खूप पूर्वी फोटोचे तंत्रज्ञान माहिती नव्हते तेव्हा कसलेले कलाकार मोठ्या लोकांची चित्रे काढत. मोठ्या लोकांचीच का, तर चित्रकला ही कला असण्याबरोबरच ते तंत्रज्ञान देखील होते, आणि आपली कला आणि तंत्रज्ञान यांचा केलेला योग्य वापर, आणि कौशल्य यासाठी त्यांना भरघोस मोबदला मिळे. हा मोबदला सामान्य माणूस कुठून देणार, म्हणून चित्रेही मोठ्यांचीच असत. रंग वगैरे तयार करावे लागायचे. आणि ते ही तंत्रज्ञान नसेल तेव्हा माणूस स्वतःला पाण्यात, किंवा प्रतिबिंब पडेल अशा ठिकाणी स्वतःचा चेहरा पाहत असेल तेच त्याचं स्वतःला पाहणं. पण त्याचं रंगरूप जतन मात्र होत नव्हतं. एखाद्याला दुसऱ्या माणसाला आठवायचं असेल तर कल्पनेतच आठवायचं, समोर चित्र किंवा फोटो असं काही नाही.
पूर्वीच्या काळी भारतात नवीन नवीन फोटोचं तंत्रज्ञान आलं तेव्हा अशी अंधश्रद्धा होती की फोटो काढू नये नाहीतर माणसाचं आयुष्य कमी होतं. मग हळू हळू तो गैरसमज विरत गेला आणि स्टुडिओमध्ये जाऊन किंवा फोटोग्राफरला घरी बोलावून कौटुंबिक फोटो काढणं भूषणावह समजलं जाऊ लागलं. सुरुवातीला फक्त कृष्णधवल फोटो होते, पण रंगीत फोटो पाहता त्याच फोटोंची मजा जास्त होती असं वाटतं. नंतर रंगीत फोटो आले आणि कॅमेराही सामान्य माणसाच्या आवाक्यात आला. काही समारंभ प्रसंगी, कुठे फिरायला जाताना कॅमेरा आणि फिल्म सोबत नेणं आणि फोटो काढणं प्रतिष्ठेचं, मोठा शौक समजला जाई.
कधी जर त्या कॅमेऱ्यात फिल्म नीट बसली नाही तर काढलेले सगळे फोटो आणि पूर्ण फिल्म वाया जाई आणि फोटो बघण्याची उत्सुकता हिरमुसलेपणात बदलली जायची. एका एका फिल्म चे एक एक अल्बम्स घरी तयार व्हायचे आणि आठवणी बघायच्या म्हणून ते अधून मधून काढून बघितलेही जायचे. फोटोंमधल्या आठवणी जागवल्या जायच्या. काहींकडे अशा अल्बम्सचा भरपूर मोठा खजिना असायचा. माझ्या खूप लहानपणी आमच्याकडे कॅमेरा नव्हता, स्टुडिओमध्ये जाऊन काढलेले मोजके फोटो होते. पण शालेय वयात इतर कोणा मित्रमैत्रिणीकडे असे त्यांचे लहानपणीचे भरपूर फोटो असलेले अल्बम्स पाहिले की हेवा वाटायचा. अजूनही आपल्या सगळ्यांकडे त्या काळी काढलेले फोटो अल्बम्स जपून ठेवलेले असतीलच.
मोबाईल आल्यापासून कॅमेरा खरा सगळ्यांच्या आवाक्यात आला. सुरुवातीला २ -४ मेगापिक्सेल
कॅमेरे असलेले मोबाईल्स होते, तरीदेखील खास कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोंचा वेगळाच भाव होता. आता कॅमेरे मोबाईलमध्येच इतके अत्याधुनिक झाले आहेत की खास लेन्स कॅमेऱ्याची गरज वाटत नाही. त्यात फोटो काढताना एडिटिंगचे हजारो पर्याय आणि काढून झाल्यावरही फोटोमध्ये बदल आणि सुधार करण्याचे हजारो पर्याय उपलब्ध आहेत. पूर्वी एखादा कसलेला कलाकार चित्र काढेल किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणचं एखादा सौंदर्यदृष्टी असणारा फोटोग्राफर फोटो काढेल अशी चित्रे आता AI ने तयार करता येतात.
एखादी गोष्ट मुबलक झाली की त्याचा दर्जा घसरतो किंवा मग अति होऊन त्यातला रसही निघून जातो. फोटोंचं सध्या तसंच झालंय, माझ्यासारख्या अनेकांना झालं असेल. पण स्वप्रेमात असलेले देखील भरपूर लोक बघायला मिळतात, जिकडे जातील तिकडे फोटो, सेल्फी आणि रीळच्या नादात खरा आस्वाद कदाचित घेतच नाहीत. पूर्वी कुठे गेलं की फोटो काढण्याची इच्छा व्हायची, आता एखादं प्रसिद्ध ठिकाण असेल तर त्याच कोनात त्याच गोष्टीचे इतरांचे सोशल मीडियावर इतके फोटो बघायला मिळतात की आपण फोटो काढून काय वेगळं मिळणार असा प्रश्न पडतो.
पूर्वी ठिकाणांचे फोटो काढून नंतर ते बघण्यात निसर्गाचा आस्वाद घेतला जायचा, आता फोटो व्हिडीओ काढण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यात आणि हृदयात एखादी गोष्ट साठवून ठेवून त्याचा आस्वाद घेऊ, नंतर वाटलंच तर नेटवर याचे फोटो ढीगाने मिळतील अशीच भावना निर्माण होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा