शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८

फुलं...

फुलं आणि आपण यांचं न सांगता येणारं काही नातं आहे. प्रत्येक भावना मग ते प्रेम असो, दुःख असो, शुभेच्छा वा भक्ती ते व्यक्त करण्याचं साधन आणि माध्यम ही फुलं असतात. फुलं कोणाला आवडत नाहीत? आनंदात असू तर तो ही फुलं द्विगुणित करतात आणि दुःखात असू तर मन प्रसन्न करायला हातभार लावतात. झाडावर डोलणारी, दवबिंदूत न्हाऊन निघालेली आणि फुलपाखरांना खुणावणारी फुलं सगळ्यांत सुंदर दिसतात ना? अशीच काही मन प्रसन्न करणारी फुलांची मला टिपता आलेली छायाचित्रं!

काही कळ्या आणि पाने 





घरचा मोगरा, माठात घालून याचं पाणी प्यायला मिळणं हे उन्हाळ्यातलं एक सुख आहे. 






चाफा नेहमीच आपल्याशी काहीतरी बोलणारा... 

चंदीगडची गुलाबबाग 










केरळातली काही फुलं 












दांडेली इथली काही फुलं. 














गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

चव्हाण सर

मी शाळेत असताना आमचे आपटे प्रशालेचे मुख्याध्यापक "श्री एकनाथ चव्हाण" सर होते. तीस जानेवारीला त्यांच्या निधनाची बातमी समजली आणि त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी जाग्या झाल्या त्यातलीच पुढील एक.

आम्ही तेव्हा दहावीला होतो. शाळेतलं शेवटचं वर्ष म्हणून आम्हाला शिंगं फुटली होती. गॅदरिंग आणि गेम्सचे दिवस चालू होते, त्यामुळे वर्गात विशेष शिकवणं चालू नव्हतं. एके दिवशी समजलं की बरेच शिक्षक त्या दिवशी रजेवर आहेत, आणि मधल्या सुटीनंतर फक्त एकच तास होणार आहे तेव्हा वर्गातल्या आम्ही काही जणांनी सुटीमध्ये घरी पळून जायचा प्लॅन केला. सुटी सुरु झाली आणि आम्ही डबे खाण्याऐवजी आपापल्या घोळक्याने गेटबाहेर जाऊ लागलो. दप्तर घेऊन सुखरूप शाळेबाहेर आल्याने आम्हाला अगदी हिमालय सर केल्याचा अभिमान वाटत होता. बाहेर तास-दीड तास वेळ घालवून सगळे मजेत घरी गेलो.

दुसऱ्या दिवशी शाळेत पहिल्या तासाला आमचं स्वागत दामले काकांनी केलं. सर्वांना वर्गात बसवून ते खूप ओरडले,  तुम्हाला सर्वांना भारतरत्न द्यायचं का आता वगैरे बरीच बडबड केली. तेव्हाही आम्हाला त्याचं गांभीर्य नव्हतं. पण नंतर वर्गात नोटीस आली की चव्हाण सरांनी उद्या आमच्या पालकांना शाळेत भेटायला बोलावलंय तेव्हा मात्र धाबे दणाणले.

घरी बाबांना सगळा झालेला प्रकार सांगितला, आईला सांगू नका प्लिज म्हटलं. मला बाबांची भीती नव्हती म्हणून काही वाटलं नाही, ज्यांना असेल त्यांचं काय झालं असेल याची कल्पना करवत नाही. दुसऱ्या दिवशी सरांच्या ऑफिसमध्ये आमचे पालक गेले. बाहेर भीतीने सगळ्यांची गाळण उडाली होती. बऱ्याच जणांनी घरी; सरांनी बोलावलंय यापेक्षा जास्त काहीच सांगितलं नव्हतं. आता प्रत्येकजण बाहेर आल्यावर आपला पालक आपली सगळ्यांसमोर बिनपाण्याने कशी करेल या धास्तीमध्ये होता. 

बराच वेळ गेला आणि पालक बाहेर येत असल्याची चाहूल लागली आणि आम्ही सगळे जण सावरून उभे राहिलो. आणि बघतो तर काय सगळ्यांचे पालक हास्यविनोद करत छान रमतगमत बाहेर येत होते. आम्हाला काहीच समजेना. मग बाबा दिसले त्यांना विचारलं काय झालं आतमध्ये, सर काय म्हणाले? तर ते म्हणाले काही नाही आम्हाला सगळ्यांना चहा-बिस्किटं दिली आणि मुलं दहावीला आहेत तर आता त्यांचा कसा अभ्यास घ्या वगैरे असं मार्गदर्शन केलं. मी म्हटलं आणि काल झालेल्या प्रकारचं काय? तर ते म्हणाले त्यांनी तो विषयदेखील काढला नाही.

सरांबद्दल फारच आदर वाटला तेव्हा, किती कौशल्याने त्यांनी आम्हाला धडा शिकवला शिवाय आमच्या पालकांची भेटही घेतली. असे आमचे चव्हाण सर, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, देव त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो!