तुम्हाला असं कधी वाटतं का, की वा आजचा दिवस किती छान निवांत आहे. मलाही खूप दिवस झाले आहेत असा निवांतपणा अनुभवून. हल्लीच्या काळात सोमवार ते शुक्रवार कुठे निवांतपणा सापडणं कठीणच आहे. पण शनिवार रविवारदेखील येणाऱ्या आठवड्याची बेगमी करण्यात असे निघून जातात की असं वाटतं, यापेक्षा तर ऑफिसचा दिवस परवडला. अजूनही पुलंचे मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर यामधले मुंबईकर म्हणजे काट्यावर धावणारा वगैरे रील्स फिरतात आणि आजसुद्धा काहीजण ते पुणेकरांना चिडवण्यासाठी वापरतात हेच केवढं मोठं आश्चर्य आहे. पुण्यातला निवांतपणा हरवूनही बराच काळ लोटलाय आता. हल्ली पूर्वीचं पुणं राहिलं नाही हो :D
असो तर विषय पुण्याचा नसून निवांतपणाचा आहे. माणसाचं वय वाढत जातं तशी बाह्य धावपळीपेक्षाही मनाची धावपळ जास्त वाढते. किंवा ऊर्जा कमी कमी होत चालल्याने असेल, आधीपेक्षा कमी कामं करूनही धावपळच होतेय असं वाटत राहतं. आपण कोणाकोणाचे 'चिल' करायला गेलेले फोटो वगैरे बघतो आणि असं वाटतं यांना कसा एवढा निवांतपणा मिळतो. तेच आपण कुठे निवांत फिरायला गेलो आणि आपले फोटोही इतरांना तसेच वाटले तरी तो निवांतपणा फक्त फोटोतच असतो, प्रत्यक्षात आपण तो अनुभवलेलाच नसतो. ज्याचं मन जबाबदाऱ्या घेणं हेच करत आलंय त्याला जगात कुठेही निवांतपणा नसतो.
मग आपल्याला असं वाटतं लहान होतो तेव्हा किती निवांत होतो, मग कॉलेजला जायला लागलो तरी निवांतच होतो, मग नवीन नवीन नोकरी लागली तरी एवढी काही धावपळ नव्हतीच. मग असे टप्पे आठवतच जातात. पण नक्की कधी निवांतपणातून आपण या धावपळीच्या धबडग्यात पडलो तेवढं मात्र नेमकं आठवत नाही कधी. मग निवांतपणाची ओढ लागते. अमुक झालं ना मग मी एकदम निवांत होईन, असं असं झालं ना की मी नक्कीच निवांत होईन. मग "दिल ढुंढता है फार वही फुरसत" वगैरे गाणी एकदम जवळची वाटू लागतात.
असा शोधून जगात निवांतपणा मिळाला असता मग अजून काय हवं होतं. तसा तर तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो. आपणच त्याला आपल्या आयुष्यातून हुसकावून लावलेलं असतं. सकाळ संध्याकाळचा चहाच घ्यायचाय, पण घेऊ जरा निवांत, पुढच्या दिवसाची आजिबात चिंता न करता. गेलो कुठे फिरायला छान तर तेच क्षण मजेत घालवूयात, अमका फोटो आणि रील कसा येईल आणि मग त्याला किती अंगठे मिळतील याची चिंता न करता. रात्रीचं जेवण करू जरा घरच्या सगळ्यांसोबत गप्पा मारत उद्याच्या दिवसाची काळजी न करता. आणि नाही असं केलं तर देव जो कायमचा निवांतपणा देतो तोपर्यंत कधी निवांतच होता नाही ना येणार!
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६