बुधवार, २२ जुलै, २०२६

वाचन



वाचनाचा छंद हल्ली लोप पावत चालला आहे असं म्हणतात. एक काळ असा होता की कोणतेही ज्ञान किंवा माहिती मिळवण्यासाठी वाचन हा एकमेव पर्याय असायचा. त्यामुळे एरवी वाचनाची अगदी आवड किंवा छंद नसलेली माणसेसुद्धा निदान रोजचे वर्तमानपत्र तरी वाचायचे. पण आता माहितीचे इतके स्रोत निर्माण झाले आहेत की एकदा शालेय, महाविद्यालयीन शिक्षण संपले की काही वाचावेच अशी सक्ती राहत नाही. काही अगदी अपरिहार्य गोष्टी, नोटिसा, फॉर्म्स, ऑफिसमध्ये कामाचे तपशील फक्त एवढ्याच गोष्टींवर त्यांचे वाचन थांबते.

सध्या ऑडिओ बुक्सचा पर्याय उपलब्ध आहे. ज्यांना वाचन आवडत किंवा जमत नाही अशांसाठी निदान कोणी काही लिहिलेले ऑडिओ बुक्स मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचते. शाळा कॉलेजमध्ये असताना सक्तीने अभ्यास म्हणून वाचन करावेच लागते. ज्याला वाचनाचा कंटाळा असेल त्याला गुणही कमीच मिळणार. अशा प्रकारे वाचनाचा संबंध हुशारीशी देखील आहे. काही जण वाचतच नाहीत, या पुढची पायरी म्हणजे काहीजण वाचतात पण वाचलेल्याचं आकलन होत नाही.

माझीदेखील अशी अवस्था होते बऱ्याचदा. डोळे तर अक्षरांवरुन फिरत असतात, पण मेंदूमध्ये काहीच शिरत नसते. आणि कॉलेजला असताना तर खुपदाच व्हायचं असं. एकतर सगळे किचकट विषय आणि पूर्ण सेमिस्टर मध्ये न केलेला अभ्यास किंवा कमी पडलेला वेळ यांच्यामुळे अचानक परीक्षा जवळ आल्यावर नवीन काही वाचायला घेतलं की नुसतेच अक्षरांवरुन डोळे फिरायचे. त्यात ते लक्षात ठेवण्यासाठी वेळेचं बंधन असायचं मग अजूनच मेधाशक्ती मंदावायची. खूपदा ठरवलं की आपण खूप आधीच अभ्यास तयार ठेवायचा म्हणजे ऐन परीक्षेवेळी असं होणार नाही. पण दर वेळेस ये रे माझ्या मागल्या.

वाचनासाठी सुद्धा एक मूड असावा लागतो, किंवा कधीकधी उलटही होते. काही वाचताना लगेच विषयामध्ये मुग्ध झालो तर मूड आपोआप बनतो. तेच जे वाचतोय तो विषय क्लिष्ट असला आणि त्यातून मूडही नसला की अजूनही नुसतेच डोळे फिरतात, आकलन होत नाही. आणि कधीकधी काही लिखाण असं असते की नुसते डोळे फिरवले आणि शब्द न शब्द नाही वाचला तरी विषयाचे आकलन होते.

पाठांतर हा वाचनाचा आणखी एक पैलू आहे. अनेकदा वाचलं की आपोआपच ते पाठ होते. ज्याचं पाठांतर खूप उत्तम असेल अशा एकपाठी माणसाचे नुसते डोळे जरी अक्षरांवर फिरले तरी आकलन न होताही त्यांना वाचलेले तोंडपाठ होऊ शकते. माझ्यासारख्यांना वाचून आकलन झाल्याशिवाय एखादी गोष्ट पाठ होत नाही. द्रुक की श्राव्य हा प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे ठरणारा प्रकार आहे. लहानपणी आई म्हणायची सिनेमाची गाणी बरी एकदा ऐकली तरी पाठ होतात.

तेव्हा असं वाटायचं ऐकलेलं वाचलेल्यापेक्षा लवकर पाठ होते. पण आता मला एखादे पुस्तक वगैरे असेल तर ऐकण्यापेक्षा वाचायलाच जास्त आवडते. ऐकून आपल्या कल्पनाशक्तीला आपण थोडं सीमित करतो. जो वाचतोय त्या लयीप्रमाणे आपण ऐकतोय त्याचा अर्थ लावतो. पण आपण वाचत असू तर ती लय आपल्याला वाचून काय आकलन झाले त्याप्रमाणे वेगळी असू शकते. वयाप्रमाणे कोणाची दृष्टी अधू होते तर कोणाची श्रवणशक्ती. माझी देवाकडे प्रार्थना आहे, निदान वाचत राहता येईल एवढी माझी दृष्टी शेवटपर्यंत निरोगी ठेव.  

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

मंगळवार, २१ जुलै, २०२६

भीती


जगातल्या कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही असा माणूस अस्तित्वात असणं शक्य नाही. हा आता दाखवत नसतील काहीजण पण कसली ना कसली भीती तर प्रत्येकालाच असते. कोणाला पाण्याची, कोणाला उंचीची, कोणाला विदयुत उपकरणांची, कोणाला गर्दीची, कोणाला गाडी चालवण्याची, कोणाला एकटेपणाची! खरं तर हे खूपच ढोबळ प्रकार झाले. अमका फोबिया तमका फोबिया असं आपण ऐकत असतो. पण खरंच प्रत्येक प्रकारच्या भीतीला एखाद्या फोबियाचं नाव देणं इतकं अशक्य आहे की ती यादी अगणित संख्यांची होईल.

लोकांना अंघोळीची सुद्धा भीती असू शकते, एखाद्या रंगाची भीती असू शकते, कोणाशी बोलण्याची, इतरांमध्ये मिसळण्याची, नोकरीसाठी मुलाखती देण्याची, अंधाराची, अमानवीय शक्तींची आणि कशाकशाची नाही. भीती वाटत असेल तर माणूस त्या गोष्टीचा विचार करूनही इतका घाबरतो की प्रयत्न करून पाहणे तर फारच लांब राहिलं. कोणत्याही एखाद्या बाबतीत आत्मविश्वास कमी असला की त्याची भीती वाटू लागते.

कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला इतकी अनभिज्ञ असते की त्यामुळे काय वाढून ठेवले असेल म्हणून भीती वाटते, तर कधी एखादी गोष्ट बऱ्याचदा प्रयत्न करूनही जमली नाही म्हणून त्याची भीती निर्माण होते. कधीकधी एखाद्या गोष्टीची नुसतीच इतरांना भीती वाटते म्हणून आपल्यालाही भीती वाटते. काही प्रकारच्या भीती अगदीच अनाकलनीय असतात, एखाद्याला अमकी भीती का आहे हे ती व्यक्ती स्वतःदेखील सांगू शकत नाही, कदाचित ती भीती गुणसूत्रांमधून किंवा पालकांचं , घरातल्या इतरांचं वागणं पाहून येत असावी.

कातरवेळी माणसाचं मन बऱ्याचदा उदास, खिन्न होते, किंवा प्रिय व्यक्ती जवळ नसेल तर आठवण येते. किंवा जुन्या आठवणी मनात उचंबळून येऊन मनाचीही कातर अवस्था होते. एकटं एकांतात असू तर संधिप्रकाश अजूनच उदासीन करून जातो. संध्याछाया भिवविती मना अशी अवस्था बहुतेक जणांची असते. एकतर दिवस संपून रात्र सुरु होणार आहे याची ही चाहूल असते. पूर्ण उजेड आणि पूर्ण अंधार या दोहोंच्या मधली ही वेळ असते.

या भीतीचं मूळ मानवाच्या उत्क्रांतीच्या अवस्थेपासून आलं आहे. जंगलांमध्ये राहताना संध्याकाळी अंधार झाल्यावर शिकार करणाऱ्या श्वापदांची भीती वाढत असे. ही अंधारात हिंस्र किंवा विषारी प्राण्यांची वाढलेली भीती, आणि यातून एखादा हिंस्र प्राणी मागे लागला तर जीव मुठीत घेऊन पलायन करणे, यांमुळे आजही संधिप्रकाश पसरला की प्रत्येक मानवाला हुरहूर दाटून येते. आजही अंधाराची भीती वाटते, आणि आजही दिवसा रम्य भासणार निसर्ग, समुद्र, पर्वत, नद्या, जंगले रात्री भयाण वाटतात. त्यामुळे संध्याकाळी देवापुढे दिवा लावणे, शुभंकरोति म्हणणे या गोष्टी करून आपण मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतो.

तर तुम्हाला कोणत्या एखाद्या किंवा अनेक गोष्टींची अशी भीती होती किंवा आहे, आणि त्यावर तुम्ही मात केलीत की करण्याचा प्रयत्न चालू आहे. किंवा असं आहे की ही भीती राहू देत अशीच मला याचं काहीच करायचं नाही. भीतीवर जिद्दीने मात करणारी माणसेच आयुष्यात काही मिळवू शकतात. आजकाल ते काहीतरी म्हणतात ना 'डर के आगे जीत है'. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

सोमवार, २० जुलै, २०२६

पिच्छा


मराठीतला पिच्छा हा शब्द हिंदीतल्या पीछा वरून आलेला असावा. पण पिच्छा मध्ये जो हट्ट आणि वैताग आहे तो काही पीछा मध्ये वाटत नाही. एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणाऱ्या माणसाला आयुष्यात हवं तसं यश नक्कीच मिळतं. काही जण काही गोष्टींचा पिच्छा पुरवतात तर काही जण माणसांचा पिच्छा पुरवतात. एखाद्या ध्येयाचा पिच्छा पुरवणे माणसांचा पिच्छा पुरवण्यापेक्षा नक्कीच सोपं असेल असं वाटतं.

सर्वांनाच जिद्दीने पिच्छा पुरवणं जमत नाही. माणसांचा पिच्छा पुरवायचा म्हणजे एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी सारखं सारखं भंडावून सोडायचं. उदाहरणार्थ जसे आपल्याला सध्या काही बँकांचे किंवा वित्तीय कंपन्यांचे नकोसे कॉल्स सारखे येत असतात. मार्केटिंग, विमा आणि अशा अनेक जाहिरातबाजीवाल्या लोकांना इतर लोकांचा पिच्छा पुरवावाच लागतो. शंभर लोकांपैकी दोन जण जरी त्यांच्या गळाला लागले तरी त्यांचा उद्देश सफलच होणारा असतो.

मला स्वतःला मात्र माणसांचा पिच्छा मुळीच पुरवता येत नाही. आणि आपली घरगुती काही व्यवसाय कौशल्य आधारित कामे असतात, ती आजकाल पिच्छा पुरवल्याशिवाय पूर्णच होत नाहीत. एखाद्याचा पिच्छा न पुरवल्यास माणसे त्यांची कामे प्रामाणिकपणे करताना दिसत नाहीत. अपवाद असतातच. एखाद्याला आपण एखाद्या कामाचा ते मागतील तेवढा मोबदला देत असू तर त्यांचा पिच्छा का पुरवावा लागला पाहिजे? पण त्याशिवाय मनासारखं काम होत नाही. हाही एक प्रकारचा भ्रष्टाचारच नाही का.

