राबवणे वगैरे चांगल्या प्रकारे आपला दिवस व्यतित करतात. खूप गोतावळा न आवडणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना उत्सवमूर्ती व्हायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. आणि अगदी काहीच न करणे हादेखील पर्याय आहेच.      

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

शुक्रवार, १७ जुलै, २०२६

व्यक्त


मी, माझे, मला सर्वप्रथम आणि बाकीचे सगळे माझ्यानंतर अशी कोणाची वृत्ती दिसली तर त्यांना आपण स्वार्थी म्हणतो. पण खरं बघायचं तर सगळीकडे सगळेजण असाच विचार करताना दिसतात. अगदी विरळ प्रमाणात दुसऱ्यांचा विचार आधी करतात असे काहीजण दिसतात. पण अशा लोकांना त्रासच जास्त होताना दिसतो. स्वार्थी असलं की त्रास कमी असतो, त्यामुळे खरं तर स्वार्थी असणं हे कोणाच्याही सोयीचं आहे. स्वार्थी माणसाला कधीच मनाला मुरड घालावी लागत नाही, आणि कोणालाही मनाप्रमाणे वागायला मिळालं की तणावही कमी असतो.

मला वैयक्तिकरित्या कोणालाच नाही म्हणता येत नाही. आता हा अवगुण समजला जातो, पण आमच्यावर संस्कार झाले तेव्हा शक्य तेवढी आपण इतरांना मदत करावी असेच संस्कार झाले. त्याही पुढे जाऊन जर आपल्या आवाक्यात नसेल आणि कोणाला नाही म्हणावं लागलं तर त्याचा चक्क अपराधगंड येतो. आजूबाजूला कोणाला फटकन काहीही बोलणारी माणसं दिसतात, पण मी मात्र कोणाला लागेल असं बोलू शकत नाही. आणि समजा अगदी ठरवून बोललंच कधी तर जे सहज इतरांना बोलतात आणि विसरून जातात तसं होत नाही. आपण असं उगीच बोललो का, थोडं सौम्य काही म्हणायला हवं होतं का, त्याला/तिला काय वाटलं असेल असलंच कितीही वेळ वाटत राहतं.

काय म्हणावं या स्वभावाला, फटकन बोलून मोकळे होणाऱ्या लोकांमध्ये मनामध्ये काही साचून तणाव निर्माण होत नसावेत, पण असे अनेक जण असतात की ते बोलू न शकल्याने मनामध्ये गोष्टी साचून ताण घेतात किंवा कधी बोलून मोकळे झालेच तर आपण असे का बोललो याचाही ताण घेतात, म्हणजे मानसिक ताणापासून बोलून काय किंवा न बोलून काय सुटका नाहीच. राशींप्रमाणे माणसाचे तसे तसे स्वभाव आणि भोग असतात म्हणतात, ते ढोबळमानाने नक्कीच खरं असावं. नाहीतर जगात सगळी माणसे एकसारखीच भांडकुदळ किंवा एकसारखीच शांत नक्कीच दिसली असती.

कोणाला काही बोलू न शकणाऱ्या किंवा मदतही जमली नाही म्हणून वाईट वाटून घेणाऱ्या लोकांमध्ये मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, माझी प्रतिमा सगळ्यांपुढे एक चांगला माणूस म्हणून उभी रहावी ही अपेक्षा असेल का, की एखाद्याला खरंच मनापासून कोणालाच दुखवायला आवडत नसेल? मग आपल्याला कोणी चांगलं म्हणो अथवा वाईट? अंतर्मुख लोकांना कोणाला काही बोलण्यापेक्षा न बोलणं जास्त सोयीचं वाटतं. मुळात बोलण्याचेच कष्ट वाटतात. मग हळू हळू ते कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटणं, कोणी वाईट वागलं तर त्याला ते बोलूनच दाखवणं यापेक्षा बोलण्याचे कष्ट न घेणं जास्त पसंत करतात, आणि त्याचा ताणही घेणं सवयीने कमी होत जात असेल.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

