गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२६

आळस

दिवसभर लेखाचा विषय लिहून ठेवला, पण लिहिण्याचा आळसच आला. कधीकधी अशी मानसिकता होते की कोणी काही मागितलं नाही, काही डेडलाईन नाही तोपर्यंत एखादी गोष्ट करायचीच नाही. याला सहजरित्या आळसाचं नाव दिलं जातं. पण हा खरंच आळस असतो की थकवा असतो? बऱ्याचदा बराच निवांत वेळ घालवणाऱ्या माणसालादेखील काही गोष्टी पटकन करण्याचा हुरूप येत नाही. अशा माणसाला आपण आळशीच म्हणतो, पण त्यालादेखील मानसिक थकवा असेल कदाचित. शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा जास्तच धोकादायक. शरीराचा थकवा एखाद्या झोपेनंतर निघून जाऊ शकतो, पण मनाचा थकवा झोपही येऊ देत नाही.

आळशी म्हणजे थकवा नसलेले आणि खरोखर आळशी अशा लोकांचं एक बरं असतं, कोणतंच काम पार पाडण्याची यांना चिंताच नसते. बघू, करू यामध्ये यांना छान वेळ मारून नेता येते. मुळात आळशी माणसे कसलं दडपणच घेत नाहीत. यांना आयुष्याचं मोलाचं तत्त्व समजलेलं असतं आणि ते म्हणजे आपण नाही केलं तर दुसरं कोणीतरी करेल, पण काम काही झाल्यावाचून राहणार नाही. कोणीनाकोणी एखादी गोष्ट करणारच आहे तर आपण का कष्ट घ्या. आणि नाहीच झाल्या काही गोष्टी तरी यांना काही फरक पडत नाही. जगबुडी होत नाही, डोंगर कोसळत नाही.

बौद्धिक आळशी लोकांची अजून एक जमात असते, यांना शारीरिक चार कामे सांगा पण विचार करावा लागेल असलं काही सांगू नका. पुस्तक वाचायला सांगू नका, अभ्यास करायला सांगू नका, कोडी सोडवायला सांगू नका, काही लक्षात ठेवायला सांगू नका. थोडासा मेंदूला ताण पडायला लागला की ते विचारच सोडून देतात. इतर घरातले हुशार, विचारवंत बघून घेतील. आपलंच डोकं खपवलं पाहिजे असं काही नाही. खरंतर संगणक आणि एआय यांनी मारलेल्या मजलीमुळे आपण सगळेच बौद्धिक आळशी होत चाललो आहोत. सहज हाताच्या बोटांवर माहिती मिळते मग वाचन करून ज्ञान मेंदूमध्ये साठवून काय करायचंय?

त्यातून आळशी आणि निगरगट्ट हे जर समीकरण जुळून आलं तर अशा लोकांच्या सहवासात असणाऱ्यांची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची कीवच केलेली बरी. यांना लहानपणापासूनच अशी सवय लागलेली असते की चार बोलणी  खा पण काम वाचतंय ना मग बोलणी खाल्ल्याने काही शरीराला भोकं पडत नाहीत. बोला काय बोलायचं ते पण सांगितलेलं काम करणार नाही. एक मात्र छान असतं यांचं की त्यांना अहंकार वगैरे आजिबात नसतो. मत्सर नसतो, क्रोधही नसतो. निम्म्या षड्रिपूंवर इथेच विजय मिळवल्याने बाकीचे तीन सहज हाताळता येतात. शिवाय काही महत्त्वाकांक्षा नसल्याने डोक्यालाही कधी ताप नाही.

घरात टंगळमंगळ केली की ज्याला राहवत नाही असे ते काम करून टाकतात, ऑफिसात टंगळमंगळ केली पण निदान जुजबी दाखवता येत असेल तर ऑफिसमध्येही बाकीचेच काम ओढून नेतात, भले अप्रेजल थोडं कमी होईल पण डोक्याला ताप तर नाही. ठेविले अनंते तैसेचि राहावे ही उक्ती मात्र हे लोक तंतोतंत पाळतात. यांचं कधी बीपी हाय वगैरे होत नाही, पण त्यांच्या आजूबाजूच्यांचं नक्कीच होऊ शकतं. तर तुमच्या सहवासात आहेत का अशी कूल माणसं, जी कूल असतात पण आपण त्यांना आळशी म्हणतो? 