काहीजण एखाद्या जोडीदारासाठी त्या व्यक्तीचा तर कधी त्या व्यक्तीसाठी इतरांचा पिच्छा पुरवतात, आणि हवा तोच जोडीदार मिळवतात. नंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात पुढे काय होत असेल ती वेगळी गोष्ट आहे. काही जणांना लग्नाच्या काही वर्षांनंतर पाहून असं वाटतं यासाठीच का इतका अट्टाहास केला होता यांनी. एखादी गोष्ट असो वा व्यक्ती ती मिळेपर्यंतच त्याचं अप्रूप असतं. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप पिच्छा पुरवून ती एकदा मिळाली कि मग मात्र तो केलेला पिच्छा विस्मृतीमध्ये जातो.

पण सगळेच जण पिच्छा पुरवताना केलेल्या कष्टांना विसरून जाणाऱ्यांपैकी नसतात. बऱ्याच जणांना आधी केलेल्या कष्टाची जाणीव कायम राहते. आणि पिच्छा पुरवणे नक्कीच आकर्षणाच्या नियमांपैकीच एक असावे असे मला नेहमी वाटते. 
 
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६


रविवार, १९ जुलै, २०२६

सख्खा


आपल्या जन्मापासून काही सख्खी नाती आपल्याला लाभतात. आणि काही जोडलेली नाती लाभतात. आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, मामा, मावशी, काका, आत्या त्यांची मुलं हे सगळे आपले सख्खे नातेवाईक असतात. मामाचं लग्न होऊन मामी आली, काकाचं लग्न होऊन काकू आली तर त्यांच्याबरोबर येतात ती जोडलेली नाती. सख्खी नाती नेहमी आपली पक्की असतात असं आपल्याला वाटत असतं.

कधी कधी सख्खे दोन भाऊ वा बहिणी यांच्यामध्ये इतकं साम्य असते की हा त्याचा/तिचा भाऊ आहे किंवा ही बहीण आहे असं सांगण्याचीसुद्धा गरज पडत नाही. आणि कधी इतके वेगळे असतात की ते सख्खे आहेत यावर सांगूनही विश्वास बसत नाही. सवयीचंदेखील तसंच जरी सख्खी भावंडं असतील तरी साध्या साध्या सवयीसुद्धा त्यांच्या एकमेकांसारख्या नसतात, किंवा कधी विचार खूप वेगळे असतात की हे एकाच घरातल्या माणसांचे विचार असतील असं खरं वाटत नाही.

जोडलेल्या नात्यांमध्ये थोडी औपचारिकता असते. जोपर्यंत एकमेकांना चांगलं ओळखत नाही तोपर्यंत थोडा कमी मोकळेढाकळेपणा असतो. जोडलेल्या नात्यांमध्येही आपल्याला आपला नातेसंग्रह संपन्न करणारी माणसेही भेटतात. एकसारखे विचार जुळले तर यांच्याबरोबर आपलं नातं वयाच्या बऱ्याच काळानंतर जोडलं गेलंय हे लक्षातदेखील राहत नाही. जरी विचार जुळणं मने जुळण्यासाठी महत्त्वाचं असतं तरी सख्ख्याला आपण जितकी संधी देतो तितकी कधी कधी जोडलेल्याना देत नाही.

कधी काही सख्खी नाती अशी पण दिसतात की इवल्याशा मतभेदाने एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत. नात्यापेक्षा अहंकाराला जास्त कुरवाळले जाते. सख्खेपणाचा लवलेशही त्यांच्यामध्ये उरलेला नसतो. छोटंसं निमित्त आणि एकमेकांमध्ये कायमचा दुरावा आलेला असतो. मला वाटत नाही नुसत्या अहंकाराने सख्ख्यांपासून इतकं तोडून वागता येत असेल. खरं कारण तर हे असेल की त्यांचे एकमेकांशी सख्ख्यांप्रमाणे कधी बंधच जुळले नाहीत. सख्खी असोत वा जोडलेली नाती आपल्याला निभावून न्यावीच लागतात. 

बाकी मनाने गुंफलेली नाती असतात काही, त्यामध्ये सखा किंवा सखी असते, सख्खा किंवा सख्खी यासारखेच असणारे म्हणून त्यांना सखा वा सखी म्हणत असावेत नक्कीच. काही काही गोष्टी आपण सख्ख्यांना आपण सांगू शकत नाही, पण सख्यांना सांगून आपलं मन मोकळं करू शकतो. या नात्यामध्ये कोणतंच बंधन नसते. कोणताच मानपान नसतो, कोणतीच अपेक्षा नसते. फक्त निखळ मैत्री असते. म्हणूनच कवि योगेश म्हणतात,

कहीं तो ये, दिल कभी, मिल नहीं पाते
कहीं से निकल आए, जनमों के नाते

शनिवार, १८ जुलै, २०२६

वाढदिवस


कोणालाही आपला वाढदिवस म्हणजे मोठा आनंदाचा दिवस असतो. एक काळ असायचा, ज्या काळात मुलांना शाळेत घालण्याच्या वेळेस सगळ्या मुलांची जन्मतारीख ही एक जूनच असायची. कधीकधी जनसालही लक्षात नसे. डोक्यावरून हात पलीकडच्या कानाला लागला की मूल शाळेत घालण्याच्या वयाचे झालेले असे.
आजी-पणजीच्या काळात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, होळीच्या आदल्या दिवशी, गौरीपूजनाच्या दिवशी असे त्यांचे जन्मदिवस लक्षात ठेवलेले असायचे. आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे कोणताही महिना त्यामध्ये एक तरी उल्लेखनीय सण किंवा घटना असल्याशिवाय जात नाही. त्यामुळे त्यांची पद्धतही चांगलीच म्हणायची.

आताचा एक काळ आहे की पालक बाळाची जन्मतारीख-वार-महिना  जन्मवेळ मिलिसेकंदासहित नोंद करून ठेवतात. अशा वेळी वाढदिवसाचे महत्त्व वाढले नसेल तरच नवल. माझ्या लहानपणी काही ठराविक वर्षांचे होईपर्यंत हौस म्हणून लहान मुलांचे वाढदिवस केले जात. त्यातही फार मोठा सोहळा वगैरे नसे. घराजवळचीच थोडीफार बच्चेकंपनी बोलावून त्यांना केक-चॉकलेट आणि थोडा खाऊ दिला जाई. त्या दिवशी उत्सवमूर्ती असल्याने असेल कदाचित, वाढदिवस म्हणजे काहीतरी खास असं  लहानपणापासून मनावर बिंबलं जातं.

पण माझ्यासारखे काहीजण असतात ज्यांना आपला वाढदिवस म्हणजे विशेष काही न वाटता इतर दिवसांप्रमाणे एक सामान्य दिवस वाटतो. काही माणसे पाहण्यात आहेत की कितीही वय झालं तरी अमक्यातमक्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून रुसून बसतात. मला तर याच्या अगदी उलट वाटतं. कोणी शुभेच्छा नाही देऊ शकले तर विशेष काय आहे त्यात एवढे. इतरांसाठी तर तोसुद्धा इतर अनेक दिवसांसारखाच आणखी एक दिवस असतो. मार्केटिंगसाठी आपल्याला सेवा पुरवणाऱ्या काही संस्था आपल्याला इमेल किंवा मेसेजवर शुभेच्छा पाठवतात.

कोणाच्या शुभेच्छा आलेल्या आवडत नाहीत असं नाही, एखाद्याने आपण इतके महत्त्वाचे नसतानाही आठवून फोन किंवा मेसेज केला तर नक्कीच छान वाटते. पंतप्रधानांची एक साईट आहे. बहुतेक तिकडे रजिस्टर केलं असेल तर तिथूनही शुभेच्छांचं एक पत्र इमेलवर प्राप्त होते. पंतप्रधान या पदावर व्यक्ती कोणीही असो पद देशातील सर्वांत मोठ्या पदांपैकी एक आहे. आणि एखाद्याला वैयक्तिकरित्या ओळखत नसताना त्यांचा द्वेष वा जवळचे समजणारे आपण कोण. तर हे पत्र ऑटोमेटेड आहे हे पूर्णपणे माहीती असूनही ते मिळाल्याचाही आनंद होतो. पण खूप थाटमाट करावा आणि भरपूर लोकांना बोलावून आपलं कौतुक करून घ्यावं इतका महत्त्वाचा हा दिवस मला नक्कीच वाटत नाही.

बरेच जण वाढदिवशी अनाथाश्रमांना दान करणे, धार्मिक दानधर्म करणे, वृक्षारोपण करणे, सामाजिक उपक्रम राबवणे वगैरे चांगल्या प्रकारे आपला दिवस व्यतित करतात. खूप गोतावळा न आवडणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना उत्सवमूर्ती व्हायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. आणि अगदी काहीच न करणे हादेखील पर्याय आहेच.      

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

शुक्रवार, १७ जुलै, २०२६

व्यक्त


मी, माझे, मला सर्वप्रथम आणि बाकीचे सगळे माझ्यानंतर अशी कोणाची वृत्ती दिसली तर त्यांना आपण स्वार्थी म्हणतो. पण खरं बघायचं तर सगळीकडे सगळेजण असाच विचार करताना दिसतात. अगदी विरळ प्रमाणात दुसऱ्यांचा विचार आधी करतात असे काहीजण दिसतात. पण अशा लोकांना त्रासच जास्त होताना दिसतो. स्वार्थी असलं की त्रास कमी असतो, त्यामुळे खरं तर स्वार्थी असणं हे कोणाच्याही सोयीचं आहे. स्वार्थी माणसाला कधीच मनाला मुरड घालावी लागत नाही, आणि कोणालाही मनाप्रमाणे वागायला मिळालं की तणावही कमी असतो.

मला वैयक्तिकरित्या कोणालाच नाही म्हणता येत नाही. आता हा अवगुण समजला जातो, पण आमच्यावर संस्कार झाले तेव्हा शक्य तेवढी आपण इतरांना मदत करावी असेच संस्कार झाले. त्याही पुढे जाऊन जर आपल्या आवाक्यात नसेल आणि कोणाला नाही म्हणावं लागलं तर त्याचा चक्क अपराधगंड येतो. आजूबाजूला कोणाला फटकन काहीही बोलणारी माणसं दिसतात, पण मी मात्र कोणाला लागेल असं बोलू शकत नाही. आणि समजा अगदी ठरवून बोललंच कधी तर जे सहज इतरांना बोलतात आणि विसरून जातात तसं होत नाही. आपण असं उगीच बोललो का, थोडं सौम्य काही म्हणायला हवं होतं का, त्याला/तिला काय वाटलं असेल असलंच कितीही वेळ वाटत राहतं.