गुरुवार, १६ जुलै, २०२६

अस्तित्व


एखाद्याचं अस्तित्व आपल्याला मुख्यत्वे त्याच्या दिसण्यामुळे कळून येतं. डोळ्यांचा मुख्य सहभाग असतो. एखादी अदृश्य गोष्ट अस्तित्वात आहे हे मान्य करणं अवघडच जातं. तरी काही गोष्टी अशा असतात की त्या न दिसूनही त्यांचं अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागतं. ध्वनी-कान, सुगंध-नाक, हवा-त्वचा, आणि चव-रसना या डोळे आणि इतर पंचेंद्रियांना जे जे काही जाणवेल ते सगळं अस्तित्वात असतंच. एखादी व्यक्तीचा आवाज येतो, काही गोष्टींचा ठराविक वास येतो त्याने ती गोष्ट जवळपास असेल असे वाटते, कोणी मागून पाठीवर थाप मारली की कोणीतरी आहे हा संदेश मेंदूला जातो. आणि पदार्थांच्या अस्तित्वाला चव असेल तरच अर्थ आहे. 

आपल्या अस्तित्वाची लोकांनी दखल घ्यावी असं सर्वांनाच वाटतं. ऑफिसमध्ये दोन सहकर्मचारी एकमेकांसमोर आले की एकमेकांना हाय-हॅलो करतात, वरिष्ठांना अभिवादन करतात. ही त्यांनी एकमेकांच्या अस्तित्वाची घेतलेली दखल असते. आपल्या कुटुंबात आपल्या अस्तित्वाची सगळेच दखल घेतात. शाळा कॉलेजात ठराविक मित्र-मंडळी दखल घेतात, जर तुम्ही खूप हुशार किंवा काही स्पर्धांमध्ये भाग घेऊन शाळेचं नाव उंचावणाऱ्यांपैकी असाल तर थोडे अजून सहाध्यायी आणि शिक्षकही तुमची दखल घेतात. आणि जर तुम्ही कोणी सेलेब्रिटी झालात तर अनोळखी ठिकाणी जाऊनही जास्तीत जास्त लोक तुमची दखल घेतात. कधी कधी माणसाला हे अति अस्तित्व पण नकोसं होतं, मग ते निर्जन किंवा अनोळखी ठिकाणी जाणं पसंत करतात.

अस् म्हणजे असणे, अस्ति म्हणजे आहे, आणि त्व हा त्याला लागलेला प्रत्यय. एखाद्या गोष्टीची उपस्थिती किंवा फक्त असणे. पण त्या काही गोष्टींच्या आणि काही व्यक्तींच्या नुसत्या असण्याने एखाद्याच्या आयुष्यात खूप फरक पडत असतो. तू आहेस ही भावनाच खूप सुखद असते. कधी कधी काही गोष्टींना आणि माणसांना आपण इतकं गृहीत धरलेलं असतं की त्यांच्या अस्तित्वाची आपल्याला दखलही नसते. किंवा आपल्याला काही जणांनी इतकं गृहीत धरलेलं असतं की काहींना आपल्या अस्तित्वाची जाणीव नसते.

एखादी घरातली व्यक्ती मृत पावली तरी त्यांच्या वस्तूंमधून किंवा नेहमी उठण्याबसण्याच्या जागांवरून त्यांचं अस्तित्व नंतरही बराच काळ आपल्याला जाणवत राहतं. एखादा असा गोतावळाही असतो की आपल्या अस्तित्वाची तिथे कोणी दखल घेत नाही, मग हळू हळू आपणच आपलं अस्तित्व तिथून कमी करू लागतो. पण ही खरं तर पळवाट आहे. जिथे आपल्या अस्तित्वाची दखल घेतली जात नाही तिथून अस्तित्व कमी करण्यापेक्षा त्यांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडणं जास्त जिद्दीचं ठरेल.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६