शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

अर्ध्या वाटेवर


घरातून निघताना आपल्याला कुठे जायचंय हे माहिती नाही असं नसतंच ना! अगदीच डोकं भिरभिरलंय आणि काय करावं सुचत नाही असा एखादा आणि तेही क्वचितच निघत असेल घरातून कुठे जायचंय हे न ठरवता, किंवा वाटेतच ठरवत असेल कुठे जायचं ते. काहीजण प्रवासाची जागेवर पोहोचण्यापेक्षा जास्त मजा लुटतात तर काही इच्छित स्थळी पोहोचण्यावर जास्त लक्ष देतात आणि प्रवासाला कंटाळवाणं मानतात. 

प्रवासाची मजा लुटता येईल नक्कीच पण रोजच्याच प्रवासाचा आनंद कोणी घेतो का? ऑफिस दहा किलोमीटरवर आहे आणि ट्रॅफिकमुळे रोज पोहोचायला दीड दीड तास लागत असेल तर तो काय बिचारा प्रवासाची मजा घेणार? त्याच्यासाठी तर कधी एकदा ऑफिसला किंवा घरी पोहोचतो असंच होणार ना. मग कोणी कितीही सांगितलं की "the journey is always better than the destination" तरी काय फरक पडतो!

आयुष्य हा प्रवासच आहे असं सगळेच म्हणतात, पण असा प्रवास की ज्याचं खरंखुरं गंतव्यस्थळ कोणालाच नको आहे. रोजचाच झालाय हाही प्रवास. कधी आपण जागेवर पोहोचलो असं वाटतच नाही. आज काही मिळालं तर उद्या आपला जीव दुसरं काहीतरी मिळवण्याच्या मागे. शांत, निवांत कधी वाटतच नाही. आपण कायमच आपले कोणत्यातरी गोष्टीच्या अर्ध्या वाटेवरच !

आयुष्य हा प्रवास आहे म्हणण्यापेक्षा आपला प्रत्येक दिवस हेच आपलं destination आहे असं मानलं तर कदाचित हे अर्ध्या वाटेवरचं जीव टांगणीला लागणं थोडं कमी होईल का ?