काय म्हणावं या स्वभावाला, फटकन बोलून मोकळे होणाऱ्या लोकांमध्ये मनामध्ये काही साचून तणाव निर्माण होत नसावेत, पण असे अनेक जण असतात की ते बोलू न शकल्याने मनामध्ये गोष्टी साचून ताण घेतात किंवा कधी बोलून मोकळे झालेच तर आपण असे का बोललो याचाही ताण घेतात, म्हणजे मानसिक ताणापासून बोलून काय किंवा न बोलून काय सुटका नाहीच. राशींप्रमाणे माणसाचे तसे तसे स्वभाव आणि भोग असतात म्हणतात, ते ढोबळमानाने नक्कीच खरं असावं. नाहीतर जगात सगळी माणसे एकसारखीच भांडकुदळ किंवा एकसारखीच शांत नक्कीच दिसली असती.

कोणाला काही बोलू न शकणाऱ्या किंवा मदतही जमली नाही म्हणून वाईट वाटून घेणाऱ्या लोकांमध्ये मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, माझी प्रतिमा सगळ्यांपुढे एक चांगला माणूस म्हणून उभी रहावी ही अपेक्षा असेल का, की एखाद्याला खरंच मनापासून कोणालाच दुखवायला आवडत नसेल? मग आपल्याला कोणी चांगलं म्हणो अथवा वाईट? अंतर्मुख लोकांना कोणाला काही बोलण्यापेक्षा न बोलणं जास्त सोयीचं वाटतं. मुळात बोलण्याचेच कष्ट वाटतात. मग हळू हळू ते कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटणं, कोणी वाईट वागलं तर त्याला ते बोलूनच दाखवणं यापेक्षा बोलण्याचे कष्ट न घेणं जास्त पसंत करतात, आणि त्याचा ताणही घेणं सवयीने कमी होत जात असेल.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

गुरुवार, १६ जुलै, २०२६

अस्तित्व


एखाद्याचं अस्तित्व आपल्याला मुख्यत्वे त्याच्या दिसण्यामुळे कळून येतं. डोळ्यांचा मुख्य सहभाग असतो. एखादी अदृश्य गोष्ट अस्तित्वात आहे हे मान्य करणं अवघडच जातं. तरी काही गोष्टी अशा असतात की त्या न दिसूनही त्यांचं अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागतं. ध्वनी-कान, सुगंध-नाक, हवा-त्वचा, आणि चव-रसना या डोळे आणि इतर पंचेंद्रियांना जे जे काही जाणवेल ते सगळं अस्तित्वात असतंच. एखादी व्यक्तीचा आवाज येतो, काही गोष्टींचा ठराविक वास येतो त्याने ती गोष्ट जवळपास असेल असे वाटते, कोणी मागून पाठीवर थाप मारली की कोणीतरी आहे हा संदेश मेंदूला जातो. आणि पदार्थांच्या अस्तित्वाला चव असेल तरच अर्थ आहे. 

आपल्या अस्तित्वाची लोकांनी दखल घ्यावी असं सर्वांनाच वाटतं. ऑफिसमध्ये दोन सहकर्मचारी एकमेकांसमोर आले की एकमेकांना हाय-हॅलो करतात, वरिष्ठांना अभिवादन करतात. ही त्यांनी एकमेकांच्या अस्तित्वाची घेतलेली दखल असते. आपल्या कुटुंबात आपल्या अस्तित्वाची सगळेच दखल घेतात. शाळा कॉलेजात ठराविक मित्र-मंडळी दखल घेतात, जर तुम्ही खूप हुशार किंवा काही स्पर्धांमध्ये भाग घेऊन शाळेचं नाव उंचावणाऱ्यांपैकी असाल तर थोडे अजून सहाध्यायी आणि शिक्षकही तुमची दखल घेतात. आणि जर तुम्ही कोणी सेलेब्रिटी झालात तर अनोळखी ठिकाणी जाऊनही जास्तीत जास्त लोक तुमची दखल घेतात. कधी कधी माणसाला हे अति अस्तित्व पण नकोसं होतं, मग ते निर्जन किंवा अनोळखी ठिकाणी जाणं पसंत करतात.

अस् म्हणजे असणे, अस्ति म्हणजे आहे, आणि त्व हा त्याला लागलेला प्रत्यय. एखाद्या गोष्टीची उपस्थिती किंवा फक्त असणे. पण त्या काही गोष्टींच्या आणि काही व्यक्तींच्या नुसत्या असण्याने एखाद्याच्या आयुष्यात खूप फरक पडत असतो. तू आहेस ही भावनाच खूप सुखद असते. कधी कधी काही गोष्टींना आणि माणसांना आपण इतकं गृहीत धरलेलं असतं की त्यांच्या अस्तित्वाची आपल्याला दखलही नसते. किंवा आपल्याला काही जणांनी इतकं गृहीत धरलेलं असतं की काहींना आपल्या अस्तित्वाची जाणीव नसते.

एखादी घरातली व्यक्ती मृत पावली तरी त्यांच्या वस्तूंमधून किंवा नेहमी उठण्याबसण्याच्या जागांवरून त्यांचं अस्तित्व नंतरही बराच काळ आपल्याला जाणवत राहतं. एखादा असा गोतावळाही असतो की आपल्या अस्तित्वाची तिथे कोणी दखल घेत नाही, मग हळू हळू आपणच आपलं अस्तित्व तिथून कमी करू लागतो. पण ही खरं तर पळवाट आहे. जिथे आपल्या अस्तित्वाची दखल घेतली जात नाही तिथून अस्तित्व कमी करण्यापेक्षा त्यांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडणं जास्त जिद्दीचं ठरेल.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६


बुधवार, १५ जुलै, २०२६

राहणी


प्रत्येकाचं एक ठरलेलं राहणीमान असते, जे कालांतराने बदलत पण जाते. कधी राहणीमान समाज, भौगोलिक प्रदेश, पंथ, संप्रदाय याप्रमाणेदेखील बदलत जाते. आणि सर्वात मुख्य म्हणजे आर्थिक स्तर. आर्थिक स्तराप्रमाणेही राहणीमान बदलत जाते. पेहराव बदलत जातो. आपल्या मराठी मनाने नेहमीच "साधी राहणी, उच्च विचारसरणी" यावर विश्वास ठेवलेला आहे. आपल्याला शिकवलंच असं जातं की नीटनेटकं, स्वच्छ राहावं पण साधंच राहावं. संत चोखामेळा यांनीही म्हणून ठेवलंय "का रे भुललासी वरलिया रंगा"!

यामागे असा विचार नक्कीच असेल की पैसा आज आहे उद्या नाही, महागड्या जीवनशैलीची सवय लावून घेऊन उद्या दिवाळखोरीची पाळी आली तरी कर्जबाजारी न होता तग धरून राहता आलं पाहिजे. आपण मराठी माणसं तशी मध्यमवर्गीयच. आहे त्यात समाधान मानून घेणे वगैरे आपल्या रक्तातच असते. सवय म्हणून हे खरंच चांगलं आहे, त्याने भरपूर व्याप कमी होतात, सुखाने राहता येते. पण काहीजण असे असतात की ज्यांची स्वप्नं मोठी असतात.

एकतर आता आपण ग्लोबल झालो आहोत, पूर्ण जगाशी आपला संपर्क येतो. त्यामुळे कोणाचीही समोरच्यावर पहिली छाप पडते ती दिसण्यातून पडते, पेहरावातून पडते. त्यामुळे ज्या त्या क्षेत्राला साजेसा पेहराव करणे ही आजची चैन नसून गरज आहे. वरल्या रंगालाच भुलण्याचा जमाना आहे. एकदा आपण कोणीतरी बनलो की मग मात्र आपण स्वतः काही कल स्थापित करू शकतो. आजही पहा, श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांमध्ये भरपूर मराठी माणसे दिसतील, पण जग त्यांना किती साधा माणूस असं म्हणूनच ओळखतात.  

या साध्या संस्कारांमुळे पाय जमिनीवर ठेवून राहणं मराठी माणसाला छान जमतं. साधा माणूस असतो तो कशाचाही बडेजाव, ढोंग करत नाही. पण यामुळे कदाचित थोडी महत्त्वाकांक्षा कमीदेखील पडते. आपल्याला एवढं पुरतंय तेवढं बास झालं हीच वृत्ती तयार होणं साहजिक आहे. स्वतःची जाहिरातबाजी कमी पडते. यामध्ये छक्के-पंजे वाले पुढे निघून जातात. आणि साध्या माणसाचं मात्र कौशल्य मागे पडून साधा म्हणूनच कौतुक होत राहतं.

जग बदलतंय तसं होतं काय आहे, की गरजेपुरतं ऐटीत पॉश राहाणं तर ठीक आहे, पण समारंभ भलतेच विनाकारण महागडे होत चालले आहेत. तिकडे दिखावा करावा अशी गरज साध्या साध्या लोकांनाही पडू लागली आहे, त्यासाठी लोकं कर्जबाजारीही होत आहेत. त्या बाबतीत मात्र मी "साधी राहणी, उच्च विचारसरणी" याचाच पुरस्कार करेन. 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

मंगळवार, १४ जुलै, २०२६

माहेर


"अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं"

असं भोंडल्याच्या गाण्यांमध्ये लहानपणी म्हणताना मजा यायची. कोणत्याही विवाहित स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माहेर. भले आजकाल शेजारी का माहेर असेना पण माहेर ते माहेर. तसं तर आता कोंडून मारणारी सासरे क्वचितच कुठे असतील. पण तरीही मुलीचा खूप दिवस माहेरी जायला मिळालं नाही की कोंडमारा होतोच. माहेरचं कौतुक करताना कोणतीही मुलगी कधीच थकत नाही. एवढंच का पण माहेरची उणीदुणी असतील तर ती झाकून ठेवते आणि कौतुक मात्र वारेमाप करते.

पूर्वीच्या काळी मुलीला माहेरी जायचं म्हटलं तर माहेराशी निगडित सणांची वाट बघावी लागायची. खूप महिन्यांनी आणि कधी कधी तर खूप वर्षांनी माहेरी जायला मिळायचं. शारीरिक मानसिक सगळे कष्ट सहन करून बिचारी दमून थकून जायची. आता शारीरिक छळ वगैरे नसला तरी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मानसिक थकवा येतोच. सासरी सगळे प्रेमाने वागणारे सगळे असतील तरी माहेरची माया आणि ओढ वेगळीच असते. सासरी भरपूर ऐश्वर्य असेल आणि माहेरी गरीबी असेल तरी त्याही मुलीला माहेर हवंच असतं.

पूर्वी माहेरी जाणाऱ्या मुलीला अनेक भाऊ भावजयाही असत. आईचे लाड तर वेगळेच पण त्यांच्याकडूनही कोडकौतुक होत असे. हल्ली बऱ्याच मुलींना भाऊ नसतो, अशा काही मुलींना सासरी सगळं सांभाळून माहेरही लक्ष द्यावं लागतं तरीसुद्धा ती अतिरिक्त जबाबदारी न मानता त्या ते आनंदाने करतात. लहानपणापासून आपण जिथे राहीलो त्या घराशी आणि जागेशीही आपली भावनिक जवळीक असते. शेजारीपाजारी देखील प्रेमाने विचारणारी माणसे असतात. पण खऱ्या अर्थाने जोवर आई माहेरी असते तोवरच माहेर हे महेर वाटतं.

