बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

सिनेमा-सिनेमा


"मुंबई-पुणे-मुंबई २" आणि "कट्यार काळजात घुसली" दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आणि दोन्ही बघायचेच होते. तसा प्रेम-रतन…. देखील त्याच दिवशी झाला पण पहायच्या यादीत तो दूर-दूर पर्यंत नाही. अगदी television वर येईल तेव्हाही… 

आधी आवडलेल्या चित्रपटाबद्दल बोलूयात अर्थात कट्यार! चित्रपट त्यातल्या सगळ्याच गोष्टींसाठी आवडला. संगीत, अभिनय, दिग्दर्शन, कलाकारांची निवड, सर्वांचे प्रामाणिक प्रयत्न या सगळ्यासाठीच चित्रपट आवडला. सुबोध भावेचा हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न असेल असं मुळीच वाटत नाही. तल्लीन होऊन चित्रपट पाहणे म्हणजे काय याचा अनुभव हा चित्रपट पाहताना घेतला. कोणीही प्रत्यक्ष समोर गात नसताना, कोणतंही live संगीत नसतानादेखील आपण नकळत तल्लीन होऊन जातो. असंच बालगंधर्वच्या वेळी देखील झालं होतं. 

सर्वच गाणी/पदे अप्रतिम! थोड्याफार उणीवा नक्कीच आहेत. जसं की सदाशिवचा सांगीतिक संघर्ष आपल्यापर्यंत पोहोचत नाही. घराण्याच्या अभिमानाचं महत्त्व लक्षात येत नाही पण चित्रपटगृह सोडताना आपली प्रतिक्रिया असते वाह, काय सुंदर कलाकृती होती. अर्थात ज्यांना या प्रकारच्या संगीतात अजिबातच रुची नाही त्यांना चित्रपट कंटाळवाणा होऊ शकतो. पण मी तर बुवा पुन्हा एकदा आणि चित्रपटगृहात जाऊनही पुन्हा एकदा पहायला नक्कीच तयार आहे. तुम्हीही नक्की पहा! आणि हो,  महागुरू सचिन यांचं खास अभिनंदन ;) . एकदम भारी चित्रपट… 

आता मुंबई-पुणे-मुंबई २. मनापासून पटण्यासारख्या फार थोड्या गोष्टी चित्रपटात होत्या. एकतर दुसराच सीन वोडकाचा पाहून तिथूनच चित्रपटाशी disconnect व्हायला सुरुवात झाली. हल्ली ही फार common गोष्ट असेलही, पण एखादी मुलगी आधुनिक आहे, तिच्यामध्ये आत्मविश्वास आहे आणि ती professionally यशस्वी आहे हे ठसवण्यासाठी तिने दारू कशाला प्यायली पाहिजे? तिचा smartness तिच्या विचारांमधून समजायला हवा जो  मुंबई-पुणे-१ मध्ये दिसला होता. चित्रपटात अशा गोष्टी दाखवून लोकांना प्रोत्साहन द्यावं का हा वादाचा मुद्दा आहे. चित्रपट मनोरंजन करण्यासाठी असतात आणि लोकांना शहाणपण शिकवण्यासाठी नाही असाही मतप्रवाह आहे आणि चित्रपटांना सामाजिक भान असायला हवं असं मानणारा देखील एक वर्ग आहे, मी अर्थातच दुसऱ्या वर्गात (कुठल्या जमान्यात राहतेस तू असं म्हणायचं असेल तर खुशाल म्हणा!). 

गौरी (मुक्ता बर्वे) उगीचच confused दाखवली आणि त्याचा अतिरेक केलाय. शेवटी शेवटी तर तिच्याशी सहमत होण्यापेक्षा तिच्यावर हसूच येतं. खऱ्या आयुष्यात कोणाच्या बाबतीत same situation आली तर कोणीही कदाचित अर्णवची निवड करेल. पण केवळ आपल्या चित्रपटाचा नायक गौतम असल्याने त्याची निवड तिने केली असं वाटलं. चित्रपटात जाहिराती घुसडण्यासाठी गौतमचं profession बेमालूमपणे बदललं. आणि पिक्चरच्या तिकिटात आम्हांला जाहिरातीही पहाव्या लागल्या. एकंदर एकाही पात्राशी स्वत:ला relate करता आलं नाही. फक्त प्रशांत दामलेंमुळे जरा काहीतरी जान आली.

तमाशा देखील बघायचाय. मला ज्या प्रकारचे सिनेमे आवडतात त्या प्रकारचे सिनेमे न आवडणाऱ्याना हा चित्रपट आवडला नाही म्हणजे मला नक्कीच आवडेल (हुश्श). आपल्या type चा वाटतोय तमाशा, बघू लवकरच!

छायाचित्र आंतरजालावरून


२ टिप्पण्या:

  1. तमाशा कळाला तर अप्रतिम लाजवाब नाही कळाला तर बोर. कथा पटकथा अभिनय नेपथ्य सगळच अनोख. आवर्जुन पाहण्यासारखा.

    उत्तर द्याहटवा