मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

सुख...

          ययातिला म्हणे त्याचं भविष्य सांगितलं होतं कोणी, की तुला जगातली सगळी सुखं मिळतील पण तरीही तू सुखी होणार नाहीस. लहानपणी हे त्याने ऐकलं तेव्हा त्याचं त्यालाही हसू आलं. सुख मानण्यात आहे म्हणतात. मग सगळेच का सुखी होत नाहीत?

            तोही असाच सुखाच्या शोधात होता. तसा लहानपणापासून ओळखीचा. गरीब पण स्वाभिमानी कुटुंबात जन्मलेला. लहानपणी वडिलांचे बेताल वागणे आणि त्यामुळे आईला होणारा मनस्ताप उघड्या डोळ्यांनी पाहणारा. पैशासाठी कुटुंबाची होणारी वणवण आणि त्याचे चटके सोसलेला. तेव्हाच त्याने ठरवलं, मी माझं कुटुंब याच परिस्थितीत राहू देणार नाही. हे सगळं मी बदलेन. पैसा आल्यावर सगळं ठीक होईल असं वाटायचं त्याला! माझ्या आईला मी एक दिवस सुखी करेन. नकळत्या, खेळण्या बागडण्याच्या वयात त्याच्या मनाने दडपण घेतलं. बालपण कोमेजून गेलं. १०-१२ व्या वर्षापासूनच पेपर टाक, दूध लाईन टाक ही कामं त्याने सुरु केली.

             अभ्यासात तर हुशार होताच. दर वर्षी चांगल्या गुणांनी पास व्हायचा. जिद्द अजूनही संपली नव्हती. जे कमवेल ते आईकडे द्यायचा. बसलाही पैसा खर्च होऊ नये म्हणून चालत शाळेत जायचा. काम करत करतच खूप शिकला. चांगली नोकरीही मिळाली. घराला आधार मिळाला. पैशाच्या चिंता तर मिटल्या. त्याला वाटलं आता आपली आई सुखी असेल.

            गरिबीमुळे आणि नवऱ्याच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे दूर गेलेले नातेवाईक, लोकांची बोलणी यांचा मारा आपण कणखरपणे सहन केलाय असं तिला वाटायचं पण... पण एव्हाना आईचा स्वभावच बदलला होता.  वागणं संशयी झालं होतं. आधीच रागीट असलेला स्वभाव जास्तच हेकेखोर झाला होता. घरच्यांचा ती सारखा पाणउतारा करू लागली होती. अगदी त्याचासुद्धा. त्याने आईचे हाल पाहिले होते त्यामुळे आईला कधी काही बोलायचं नाही असं त्याने ठरवलेलं. पण आता पाणी डोक्यावरून चाललं होतं. त्याला त्याचं प्रेम असलेल्या मुलीशी लग्न करणंही आईच्या अशा वागण्याने अशक्य होऊन बसलं आहे. आईची लहानसहान गोष्टींवरून चिडचिड, आदळआपट.

              आता पैसा तर भरपूर होता पण घराची शांतता नष्ट झालेली. आईला मानसोपचार तज्ञाची गरज आहे पण हे तिला सांगण्याची ना त्याची हिम्मत ना वडिलांची! घरात लग्न करून तिच्यासाठी सून आणावी तर आई तिच्याशीही पटवून घेणार नाही हे त्याला पक्कं माहितीये. त्याला आईला दु:ख होईल असं काही करायचं नाही कारण मुलाला जन्म देताना आईला किती यातना होतात याची त्याला जाणीव आहे. त्याचा   समजूतदारपणाच  त्याला आता नको झालाय. देव करो आणि तो आधीच्याच खंबीरपणे या सर्वांतूनही लवकर बाहेर येवो.