लहानपणी आई तिच्या माहेरी जायची म्हणजेच आपण आपल्या आजोळी जायचो ती मजादेखील वेगळीच असायची, आईच्या लाडांमुळे तिच्याबरोबर आपलेही लाड व्हायचे. पण माहेरी आलो आता राहा निवांत असं कोणतीच मुलगी करत नाही. तेव्हा आईला माहेरी गेली तरी आजीची काळजी घेताना पाहिलं, आता माहेरी जाऊन नुसताच आराम करण्यापेक्षा आईला काय हवं नको ते बघताना एका ठराविक वयानंतर माहेरी जाऊनही आई आजीची काळजी घ्यायची ते आपसूकच आठवतं.

सासरी जरी सगळं छान असेल पण त्यात एक व्यावहारिकपणा दिसतोच, आपल्याला स्त्रियांना तो जाणवतो. मग व्यवहारांची, कर्तव्याची लोढणी सोडून मायेची फुंकर मिळवण्यासाठी मुलगी माहेरी जाण्यासाठी आसुसलेली असते. माहेर म्हणजे औपचारिकता सोडून आपलेपणाने केलेली विचारपूस, स्नेहाचा वाहणारा झरा. माहेर या शब्दातच किती जिव्हाळा, माया, प्रेम, काळजी आहे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की माहेरासाठी आसुसलेल्यांसाठी आपल्यालाही कोणाचं माहेर होऊन राहता आलं तर ते किती छान असेल.   

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

सोमवार, १३ जुलै, २०२६

नियोजन


नियोजन यासाठी सध्या सर्रास वापरला जाणारा शब्द म्हणजे प्लॅन/प्लॅनिंग. काही लोकांच्या आयुष्यात सर्व काही कसं प्लॅनिंग प्रमाणे ठरवून चाललेलं असतं. एखादं नियोजन बनवणं आणि ते पूर्णत्वास नेणं ही खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. ऑफिसमध्ये तर प्लॅन्स बनवून त्याप्रमाणे कामे तडीस न्यावीच लागतात. आणि त्याची आपल्याला सवयही होऊन जाते. पण आयुष्य म्हणजे ऑफिस नाही. ऑफिसात एखादं काम पूर्ण करण्यासाठी आपल्या कामाच्या वाट्याला जितके पैलू आलेले असतात त्यापेक्षा कितीतरी जास्त पैलू आयुष्याला असतात.

अमुक शाखेतच शिक्षण घेणे, अमुक वयातच लग्न करणे, अमुक वयात मनासारखं घर घेऊन ते मनाप्रमाणे सजवणे, अमुक वयात आणि अमुक आर्थिक परिस्थितीमध्ये असताना मुलांना जन्म देणे, मुलांचे संगोपन ठराविक प्लॅनिंगनेच करणे, हे फारच कमी लोकांना जमत असणार. पहिली सुरुवातच करिअर पासून होते. काही जणांना कितीही मोठं होऊनही आपला कल नक्की कुठे आहे तेच समजत नाही. मग वेगळंच शिक्षण घेऊन आयुष्यभर मनाविरुद्ध काम करत बसणं वाट्यास येतं.

कोणाकोणाला मनासारखा जोडीदार मिळत नाही, मग पुढच्या प्लॅनिंगऐवजी घटस्फोट वगैरे गोष्टींमध्ये पडणं किंवा आहे ते सहन करणं अशा गोष्टी कोणाच्याच नियोजनामध्ये नसतात. इच्छा असूनही सर्वांनाच ठराविक वयात किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये मूल होईलच असं सांगता येत नाही. न सांगता येणारी आजारपणं, ज्येष्ठांचे वेगळे प्रश्न हे सगळं हाताळण्यामध्ये नियोजन कुठे ना कुठे कोलमडतेच. पण तेच एखादा सण-समारंभ साजरा करणे असेल तर त्याचं नियोजन करूनच आपण ते तडीस नेऊ शकतो. अशा वेळी मात्र नियोजन न करण्याने सगळा गलथान कारभार होऊन जाऊ शकतो. 

सणा-समारंभाचं नियोजन करणे आणि पूर्ण आयुष्याचं नियोजन करणे यात खूपच फरक आहे. समारंभ वगैरे आपल्याला एका दिवशी पूर्णत्वास न्यायचा असतो त्यामुळे तो दिवस येईपर्यंत आपण उत्साहाने प्लॅनिंग करून ते पारही पाडतो. पण समारंभाचा जसा शेवटचा दिवस किंवा साजरा होण्याचा दिवस आपल्याला माहिती असतो तसं आयुष्याचं नसते ना.  त्यामुळे आयुष्याचे छोटे छोटे भाग बनवून छोटं छोटं प्लॅनिंग पार पाडणं केव्हाही उत्तम! 

आयुष्याच्या बाबतीत मला तर नेहमी असं वाटतं की नियोजन करून त्याप्रमाणेच वागणाऱ्या लोकांमध्ये नशिबाचाच भाग जास्त असावा. त्यामुळेच वूडी ऍलन चा हा सुविचार माझ्या खूपच जवळचा आहे.

“If you want to make God laugh, tell Him about your plans.” 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

रविवार, १२ जुलै, २०२६

कौशल्य


प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत कुशल, निपुण असतो. काहीजण अनेक कलागुणांमध्ये कुशल असतात. कधीकधी काही विशिष्ट शिक्षण घेतल्याने काही कौशल्ये प्राप्त होतात, कधीकधी काही जणांमध्ये उपजत काही कौशल्ये असतात तर कधी शिक्षण आणि अभ्यासाने काही कौशल्ये आत्मसात करता येतात. पण जगात काही जण असेही असतात की त्यांच्यामध्ये काहीच कौशल्य नाही, किंवा काही असेही असतात की अतिशय साध्या वाटणाऱ्या एखाद्याला सहज जमतील अशा गोष्टीही त्यांना कौशल्य वाटतात.

प्रत्येक कौशल्य पैसे मिळवण्यासाठीच असावे असे काही नाही, काही कौशल्ये आपण मनाच्या समाधानासाठी देखील शिकतो किंवा उपजत असेल तर त्यामध्ये गोडी वाढवतो. मात्र आपल्यामध्ये असणाऱ्या कौशल्याविषयी अनभिज्ञ असणे, किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याची कदर नसणे हे मात्र खरोखर दुर्दैवी आहे. काही स्वतः अनभिज्ञ असणाऱ्या लोकांना त्यांच्या आजूबाजूला अशी माणसे मिळतात की त्यांना त्याबद्दल जाणीव करून देतील. आपल्या आजूबाजूला असे पारखी लोकं मिळणेही भाग्याचेच आहे.  

काही वर्षांपूर्वीपर्यंत सहज वाटणाऱ्या गोष्टी, आधीच्या पिढीतले लोक सहज करत होते अशा काही गोष्टीही हल्ली कौशल्य झाल्या आहेत. उत्तम स्वयंपाक, छान रांगोळ्या, कलाकुसर, भरतकाम, विणकाम, शिवणकाम हे पूर्वीच्या स्त्रियांना सहज जमत असे, एवढेच का त्या गोष्टी इतक्या सहज मानल्या जायच्या की हे कौशल्य आहे असं करणाऱ्यांनाही माहिती नसे आणि पाहणाऱ्यांनाही. याउलट एखाद्या स्त्रीमध्ये ही कौशल्ये नसतील किंवा काही कमी असतील तर तिला स्त्री म्हणून कमी हुशार समजले जाई.

त्याच स्त्रिया आजच्या पिढीकडे पाहत असतील आणि छोट्या छोट्या गोष्टींचे क्लासेस पाहून आणि वरीलपैकी एखादी गोष्ट जरी छान जमत असेल तर होणारे वारेमाप कौतुक बघून निश्चितच त्यांना हेवा वाटत असेल. मुळात भारतीय समाजात काही गोष्टी म्हणजे कौशल्ये आहेत हेच खूप उशिरा रुजले. आपण सहज मानतो त्या गोष्टी म्हणजे कौशल्ये असू शकतात हेच आपण पाश्चिमात्यांकडून शिकलो आहोत, त्यामुळे कौशल्यांचे मार्केटिंग तर दूरच राहीले.

व्यक्ती जितकी निम्न स्तरातील असेल, मध्यमवर्गीय असेल, तितकी आजही तिच्यामध्ये जास्त कौशल्ये असतात त्याउलट उच्चवर्गीय लोकांमध्ये सगळं आयतं मिळत गेल्याने असेल, कमी कौशल्ये असतात. किंवा जी गोष्ट मध्यमवर्गीयाला सहज वाटत असेल ते उच्चवर्गीयाला कौशल्य वाटू शकते. हे माझे वैयक्तिक निरीक्षण आहे, कदाचित चुकीचेही असेल. आणि उच्चवर्गीयाला स्वतः कौशल्ये आत्मसात करण्यापेक्षा मोबदला देऊन ज्याच्याकडे कौशल्ये आहेत त्यांच्याकडून हवे ते साध्य करता येणार असेल तर तसेही त्याला स्वतःला ती कौशल्ये शिकण्याचे कारणच नाही.   

काही वर्षांपूर्वी आपल्या घरी एखादा सुतार काम करत असे त्यामध्ये जे बारकावे तो बघत असे, तसे काम आज आपल्याला खूप पिच्छा पुरवल्याशिवाय करून मिळत नाही. पूर्वी एखाद्या गोष्टीला मोबदला देऊन जशी कामे करून मिळत तशी कोणत्याच क्षेत्रात आज करून मिळत नाहीत. कामातला प्रामाणिकपणा कधीच लोप पावला आहे. मोबदला देऊन काम करून घेण्यामध्ये डोळ्यात तेल घालून लक्ष दिले नाही तर निकृष्ट दर्जाचे काम पदरी पाडून घ्यावे लागते. किंवा मग त्यासाठी जास्त मोबदला मोजावा लागतो. चांगली कामे करणारी माणसे मिळणे अवघड होत चालले आहे.
  
