गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

साचा

एखादी वस्तू नेहमी त्याच आकाराची आणि त्याच नक्षीची बनवायची असली की त्याचा साचा बनवणं जास्त सयुक्तिक ठरतं. असा साचा तयार असला की सगळी मेहनत वाचते आणि हवी ती वस्तू पटकन तयार होते. अशा एकसारख्या वस्तू आपल्या समोर असल्या की आपल्याला लगेच ओळखू येतं की या एकाच साच्यातल्या आहेत आणि मग त्या साच्याचा आकाराचा अंदाज आपल्या डोळ्यांसमोर येतो. आपल्या मनातही असेच कित्येक अदृश्य साचे बनवून तयार असतात. आपल्या समोर एखादी अनोळखी व्यक्ती आली की आपल्याकडच्या कोणत्या साच्यात ती व्यक्ती अचूक बसतेय याचा आपल्याकडून नकळत विचार केला जातो. 

समजा ती व्यक्ती स्त्री असेल तर तिने कसे कपडे घातले आहेत, कोणते दागिने घातले आहेत, कशी केशरचना केली आहे याकडे आपलं लक्ष जातं. जर या सगळ्या गोष्टी एकदमच साध्या किंवा आपल्या दृष्टीने जुनाट असतील तर आपला साचा म्हणतो, ही रूढी परंपरांना चिकटून राहणारी असावी, हिला इंग्रजी बोलता येत नसावं, ही उदारमतवादी नसावी वगैरे वगैरे. आणि याऐवजी याउलट पेहरावातली स्त्री आपल्यासमोर आली तर आपला साचा म्हणतो ही गृहकृत्यदक्ष नसावी, हिला घरातल्यांची काही काळजीच नसेल, ही स्वार्थी आणि स्वतःपुरतंच पाहणारी असेल, कदाचित उद्धटही असेल, तिला अहंगंड असेल आणि बरंच काही!

एखादी व्यक्ती अतिशय शुद्ध आणि प्रमाण भाषा किंवा फाडफाड इंग्रजी बोलत असेल तर नकळत आपण तिला ज्ञानी आणि सभ्य ठरवून टाकतो आणि तसं नसेल तर एखाद्याच्या बुद्धिमत्तेची कदर होतही नाही. एखाद्याला त्याच्या जाती-धर्मावरून तर एखाद्याच्या प्रांतावरूनही आपण ठरवून टाकतो की ही व्यक्ती अशी असेल म्हणून. असेच कित्येक साचे आपण लोकांच्या वागण्याबोलण्यावरूनही बनवत असतो. सगळ्यांनी एकमेकांना कोणत्याही साच्यात न घालता एक व्यक्ती म्हणून तुम्ही कसे आहात याची इतरांना ओळख व्हावी, म्हणूनच तर शाळा वगैरे अशा संस्थांमध्ये गणवेश असतात. 

पण असं किती वेळा झालं असेल ना की एखाद्याला पाहून त्या व्यक्तीबद्दल आपण मत बनवलं आणि प्रत्यक्षात ती व्यक्ती अगदीच वेगळी निघाली? आपल्यालाही हे माहितीच असतं की या सगळ्या गोष्टींवरून एखाद्याबद्दल मत बनवणं चुकीचं आहे, पण एखादं कोणीतरी अनोळखी पुन्हा कुठेतरी ओळखीचं होण्यासाठी आपल्याला दिसतं आणि परत आपण कोणतातरी साचा वर काढून त्याला त्यात बसवतो, आणि चांगला परिचय झाला की पुन्हा एकदा अजून एक साचा गळून पडतो. 

दैनिक गोवन वार्ता साठी केलेलं लिखाण..






शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

नवीन

नवीन वर्ष आलं की मी हे करणार, ते करणार. नवीन ठिकाणी नोकरी लागली की मी असं काम करणार. नवीन ठिकाणी फिरायला गेलं की मी अमुक अमुक बघणार. किती नवीन गोष्टी येत असतात ना आयुष्यात? नवीन म्हणजे एखादी गोष्ट एकतर पूर्ण जगासाठीच नवीन असते किंवा आपल्यासाठी नवीन असते. नवीन गोष्टींचं आकर्षण आणि अप्रूप प्रत्येकच सामान्य माणसाला असतं, असं आकर्षण वाटलं नाही तर आपण साधू-संत होऊन जाऊ.

खूप दिवस तेच तेच कपडे वापरले की ते कपडे फाटले, विरले नसले आणि मापात असले तरी नवीन खरेदी करावीशी वाटतेच. जी गोष्ट कपड्यांची तीच नेहमी वापरात असणाऱ्या इतर वस्तूंची देखील! जुनं ते सोनं असलं तरी नवं ते हवंच असतं. सारखं काय तेच तेच, असं सगळ्यांनाच वाटतं, आणि तेच माणूस असल्याचं लक्षण आहे. कोणाचं कितीही छान चाललं असलं तरी आयुष्यात नवीन काहीतरी घडावं असं सगळ्यांनाच वाटतं. 

प्रत्येक जण आपापल्या अभिरुचीप्रमाणे नवीन गोष्टींची वाट पाहत असतो. नवं पुस्तक, नवा चित्रपट, नवीन टीव्ही सिरीयल, नवं गाणं, नवा प्रवास, नवीन गॅजेट्स यांची ओढ आपल्याला असतेच. कोणाला नवीन माणसांना भेटायला आवडतं, कोणाला नवीन ठिकाणांना भेट द्यायला आवडतं, कोणाला नवनवीन खाद्यपदार्थ खायला आवडतात तर कोणाला सारखे स्वतःचे नवीन फोटो सोशल मीडियावर टाकायला आवडतात, शिवाय ते टाकले की नव्या कमेंट्स आणि नव्या लाईक्सच्या आपण प्रतीक्षेत असतो.

जुनं जाऊ देऊन नवीन येणं हा निसर्गाचाच नियम आहे. येणारा प्रत्येक क्षण हा नवीन असतो, आणि तो आपल्याला जगायला मिळतो हे आपलं भाग्य असतं. केशवसुत देखील म्हणतातच, "जुने जाऊ द्या मरणालागुनी". जुन्या आठवणी कितीही रम्य असल्या तरी फार काळ त्यात नाही ना रमता येत? आताचे क्षण जुने होतील तेव्हा त्यांच्या आठवणी तितक्याच रम्य असतील याची काळजी आपणच घ्यायची असते ना?

आपल्याला कितीही आवड आणि हौस असली तरी असली प्रत्येक वेळी नवीन काही मिळेलंच असं नसतं ना?  अशा वेळी सगळ्यात जास्त समाधान कशात मिळत असेल तर जुन्याच गोष्टी नव्याने गवसण्यात. जुनी माणसं, जुनी नाती, जुनेच दृष्टिकोन नव्याने सापडतात ना तेव्हा खरी नव्याची आस पूर्ण होते. कारण नवंही कधीतरी जुनं होणारच असतं ना!

दैनिक गोवन वार्ता साठी केलेलं लिखाण..