ज्या अवयवांचा मानवाला वापर आणि उपयोग नाही अशा गोष्टी मानवाच्या उत्क्रांतीमध्ये आपोआप बोथट आणि नष्ट होत जातात. अशा या बौद्धिक आणि शारीरिक आळसाने होणार काय तर मेंदू आणि शरीर दोन्ही हळूहळू मानव गमावून बसेल. अशा या काहीही शिल्लक नसलेल्या माणसाला एआय आणि भविष्यातील प्रगत रोबो सहज हरवून मानव जमत नष्ट न होईल तरच नवल. आता हे रोचक असेल की कृत्रिम बुध्दीमत्तेकडून हरून माणूस नष्ट होईल, की नैसर्गिक आपत्तींनी नष्ट होईल, की आपापसात भांडत नष्ट होईल की उत्क्रांतीच्याच उलट्या गंगेने नष्ट होईल. असो आपण तर नसू बघायला. 

सोमवार, १० ऑगस्ट, २०२६

फोटो

खूप पूर्वी फोटोचे तंत्रज्ञान माहिती नव्हते तेव्हा कसलेले कलाकार मोठ्या लोकांची चित्रे काढत. मोठ्या लोकांचीच का, तर चित्रकला ही कला असण्याबरोबरच ते तंत्रज्ञान देखील होते, आणि आपली कला आणि तंत्रज्ञान यांचा केलेला योग्य वापर, आणि कौशल्य यासाठी त्यांना भरघोस मोबदला मिळे. हा मोबदला सामान्य माणूस कुठून देणार, म्हणून चित्रेही मोठ्यांचीच असत. रंग वगैरे तयार करावे लागायचे. आणि ते ही तंत्रज्ञान नसेल तेव्हा माणूस स्वतःला पाण्यात, किंवा प्रतिबिंब पडेल अशा ठिकाणी स्वतःचा चेहरा पाहत असेल तेच त्याचं स्वतःला पाहणं. पण त्याचं रंगरूप जतन मात्र होत नव्हतं. एखाद्याला दुसऱ्या माणसाला आठवायचं असेल तर कल्पनेतच आठवायचं, समोर चित्र किंवा फोटो असं काही नाही.


गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

कलागुण

प्रत्येक माणसामध्ये काहीतरी खास असतं कधीकधी ते ज्याचं त्याला माहिती असतं तर कधीकधी आपल्यामध्ये काय कलागुण आहेत हे आपलं आपल्यालाच माहिती नसतं. नशिबाने काहींना त्यांच्यामध्ये जे सर्वोत्तम असतं ते आयुष्यात खूप लहान वयातच गवसतं आणि मग ते त्यामध्ये जगात सर्वोत्तम बनतात. उदाहरणार्थ भारतरत्न लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर. मग काही मधल्या फळीतले कलाकार असतात. खूप मोठ्या जनसमुदायासमोर कदाचित त्यांची ओळख नसते पण निदान त्यांच्या राज्यात त्यांचं खूप मोठं नाव असेल. काहींना आपल्या शहरातच ओळखतात तर काहींना केवळ आंतर शाळा-कॉलेज इत्यादींमध्येच चमकता येतं, पुढे सगळं मागे पडत जातं.