जेव्हा आपण मानवजातीच्या इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा असे जाणवते की काही वर्षांपूर्वीचा मानव आजच्या माणसापेक्षा जास्त कुशल होता. काही अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या हजारो वर्षांपूर्वी माणसाने सहज करून ठेवल्या त्या आज तंत्रज्ञान वापरूनही शक्य नाहीत. कौशल्य विकसित करणे आणि ते वापरून अजरामर कलाकृती करून ठेवणे यासाठी लागणारा संयम आता माणसामध्ये राहिलेला नाही. जगाने इतका वेग पकडला आहे की कौशल्य शिकायचं तेही पैसे मिळवण्यासाठीच. अन्यथा तो वेळेचा अपव्यय ठरतो. त्यामुळे अशी इच्छा आहे की कधीतरी जगाचा वेग कमी व्हावा आणि प्रत्येकालाच आपल्या कौशल्यामध्ये मनापासून रमण्याची संधी मिळावी.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

शनिवार, ११ जुलै, २०२६

घर


आपण लहानपणापासून एखाद्या घरामध्ये राहत असतो. काहींना नोकरीतल्या बदल्यांमुळे सारखं घर बदलावं लागतं, त्यांना वेगवेगळ्या घरांमध्ये राहावं लागतं. आपले काही नातेवाईक किंवा मित्रमंडळी अशी असतात की त्यांचं घर आपल्याला खूप आवडत असतं. आपणही नेहमी आपलं घर कसही असो, त्यातही ते छान नीटनेटकं कसं ठेवता येईल या प्रयत्नात असतो. काही लोकांची गोष्ट वेगळी असते. त्यांना भटकण्यातून एवढा वेळच मिळत नाही की घराचा काही विचार करावा. कधीही येऊन चार घास खाऊन झोपण्याची सोय झाली म्हणजे काम झालं.

आजकाल सोशल मीडियामुळे लोकं छान छान इंटेरिअर करून त्याचे व्हिडीओ आणि रील्स सोमीवर टाकत असतात. ते पाहून काही घरं पाहून खूप छान वाटतं, काही कल्पनांची नक्कल करावीशी वाटते. काही इतकी चकचकीत असतात की हे घर आहे की हॉटेल असाही प्रश्न पडतो. काही इतकी किचकट नक्षीकामाची असतात की हे घर हे लोकं स्वच्छ आणि आहे तसं कसं ठेवत असतील हाच प्रश्न पडतो.

कोणतेही घर हा त्या घरातील कर्त्या व्यक्तींचा आरसा असतो. काही घरे पाहून आपल्याला असं वाटतेही की माझं घर इतकं छान असतं तर किती मजा आली असती. पण खरं तर झोपडीमध्ये रहा किंवा राजमहालामध्ये, घर हे घरातल्या माणसांनीच बनतं. आयुष्यात कधी ना कधी आपल्याला नव्या किंवा वेगळ्या घरामध्ये घर बदलण्याचे प्रसंग येतात. पण घरातील माणसे तीच असतील तर आपण फक्त वेगळ्या जागेत जातो आणि घराची स्पंदने मात्र तीच राहतात. शेवटी कुठेही राहीलो तरी घरातल्यांशी आपली नाती तीच राहणार असतात. त्याने मनात उमटणारे भाव तेच राहणार असतात. 

मला खरं तर भरलं घर खूप आवडतं, काही जणांकडे असं बघायला मिळतं की, सणावाराला भरपूर माणसे एकत्र जमतात, निदान गणपतीसाठी तरी सगळे एकत्र येतात. ते पाहून असं वाटतं आपल्याकडे एवढी माणसं असती तर किती मजा आली असती. पण बाबांकडे माझे आजोबा एकटेच एकुलता एक मुलगा, आणि आईकडेही माझी आजी एकटीच एकुलती एक. मागच्या पिढीपासूनच त्यांना भावंडेच नाहीत. मग पुढल्या पिढीतही मला एकच काका, एक मामा आणि एक मावशी. गोतावळा जमवायचा तरी कुठून. 

पण भरल्या घरातही सर्वांनाच एकमेकांशी चांगली नाती जपता येतातच असं नाही. हेवेदावेही दिसतात. अनेक वेगवेगळ्या स्वभावांमध्ये हे होणारच. जर घराचे काही नियम करून ते  पाळायचं ठरवलं आणि ते सगळ्यांकडूनच पाळले गेले तरच ते घर माणसांनी भरून आणि टिकून राहील. तरीही प्रत्येक कुटुंब वेगळं राहत असेल आणि वेळप्रसंगीच एकत्र येत असतील तर हल्ली तेवढं नक्कीच जमवून घेतात सगळे, तेवढ्यातच समाधान आहे.   

वास्तू नेहमी तथास्तु म्हणते असं म्हणतात, त्यामुळे सगळ्यांची घरं भरलेली राहोत आणि सर्वांना त्यांच्या घरी आनंदी राहण्याची स्पंदने मिळोत हीच देवाकडे प्रार्थना.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

शुक्रवार, १० जुलै, २०२६

गरज



आपल्याकडून नकळत असं होत असते की आपल्याला असं वाटतं की अमुक माणसाची मला अजिबात गरज नाही, असली तर त्यालाच असेल. म्हणून आपण अशा लोकांशी नकळतपणे का होईना थोडं अधिकारवाणीने वागतो. मी म्हणजे कोणीतरी भारी आणि तुम्ही नेहमी माझंच ऐकलं पाहिजे असा आपला आविर्भाव असतो. पण गरज त्यालाच म्हणत असावेत जी पडली कीच आपल्याला त्याचं महत्त्व समजतं. कोणत्या गरजेला आपल्याला कोण उपयोगी पडेल याचे आपण अंदाज सुद्धा बांधू शकत नाही.

आपल्या अवतीभवती अशीही माणसे असतील जे आपल्याबद्दल असं समजत असतील की यांचा मला काय उपयोग, पडली तर यांनाच माझी गरज पडेल. विशेषतः अनेक नातेवाईकांमध्ये एखाद्याची परिस्थिती थोडी निम्न असेल अशा वेळी तर इतर सगळे त्यांना गृहीतच धरतात. अमुक व्यक्ती वयस्कर आहे तर तिलाच माझी गरज लागणार, अमुक कमी आर्थिक स्तरातील असेल तरी त्यालाच माझी गरज पडेल. असे बऱ्याच जणांचे गैरसमज असतात. पण प्रत्येकच गरज फक्त पैशाने भागेल अशी नसते ना. म्हणून तर 'गरजवंताला अक्कल नसते' आणि 'अडला हरी गाढवाचे पाय धरी' अशा म्हणींचा उगम झाला असावा.

विचार करा एखाद्या व्यक्तीचा आपल्याकडून अपमान झाला असेल, किंवा आपल्याला कधी कोणी खूप अद्वातद्वा बोललं असेल आणि उद्या आपल्याला त्यांचीच किंवा आपल्या अपमानकर्त्याला आपली गरज पडली तर नाक घासत जावेच लागणार. गरज अहंकाराला दूर ठेवण्याचे काम करते. आणि हे जगच असं बनलंय की कितीही पैसा असला तरी माणसाला माणसाची गरज पडतेच. जर कोणाला वाटत असेल माझ्याकडे खूप ऐश्वर्य आहे म्हणून मला कोणाची गरज नाही किंवा मी कोणाला कसंही वागवेन तर असे अहंकार उतरायला वेळ लागत नाही.

लहानपणी आपण गोष्ट शिकलेली असते ती अशी की जंगलाचा राजा सिंह एकदा झाडाखाली झोपलेला असतो आणि झंवर खेळत असलेला उंदीर त्याच्या अंगावर पडतो. सिंह झोप मोडली म्हणून खूप रागावतो, आणि त्या उंदराला मारून टाकण्याच्या तयारीमध्ये असतो. पण उंदीर गयावया करतो म्हणून सिंह त्याला सोडून देतो. काही दिवसांनी सिंह एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकतो तेव्हा हाच उंदीर ते जाळं कुरतडून सिंहाची सुटका करतो. किती छान छान गोष्टी आपण ऐकलेल्या असतात पण प्रत्यक्ष आयुष्यात वागताना त्याचे मतितार्थ मात्र विसरून गेलेलो असतो.

आणि फक्त एखाद्याची गरज कधीतरी पडू शकते असा स्वार्थी विचार ठेवून सगळ्यांशी खोटं गोड वागण्यापेक्षा नेहमीच सगळ्यांशी हेवेदावे, कटुता किंवा काही पूर्वग्रह असतील ते सगळं बाजूला ठेवून चांगलं वागायला काय हरकत आहे.

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

गुरुवार, ९ जुलै, २०२६

मनिम्याऊ



मी खूप लहान असताना बाबांनी एक मांजरीचं पिल्लू कुठूनसं आणलं होतं. मी आणि माझी बहीणही लहानच होतो. त्या पिलासोबत खेळायला, त्याला काय हवं नको ते बघायला आम्हाला खूप आवडू लागलं. तिचं फार मोठं वेगळं नाव वगैरे आम्ही ठेवलं नव्हतं, तिला आम्ही मनीच म्हणायचो. तर मांजर हा फार लाघवी प्राणी. स्वतःचे लाड कसे करून घ्यायचे ते तिला छान जमायचं. आमचं घर खालीच होतं, घरासमोर बाग वगैरे होती. तर ती मनी तिचे विधी त्या बागेतल्या मातीमध्ये जाऊन उरकायची.

ती तिला हवं तेव्हा भटकायला जायची आणि तिला हवं तेव्हा घरी यायची. मनी मोठी होत गेली तशी तिचे निरागस निळसर डोळे करारी हिरव्या डोळ्यांमध्ये रूपांतरित झाले, पण लाडिकपणा मात्र तोच राहिला. मग एकदा असं समजलं की तिला पिल्ले होणार आहेत. तिला ४  पिल्ले झाली. पिल्ले झाली की मनी त्यांना सात जागी फिरवते. आम्ही मोजलं नाही कधी पण थोड्या थोड्या दिवसांनी मनी त्यांची जागा बदलायची खरी. अंगणात आंब्याचं झाड होतं, स्वतः त्यावर जाऊन बसायची आणि खाली पिल्लाना आवाज देत बसायची. झाडाच्या खोडाला पिलांना पुढच्या पायांच्या नखांना धार लावायला शिकवायची. पिल्ले आपलीच शेपटी पकडण्यासाठी गोल गोल फिरत खेळत ते बघायला खूप मौज वाटे. 

आधी मनी उंदीर कुठे कधी खायची आम्हाला कधी समजलं नाही, पण पिलांसाठी दोनतीनदा तिने अर्धमेले उंदीर आणले होते. घरामध्ये त्याची घाण मात्र ठेवली नाही. तिच्या पिलांना शी करायला कुठे जायचं ते आम्ही बाहेर मातीमध्ये ठेवून शिकवायचो. तिला शेवग्याच्या शेंगा आणि उडदाचे तळलेले पापडही खूप आवडायचे. आम्ही शाकाहारी असल्याने आमच्याकडून मात्र तिला फक्त दूध-पोळीच मिळायची. मांसाहारासाठी ती स्वतःवरच पूर्णपणे अवलंबून होती. सकाळी आमचे दूधवाले आले की त्यांच्या मापट्याने तिच्या बशीत पण थोडं दूध ओतायचे.

तिच्या पिलांपैकी दोन थोडी मोठी झाल्यावर आम्ही सोडून आलो, दोन घरातच थांबली. त्यातीलही एक बोका होता तो नंतर घर सोडून निघून गेला. मनीची पिल्ले आल्यानंतर आम्ही पुन्हा पिलांशी खेळण्यात दंग होऊन गेलो. अशी मनीला बऱ्याचदा पिल्ले झाली. त्यातली बरीचशी घरात राहीली काही निघून गेली, बहुतेक करून बोके होते ते निघून गेले. काही आम्ही सोडून आलो. पिल्ले जास्त मोठी झाल्यावर सोडली तर कुठेही अगदी गाडीवर जाऊन त्यांना सोडून आलो असलो तरी ती काही दिवसांनी घरी परतत असत, त्याचं आम्हाला फार आश्चर्य वाटे. 

एकदा एक पिल्लू खूपच सुंदर झालं होतं मनीला तिचं नाव आम्ही ऐश्वर्या ठेवलं होतं. आतपर्यंत जितक्या मांजरी झाल्या त्यात खरोखर ती खूपच देखणी होती. ती आजिबात घराबाहेरच पडत नसे, बरीच मोठी झाली तरी ती कधीच घराबाहेर गेली नाही. तिचा स्वभाव खूपच भेदरट होता. कुठून काही पडल्याचा आवाज आला तरी ती घाबरून मांडीवर येऊन बसत असे. हिचं कसं होणार अशी आम्हालाच चिंता लागून होती. एकदाच पहिल्यांदा ती घराबाहेर गेली आणि नंतर घरी पुन्हा कधी आलीच नाही. ती इतकी घाबरट होती की तिला कदाचित रस्ताही ओलांडता येत नसेल आणि मांजर घरी परततेच तेव्हा तिचं काही बरंवाईट झालं असेल असा आमचा आम्हीच समज करून घेतला आणि वाईट वाटून घेतलं.

तर मनीपासून सुरु झालेला हा प्रवास, मनी म्हातारी होऊन गेली तरी तिची वंशवेल आमच्याकडे चालूच राहीली होती. काही पिल्ले कधी घरातच दगावत तेव्हा त्यांना टेकडीवर जाऊन आम्ही पुरून येत असू. खूप वाईट वाटे. अनेकदा मन्यांची नवजात पिल्ले बोक्यांनी येऊन पळवली. खूप आश्चर्य वाटायचं. मग ते समजल्यावर तीही खबरदारी घेऊ लागलो. पण नंतर नंतर काही पिलांचं घरात असताना मरून जाणं, पिल्ले नवीन असताना मांजरीने घरात उंदरे आणणं त्याची घाण होणं, बोक्यांनी पिल्ले पळवून नेणं या गोष्टींचा त्रास होऊ लागला.

आमच्याकडे शेवटची मांजर राहिली होती तिला जरा जास्तच वर्षे पिल्ले झाली. म्हणजे आम्हाला वाटायचं ही म्हातारी झाली आहे, कधीही जाईल. पण काही दिवसांतच तिचं पोट फुगलेलं दिसायचं. खूप जास्त वयात पिल्ले झाल्याने की काय पण ती पहिलीच अशी मांजर निघाली जिने शेवटी शेवटी स्वतःचीच पिल्ले खाल्ली, बोक्यांनी तर नेलीच काही. नंतर नंतर ती खूप घाणेरडीही राहू लागली. तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती नेमकी चतुर्थी-एकादशीलाच घरात उंदरे-पक्षी मारून आणायची, ती पूर्ण न खाता त्यांचे अवशेष घरात सोडून द्यायची. एकदा देवघरातच मेलेला उंदीर ठेवून गेली होती.

या शेवटच्या अनुभवांनंतर मात्र आम्ही मांजरी पाळणं बंद केलं, तरी साधारण पंधरा ते वीस वर्षे आम्ही मांजरींच्या सहवासात राहीलो, त्याही आमचं कुटुंबच होत्या. त्यांच्या सहवासात ताणतणाव खरंच जाणवत नसतील पण तेव्हा तशी जाणीव नव्हती. आता फ्लॅट सिस्टीममुळे मांजर काय कोणताच प्राणी पाळणं मला शक्य वाटत नाही. आणि इतकी वर्षे त्यांच्या संगतीमध्ये राहून मन भरलं असेल कदाचित.

बुधवार, ८ जुलै, २०२६

मळभ



सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसाच्या रिमझिम धारा, टपोरे थेंब, हिरवाई, इंद्रधनू, वाफाळणारा चहा - कॉफी, पावसाळी भटकंती सगळं सगळं आपल्याला हवंहवंसं असतं. पाऊस सर्वांनाच हवाहवासा वाटतो पण मळभ कोणालाच नको असतं. पाऊस म्हणजे सृजन पण मळभ म्हणजे नकारात्मकता. मळभ म्हणजे अंधार. मळभ म्हणजे नैराश्य. मळभ म्हणजे नकोशी गोष्ट. मन अंधारून आलं तरी त्याला मळभाची उपमा देतात. 

जेव्हा चाळीस-पंचेचाळीस तापमानातला सूर्य कोपलेला असतो, अंगाची लाही लाही होऊन निघालेली असते आणि उन्हाळा त्याच्या संपण्याच्या मार्गावर असतो, तेव्हा मात्र याच काळ्या ढगांची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. पण आपण चुकूनही असं म्हणत नाही की आम्ही मळभ येण्याची वाट पाहतोय. आपण पाऊस येण्याची वाट पाहत असतो. कसं असतं ना, आपल्या सर्वांना सुख हवं असतं पण ते येण्यासाठी काहीतरी तडजोड करावी लागणारच ना. पावसाची वाट पाहताना मळभही येणारच हे आपण सोयीस्कररीत्या विसरून जातो.

प्रत्येक काळ्या ढगाला सोनेरी किनार असते म्हणतात. उन्हाच्या काहिलीमध्ये तो काळा ढग बरसला तरच त्या सोनेरी किनारीचं लख्ख प्रकाशात होणारं रूपांतर आपल्याला हवंहवंसं वाटतं, तो जर पुढे निघून गेला तर मिळणारा प्रकाश हे सुख वाटत नाही. सुखाचा पाऊसही हवाय आणि लख्ख प्रकाशही हवाय तर थोडं मळभ सहन करावंच लागणार. इप्सित साध्य करण्यासाठी लागणारे प्रयत्न आणि कष्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मळभच असतात. फक्त ते मळभ सहन करण्याची शक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे.

आपल्याला माहिती असतं की मळभ ही कधीच कायमस्वरूपी स्थिती नसते म्ह्णूनच आपण ते सहन करतो, जाण्याची वाट पाहतो. मनाचं मळभही एखाद्या नात्याबद्दल किंवा प्रसंगाबद्दल आपल्याला काहीतरी शिकवूनच जातं. आयुष्यातही कठीण प्रसंग आले की मळभ समजून ते जाण्याची वाट पाहायची. कारण मळभ कधीच रित्या हाती जात नाही, ते नेहमी सुखाच्या धारा बरसवूनच जातं. फक्त मळभ दूर होणं महत्त्वाचं!

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

मंगळवार, ७ जुलै, २०२६

सवंग



आपल्या वाट्याला सुख आलेलं असू देत वा दुःख, आपल्याला नेहमी ते कोणाबरोबर तरी वाटून घ्यायचं असतं. सुख आपल्याला भरपूर लोकांसोबत वाटून घेण्याची इच्छा असते, तर दुःख जवळच्या वाटणाऱ्या लोकांबरोबर आपण हलकं करू शकतो. कुठे कोडकौतुक झालं तरी कधी एकदा जगाला सांगतोय असं वाटतं. आणि जगाला सांगण्यासाठी हल्ली तर भरपूर व्यासपीठे उपलब्ध आहेत. व्यक्त होणं माणसासाठी किती महत्त्वाचं आहे.

पूर्वी असं म्हणायचे की सुख जगाला सांगावं आणि दुःख आपल्यापुरतं ठेवावं. पण हल्ली जग असं बदलतंय की दुःखाचा बाजार मांडला की भरपूर सहानुभूती मिळून पैसे प्रसिद्धीही मिळते. रिऍलिटी शोमध्ये पूर्वी गुणवत्ता वगैरे बघत, निदान आपल्याला प्रेक्षकांना तरी तसं वाटे. पण मध्यंतरी एक कल असा सुरु झाला की सहभागी प्रतिस्पर्धी किती दुर्दैवी, किती कमनशिबी. मग प्रेक्षकांच्या मतदानामध्ये साहजिकच त्यांना सहानुभूतीने भरपूर मते मिळत.  एखादी कला ही निव्वळ कला म्हणून सादर करा ना, त्यातून ठरू देत कोण सर्वोत्कृष्ठ आहे ते. अजूनही हा कल  चालू आहे का ते रिऍलिटी शो पाहणे बंद केल्याने काही कल्पना नाही.

आपण दु:खी असणे ही अशी मिरवण्याची गोष्ट आहे का? मी दुःखी आहे ही खरं तर माझी दुर्बलता आहे, त्यामध्ये मिरवण्यापेक्षा लाज जास्त वाटली पाहिजे की आपण परिस्थितीवर मात करू शकत नाही. त्या परिस्थितीवर एकदा मात केली की मग जगाला ओरडून सांगा तुम्ही नक्कीच की तुम्ही यशस्वी कसे झालात. त्याने शेकडो अशा परिस्थितीतल्या होतकरू लोकांना प्रेरणा मिळेल. पण दुःखाचा बाजार मांडण्यात काय पुरुषार्थ आहे? तीच गोष्ट जे करू नये ते करून बघा आम्ही कसे बिनधास्त आहोत हे दाखवणे, संस्कारांची राखरांगोळी केली, टिंगल उडवली की सोशल मीडियामध्ये अजून जास्त प्रसिद्धी.

माणूस हा शक्य तितक्या सोप्या मार्गाने सर्व गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. मग पुरुषार्थ गाजवण्यापेक्षा सहानुभूती मिळवणे नक्कीच सोपे आहे ना. कष्टाने नाव कमावण्यापेक्षा सवंग प्रसिद्धी नक्कीच सोपी आहे. लहानपणी ज्या गोष्टी मूल्ये म्हणून शिकलो त्याच्या सगळं विरुद्ध सध्या पाहायला मिळते. माणसाची जडणघडण अशी झाली पाहिजे की मला काहीही करून परिस्थिती बदलायची आहे. पण तो हे बघत आला की स्वतः काही करण्यापेक्षा रडे राहून, जे करू नये ते करून सर्व साध्य आहे तर का कोणी कष्टाच्या मागे लागेल.

अशा बदलत्या संस्कारांमध्ये, बदलत्या जगरहाटीमध्ये मला खात्री आहे की आजही लाचारीचा मार्ग न अवलंबता स्वतःला सिद्ध करणारी माणसे नक्कीच असतील. आज आहेतच पण उद्याही असतील. सोप्या मार्गांमधला फोलपणा लवकरच लोकांच्या लक्षात येईल. जग आहे म्हटल्यावर त्यामध्ये नानाविध प्रकारचे स्वभाव असणारच. आपण कोणाला प्रसिद्धी देतो आणि त्यातून कोणता कल स्थापित करतो ते आपल्या हाती आहे.  