कधीकधी आपल्याला ज्याची आवड असते त्यातच आपली कारकीर्द निश्चित करता येते तर कधीकधी एखाद्या क्षेत्रात उतरल्यानंतर आवड निर्माण होते. या दोन्ही बाबी चांगल्याच आहेत, पण काहींना दुर्दैवाने नावडत्या क्षेत्रात काम करावे लागते किंवा आधी आवडणाऱ्या क्षेत्रात नंतर तेचतेच करून नावडतेपणा निर्माण होऊ शकतो. पण जबाबदाऱ्या इतक्या असतात की स्वतःला ओढतताणत पैसे कमावण्यासाठी नावडते कामदेखील लक्षपूर्वक करावंच लागतं. कधी आपल्यातल्या कलागुणांचा आणि करिअरचा काहीही संबंध नसतो. आणि कधीकाळी शाळा कॉलेजात, राज्यात ज्यात चार लोक ओळखत असतील ते कलागुण मागे पडून जातात.

हल्ली सोशल मीडियामुळे आपले कलागुण जगासमोर आणणे सोपे झाले आहे. कितीतरी वेळा असे कंटेन्ट डोळ्यांसमोर येते की असं वाटतं हे किती सुमार आहे, पण तेही आवडणारे लाखोंच्या घरात असतात. यापूर्वी असं असायचं जो सर्वोत्तम त्यालाच संधी मिळण्याची शक्यता जास्त असायची. कारण त्यांना निवडणारा कोणी ना कोणी पारखी असायचा, जो त्यातल्या त्यात चांगलं निवडायचा. पण आता कोणीही आपली प्रतिभा जगासमोर आणू शकतो आणि जगामध्ये तर प्रत्येक प्रकारची अभिरुची असणारे लोक असणारच. कितीतरी व्हिडीओ किंवा ब्लॉग्स असे असतात की हे किती सामान्य आहे आणि यापेक्षा हे चांगलं करणाऱ्या अमक्यामक्याला आपण ओळखतो, पण तो अमका सोशल मीडियावर पोस्ट करत नसल्याने कोणाला माहिती पडत नाही.

IQ नुसारच बघायचं ठरलं तरी अगदी कमी हुशार, मध्यमपेक्षा थोडे कमी, मध्यम, मध्यमपेक्षा थोडे जास्त आणि सर्वोत्तम असे गट पडतात. हीन अभिरुची, मध्यम अभिरुची आणि उच्च अभिरुची असेही गट पडू शकतात. पूर्वी यातल्या कोणाला प्रसिद्धी मिळेल ते माध्यमांच्या हाती असायचं आणि शक्यतो उच्च अभिरुचीकडे त्यांचा कल असायचा. पण आता जे गट आहेत यातल्या कोणत्याही गटाने काही कंटेन्ट बनवलं तर ते इतर गटातल्या लोकांना एकतर आवडणार नाही किंवा झेपणार नाही, पण त्यांच्या त्यांच्या गटामध्ये ते पाहिलं आणि आवडलं जाणारच. सोशल मीडियाचा साधा हिशोब आहे, जे जास्त बघितलं जाईल ते जास्त प्रसिद्ध होईल. त्यामुळे ज्या गटाची जितकी संख्या जास्त तो गट तितका जास्त प्रसिद्ध. आणि जगात या सगळ्याच गटातले लोक असणारच.

"The whole problem with the world is that fools are full of confidence and wiser people are full of doubts." या न्यायाने ज्याच्यामध्ये खरंच काही गुण असतात त्यांना शंका असते की मला तर फारच कमी येतंय, यामध्ये आणखी महारथ मिळवली पाहिजे, तोपर्यंत त्यामध्ये अगदीच सामान्य असलेला माणूस आपले कलागुण जगापुढे आणून मोकळा होतो. कधी कधी अशाही गोष्टींना प्रसिद्धी मिळते की यांना गुण म्हणावं का असाही प्रश्न पडतो. पूर्वी उच्च अभिरुचीच समोर येत असल्याने आपण सुमार किंवा मध्यम असू तरी सर्वोत्तम म्हणजे काय असते ते ज्याला प्रसिद्धी मिळाली असेल त्याच्याकडे बघून समजायचे. सध्याच्या जे जास्त पाहिलं जाईल ते जास्त चांगलं  या व्याख्येमुळे अभिरुचीची व्याख्या मात्र नक्कीच बदलत चालली आहे.