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

सोमवार, ६ जुलै, २०२६

संकुचित

संकुचित मनोवृत्ती म्हणजे काय असते? डबक्यातले विचार वगैरे ठीकच पण रोजच्या आयुष्यात समजा मला कोणी काही अप्रिय बोललं, तर मी ते जे बोलले त्यामध्ये तथ्य आहे का, आणि त्यानुसार स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणणे शक्य आहे का याचा विचार करण्यापेक्षा सर्वांत पहिली प्रतिक्रिया असते ती म्हणजे मला कसे काय हे बोलतात. दुसरं एक उदाहरण म्हणजे चुका होतात, गैरसमज होतात पण ते दुसऱ्यांनी मुद्दामच केले अशी धारणा ठेवणे. एखाद्या व्यक्तीचा तसा वारंवार अनुभव आला तर गोष्ट वेगळी आहे, पण अशा व्यक्तीकडूनही नेहमीच मुद्दाम केलं जात नसेल ना.

तर माझीसुद्धा अशीच संकुचित मनोवृत्तीच होती पूर्वी. मी काही लहान नव्हते, पण सज्ञान कोणाला म्हणावं हे अठरा या वयावरून ठरण्याइतकं सोपं नक्कीच नाही. मानसिकरीत्या तर नाहीच नाही. तर मी सुद्धा काही लहान नव्हते पण संकुचित होते. कोणी एखादा शब्द अप्रिय बोलला की मला असे कसे म्हणाले, आणि असं का झालं याचं आत्मपरीक्षण करण्यापेक्षा सबबी देत बसणे यामध्ये धन्यता वाटायची. जणू आपलं कधी काही चुकतच नाही असाच नेहमी अविर्भाव असायचा. कोणी बोलल्यावरच कशाला, कधी कुठे आलेल्या अपयशाला सुद्धा सबबीच पुढे असायच्या.

मग आयुष्याच्या एका सुंदर वळणावर तो भेटला. त्याला कोणी काही बोललं, कुठे काही चुकलं की तो आधी त्याच्याकडून काय करता आलं असतं याचा विचार करायचा. मी कधी म्हणाले ते तुला असं असं म्हणाले तर न चिडता ठीक आहे, त्यातला एवढा भाग तर खरा आहे ना असं म्हणून शांत असायचा. कोणत्याही अपमानाला अपयशाला त्याची विक्षिप्त प्रतिक्रिया कधीच नसायची. भले कोणी मुद्दाम त्याच्याशी चुकीचं वागलेलं असू देत. पण त्यातून तो ते माझ्याशी असे वागलेपेक्षा त्यांच्याकडून असं का झालं असावं अशा दृष्टीने विचार करायचा. आणि असं असतानाही लोकांना अशा स्वभावाचा गैरफायदा घेऊ द्यायचा नाही. पण त्यामुळे त्याचं आयुष्य किती सोपं, सुटसुटीत आणि सुंदर आहे हे मला उमगत गेलं.

माझा पटकन प्रतिक्रिया देणारा स्वभावदेखील मग हळू हळू बदलत गेला. ज्यांना मुद्दाम वागायचं ते त्यांच्यापाशी. आपण त्यातून त्यांची काय अगतिकता असेल म्हणून ते असे वागले असतील हाच विचार करायचा. गैरसमज असतील तर आपण म्हणतो माझीच बाजू खरी ते ठीके, पण दुसऱ्याचीही काही बाजू असेलच, ती काय असेल ते पण बघू, समजावून घेऊ असा बदल होत गेला. त्याचा मला आयुष्यात सगळीकडेच फायदा होतो. कुटुंबातील सगळ्या व्यक्तींमध्ये वावरताना, ऑफिसातील लोकांमध्ये काम करताना, मैत्रीमध्ये आणि सगळीकडेच. राग येतच नाही असं नाही. पण तो धुमसत राहण्यापेक्षा शांत होत जातो. स्पष्ट बोलल्याने गैरसमज दूर होत जातात. 

एखाद्याच्या सहवासाने आपलं आयुष्य बदलते असं म्हणतात ना. अशी आपलं आयुष्य सुंदर करणारी माणसं माझ्याप्रमाणेच सर्वांना त्यांच्या आयुष्यात लाभू देत हीच देवाकडे प्रार्थना!

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

रविवार, ५ जुलै, २०२६

रुबाब

आपल्याला आयुष्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटतात. त्यातली काही अशी असतात की मी म्हणजे कोणीतरी आहे. माझे सर्वांनी लाड करा. मला सर्वांनी महत्त्व द्या. माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. काही जण प्रसिद्ध व्यक्ती वगैरे झाल्यावर असे होऊ शकतात, तर काहीजण काहीही कुवत नसतानाही असे असतात. ज्यांना असं घेणं माहिती असतं त्यांना अवतीभवती माणसेही अशीच भेटतात जी त्यांना देतच जातात. स्वतःचे लाड, हट्ट पुरवून घेणं छान जमतं त्यांना. शिवाय केलेल्या छोटाशा गोष्टीचे श्रेय घेणेही छान जमते त्यांना.

अशी व्यक्ती जर प्रसिद्धीच्या झोतात आली, तर ती स्वतःचा रुबाब अगदी छान मिरवू शकते. मिळणारा मानमरातब आपला हक्कच आहे अशीच धारणा तिथे दिसते. त्यांना नेम - फेम मिळालं की स्वतःचं महत्त्व अधिकच चांगल्या रीतीने अधोरेखित करता येतं. त्यांचा जन्मच राजा म्हणून जगण्यासाठी झालेला असतो. राजासारखेच कोणी मागितली तर मदतीलाही पुढे असतात पण त्यामध्ये मला मी केलेल्या मदतीचे पूर्ण श्रेय द्या ही भावना असते. आणि जरी ही व्यक्ती सामान्य माणूस म्हणूनच राहिली तरीदेखील ती राजा म्हणूनच जगते, स्वतःचं मन वगैरे मारून जगत नाही. रुबाब करण्यासाठी माणसाने श्रीमंत किंवा प्रसिद्धच असावं असं काही नाही, ते ज्यांना जमतं त्यांनाच जमतं.

याविरुद्ध असे काही असतात की यांच्यासाठी कोणी काही साधी गोष्ट जरी केली तरी त्यांना ती खूप मोठी वाटते, कोणी काही साधीशीच मदत केली असेल, तेही सहज शक्य होतं म्हणून तर त्याचे यांना फार मोठे उपकार वाटतात. स्वतःहून कोणाला काही काम सांगणं तर लांबच राहिलं, कोणी स्वतःहून यांचं काम करत असेल तरी त्यांना अवघडल्यासारखं वाटतं. मी म्हणजे कोण यत्किंचित प्राणी, माझ्यासाठी कशाला कोणी काही करेल, आणि करत असेल तरी माझ्यासाठी कोणी काही करूच नये. हट्ट आणि लाड हे शब्दही त्यांच्या गावी नसतात.

आता अशी व्यक्ती जर प्रसिद्ध नामांकित कोणी झाली तर पहिल्यांदा त्यांना स्वतःलाच विश्वास नसतो की लोक आपल्याला इतकं ओळखतात आणि इतकं मानतात. कोणी केलेला आदरसत्कार घेणं देखील त्यांना अवघडलेपणाचंच वाटतं. का माझ्यासाठी इतकं करतात, मी कोणी नाही असे काहीसे भाव दिसतात. रुबाब आणि मिरवून घेणं असलं काही यांना जमत नसतं. नेम - फेम मिळूनही हे साधे ते साधेच राहतात. मग लोक त्यांना डाऊन-टू-अर्थ वगैरे म्हणतात. आणि काहीजण प्रसिद्ध नाही झाले तरी ते सर्वांसाठी करतच जातात, तेही कसल्याही श्रेयाची अपेक्षा न करता.

आपण मात्र  प्रसंगानुरूप या दोघांच्या मध्ये कुठेतरी असतो. कधीतरी सगळ्यांनी कौतुक केलेलं आपल्याला आवडतं, कधीतरी आपणही कोणाला न मागता काही मदत करतो. कधी कोणासमोर आपण रुबाबाने वागतो तर कधी एकदम साधे होऊन जातो. तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहिलीत का अशी दोन टोकाची माणसे? किंवा तुम्ही स्वतः आहात का यापैकी एक? पहिला झाला राजा प्रकारचा माणूस. राजाच्या विरुद्धार्थी नेहमी रंक असेल असं काही नाही. आता यातल्या दुसऱ्या प्रकारच्या देतच जाणाऱ्या आणि तरीही राजा नसणाऱ्या माणसांना काय नाव द्यायचं? 

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

शनिवार, ४ जुलै, २०२६

लहर


तुम्ही लहरी व्यक्ती आहात की अगदी शिस्तशीर आणि कर्तव्यदक्ष आहात? मी तर अगदीच लहरी असल्याने कर्तव्यदक्ष लोकांबाबत मला खूपच आदर आहे. अगदी मनाचा चंग बांधून वगैरे फार कमीच गोष्टी होतात माझ्याच्याने. किंवा मग आता अगदी आणीबाणीची परिस्थिती आहे तेव्हाच लहर पळून जाते. आणि एखादं काम जेव्हा करण्याची लहर येते तेव्हा मात्र मी एवढं त्याच्या हात धुवून मागे लागेन की तसं काम कधी कोणी केलंच नसेल. शाळेत अभ्यासही असाच लहर असेल तेव्हा केला, पण परीक्षा आली की मग मात्र त्या विषयाच्या हात धुवून मागे. पण या आयत्या वेळी ताण घेण्याच्या सवयीमुळे होतं काय की अजूनही अधून मधून अशी स्वप्नं पडतात की उद्या वेगळाच पेपर आहे आणि मी वेगळाच अभ्यास केलाय. किंवा परीक्षा एका केंद्रावर आहे आणि मी भलत्याच केंद्रावर, आणि मग नंतर स्वप्नच आहे समजलं आणि आता नाही बाबा कोणती परीक्षा द्यायचीये असं लक्षात आलं की हायसं वाटतं.

लहर हे खरं तर स्वच्छंदी असण्याचं लक्षण आहे. समुद्राच्या लाटांना उगीच का लहरी म्हणतात. त्या त्यांना हव्या तशा येतात आणि त्यांना हव्या तशा जातात. पण त्यानेच समुद्राचं सौंदर्य आहे ना. कल्पना करा की प्रत्येक लाट अगदी शिस्तीने पुढे येतेय, एवढे मीटर अंतर ठेवून, ताशी एवढ्याच गतीने वगैरे, तर आपल्याला समुद्रावर फिरण्याची मजा घेता येईल का. एखाद्या छानशा फुलझाडाला रोज एकाच आकाराचं फूल येत नसतं ना. ऋतूसुद्धा वर्षभरात त्याच्या तीन वेगवेगळ्या लहरी आपल्याला दाखवतो. सूर्याचा रोज पसरणारा संधिप्रकाश रोज वेगवेगळा भासतो, आकाशातल्या प्रत्येक नभाचा आकार वेगवेगळा असतो.  एवढंच का देव कुठे आपल्या प्रत्येक माणसाला एकसारखं बनवतो. निसर्गामध्येच इतकी लहर आहे, तर माणसाने तरी इतकी शिस्त आणायची कुठून. जो माणूस निसर्गाला जवळचं मानत असेल तो लहरीच असणार.  

पण हे असं लहरी असण्याचे खूप तोटे आहेत. तुमच्याइतकीच कुवत असलेली पण जास्त शिस्त असलेली माणसं तुमच्या खूप पुढे निघून जातात. कारण ते लहरीला नाही तर कर्तव्याला महत्त्व देतात. लहानपणी आजीने एखादं काम सांगितलं आणि मी म्हटलं की मूड नाहीये किंवा बोअर झालंय की ती ओरडायची. कसला तुमचा मूड आणि कसला तुमचा बोअर, आमच्या वेळी नव्हतं असलं काही. पण जसजसं वय वाढत जातं, जबाबदाऱ्या येत जातात, तशी लहरीला मुरड घालावीच लागते. कदाचित सगळं जग जिंकण्याइतके नाही आपण पुढे जाणार पण स्वतःचं कुटुंब आणि त्यांचा जिव्हाळा जिंकण्याइतकी शिस्त स्वतःला लावावीच लागते. लहर आणि शिस्तीचा तराजू सांभाळत स्वतःला पुढे न्यावं लागतं. 

मनाला लहरच जवळची वाटते पण हेच मन देवाने इतर प्राण्यांपेक्षा जास्तीचं दिलंय माणसाला देवाने. इतर निसर्ग आणि प्राणी लहरी असतात, पण ही लहर आहे हे समजणारं मनच त्यांच्याकडे नसतं. या लहरी मनाला आवरण्यासाठी मग साधूसंतांना अभंग ओव्या रचाव्या लागतात, रामदास स्वामींना मनाचे श्लोक लिहावे लागतात. आणि आपल्यालाही आपली लहर संधी मिळेल तशीच सांभाळावी लागते. मग होते सवय हळू हळू आणि उमगून जातं की उनाड दिवस एखादाच असू शकतो, रोज रोज नाही. 


#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

शुक्रवार, ३ जुलै, २०२६

क्षण


वार्षिक परीक्षा संपून उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या होत्या. सुट्ट्यांमधला नेहमीचा कार्यक्
रम म्हणजे आजोळी जाणे. तिकडे मस्तपैकी आठ-दहा दिवस मुक्काम ठोकणे. रोज सकाळी उठा, आवरा शाळेचं वेळापत्रकाप्रमाणे दप्तर भरा, मग बसची वाट बघा. दिवसभर तासांवर तास आणि मधल्या सुट्ट्या संपवून परत घरी येऊन थोडा खेळ, थोडा गृहपाठ, जेवण, झोपणं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळा. या सगळ्या धावपळीतून एकदाच्या सुट्ट्या सुरु होऊन गावी गेलं की मग आयुष्यच थांबल्यासारखं वाटायचं. पण तेव्हा माहिती नव्हतं की हे आयुष्य थांबल्यासारखं नाही, तर खरं जगल्यासारखं आहे. 

रोज काही ना काही नवीन बघणं आणि नवीन जगणं. गावी लोडशेडींग तर नित्याचंच. दिवे कधी आले आणि कधी गेले हे समजायचं देखील नाही. खरं तर आजीआजोबांचा दिनक्रमच असा असायचा की दिवे आहेत वा नाहीत काही फरकच पडायचा नाही. एकतर उन्हाळ्यातला मोठा दिवस, पहाटेच उजाडायचं ते अगदी संध्याकाळी सातपर्यंतदेखील काळोख झालेला नसायचा. त्यात तिकडे संध्याकाळी सात-साडेसातलाच रात्रीची जेवणं करून घेण्याची पद्धत. मग बरोबर साडेआठ-नऊ पर्यंत डोळे झाकले जायचे आणि पहाटे पहाटेच जाग यायची. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे सगळं आपल्या गावी किंवा आजोळी अनुभवलंच असेल, खरं तर नवीन काहीच नाही यामध्ये.

पण काही असे खास क्षण आहेत, जे पुन्हा मिळावेत म्हणून जीव चातक झालाय. गावी आम्ही मुलं सगळी अंगणातच झोपायचो. एकदा अशीच मध्यरात्री कशाने माहिती नाही जाग आली. सामसूम तर खूप लवकरच होत असे पण नाही म्हणायला रातकिड्यांचे आवाज तेवढे किरकिरत होते चांगलेच. आणि असंच कुशीवर वळताना वर आकाशात नजर गेली. आणि मन स्तब्ध झालं एकदम, इतका लखलखता चांदणथवा मी आयुष्यात कधी पाहिला नव्हता. जिकडे नजर जाईल तिकडे लहानमोठ्या चांदण्यांचे असंख्य थवे. लहानमोठे काही पुंजके, काही एकदम एकमेकांना बिलगून बसल्यासारखे, काही लंबगोलाकार आकारात एकमेकांशी हितगुज करत असल्यासारखे किती पाहू आणि कुठे पाहू असं झालेलं. अमावस्येची रात्र असावी बहुतेक. चंद्र नसल्याने काळ्या पटलावर चांदण्या जास्तच लखलखत होत्या. अशी रोषणाई मी कधीच पाहिली नव्हती, चित्रातदेखील नाही, आणि प्रत्यक्षात त्या नंतर देखील नाही. आणि आधी जे आवाज रातकिड्यांचे म्हणून ऐकले ते आता त्या चांदण्यांचेच असल्यासारखे भासू लागले. ते नयनरम्य आकाश डोळ्यात सामावून घेत, पहाट होत आली आणि एक एक लहान लहान थवे नाहीसे होऊ लागले तेव्हाच पुन्हा डोळा लागला.

एकदा सुट्टयांमध्ये गावी असंच थोड्या गावाबाहेरच्या राममंदिरामध्ये गेलो होतो. मुलंमुलंच गेलो असल्याने वेळेचं भानच राहिलं नाही, नाहीतर आजी बरोबर असली की बरोबर तिन्हीसांजा होण्याच्या आत घरी पोहोचू असं आम्हाला पिटाळत असे. आणि सूर्य जरा दिसेनासाच झालाय असं लक्षात आल्यावर आम्ही झपझप घरी जायला निघालो. आणि थोडं टेकडीपलीकडे लक्ष गेलं तर काय, पूर्वेला टेकडीमागे हे एवढा मोठ्या भाकरीसारखा चंद्राचा गोल दिसत होता. तसा अजून सूर्य जाऊन अंधारही झाला नव्हता आणि हे चंद्राचं गुलाबी लोभसवाणं रूप समोर दिसत होतं. अमावस्येच्या रात्री जे आभाळभर चांदणं पाहीलं होतं ते सगळंच्या सगळं जणू या पौर्णिमेच्या चंद्रामध्ये एकवटलं होतं. त्याकडे पाहत पाहतच घरी पोहोचलो. तो तसा पौर्णिमेचा चंद्र ठरवून क्षितिजावर गेलं तरी आजवर कधी दिसला असं वाटलंच नाही.

गावाच्या आठवणी या दोन दिवसांनी, एक अमावस्या आणि एक पौर्णिमा यांनी अविस्मरणीय झाल्या आहेत. इतकंच का, पण तसंच दृश्य दिसलं ना तरी तो विलक्षण अनुभव परत कधी मिळाला असं वाटलंच नाही कधी. अवचित मिळणाऱ्या सुखाची सर ठरवून मिळवलेल्या सुखामध्ये नसते ना. असा असतो एक एक क्षण की तोच क्षण पुन्हा कधीच मिळत नाही.  

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

गुरुवार, २ जुलै, २०२६

निवांत

तुम्हाला असं कधी वाटतं का, की वा आजचा दिवस किती छान निवांत आहे. मलाही खूप दिवस झाले आहेत असा निवांतपणा अनुभवून. हल्लीच्या काळात सोमवार ते शुक्रवार कुठे निवांतपणा सापडणं कठीणच आहे. पण शनिवार रविवारदेखील येणाऱ्या आठवड्याची बेगमी करण्यात असे निघून जातात की असं वाटतं, यापेक्षा तर ऑफिसचा दिवस परवडला. अजूनही पुलंचे मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर यामधले मुंबईकर म्हणजे काट्यावर धावणारा वगैरे रील्स फिरतात आणि आजसुद्धा काहीजण ते पुणेकरांना चिडवण्यासाठी वापरतात हेच केवढं मोठं आश्चर्य आहे. पुण्यातला निवांतपणा हरवूनही बराच काळ लोटलाय आता. हल्ली पूर्वीचं पुणं राहिलं नाही हो :D 

असो तर विषय पुण्याचा नसून निवांतपणाचा आहे. माणसाचं वय वाढत जातं तशी बाह्य धावपळीपेक्षाही मनाची धावपळ जास्त वाढते. किंवा ऊर्जा कमी कमी होत चालल्याने असेल, आधीपेक्षा कमी कामं करूनही धावपळच होतेय असं वाटत राहतं. आपण कोणाकोणाचे 'चिल' करायला गेलेले फोटो वगैरे बघतो आणि असं वाटतं यांना कसा एवढा निवांतपणा मिळतो. तेच आपण कुठे निवांत फिरायला गेलो आणि आपले फोटोही इतरांना तसेच वाटले तरी तो निवांतपणा फक्त फोटोतच असतो, प्रत्यक्षात आपण तो अनुभवलेलाच नसतो. ज्याचं मन जबाबदाऱ्या घेणं हेच करत आलंय त्याला जगात कुठेही निवांतपणा नसतो.

मग आपल्याला असं वाटतं लहान होतो तेव्हा किती निवांत होतो, मग कॉलेजला जायला लागलो तरी निवांतच होतो, मग नवीन नवीन नोकरी लागली तरी एवढी काही धावपळ नव्हतीच. मग असे टप्पे आठवतच जातात. पण नक्की कधी निवांतपणातून आपण या धावपळीच्या धबडग्यात पडलो तेवढं मात्र नेमकं आठवत नाही कधी. मग निवांतपणाची ओढ लागते. अमुक झालं ना मग मी एकदम निवांत होईन, असं असं झालं ना की मी नक्कीच निवांत होईन. मग "दिल ढुंढता है फार वही फुरसत" वगैरे गाणी एकदम जवळची वाटू लागतात.

असा शोधून जगात निवांतपणा मिळाला असता मग अजून काय हवं होतं. तसा तर तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो. आपणच त्याला आपल्या आयुष्यातून हुसकावून लावलेलं असतं. सकाळ संध्याकाळचा चहाच घ्यायचाय, पण घेऊ जरा निवांत, पुढच्या दिवसाची आजिबात चिंता न करता. गेलो कुठे फिरायला छान तर तेच क्षण मजेत घालवूयात, अमका फोटो आणि रील कसा येईल आणि मग त्याला किती अंगठे मिळतील याची चिंता न करता. रात्रीचं जेवण करू जरा घरच्या सगळ्यांसोबत गप्पा मारत उद्याच्या दिवसाची काळजी न करता. आणि नाही असं केलं तर देव जो कायमचा निवांतपणा देतो तोपर्यंत कधी निवांतच होता नाही ना येणार!

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६