मंगळवार, २२ मार्च, २०११

शिवरायांचा सांगावा... (कविता)

Image Courtesy: Internet

काल चक्क स्वप्नात
महाराज आले,
अन चौफेर नजर फिरवून
मग म्हणाले...

सह्याद्री तर अजूनही तोच,
या देशाची हद्द
कुठे गेली पण आज इथल्या
गड्यातली जिद्द

पहा तिकडे चौको-चौकी
सज्ज जयंतीचे मांडव
मनातुनी परी सर्व कोरडे,
ईर्ष्या घालतसे तांडव

आमचे नाव म्हणजे राहिले आहे
निव्वळ राजकारण
पैशासाठी सेनापती ठेवती
देशासही तारण...

आमच्या मिरवणुकीत नाचे
ही मद्यधुंद तरुणाई
कुठे आहे तानाजींची उर्मी
अन बाजींची नवलाई?
                                                              
आमच्या नावे इथे
या संघटना मिरविती
ग्रंथ इथले तुडविती हे,
जनास अन भिवविती

आम्ही जोपासले अठरापगड इथे,
नांदले गुण्या-गोविंदाने
आज काही म्हणती 'शिवबा आमचा',
का गर्जती ही विधाने?
                                                         
बहुत दु:खेदेखील इथे
दिसते आहे एक आस..
इथला सामान्यच  पुन्हा घडवेल
महाराष्ट्राचा इतिहास...

जगदंब जगदंब, श्रींच्या मनी
आज पुन्हा तीच इच्छा येवो,
अन सच्च्या मराठी मनाचे आज
इथे 'स्वराज्य' होवो...



मंगळवार, १५ मार्च, २०११

नियती

              एक लालबुड्या बुलबुल बरेच दिवस झाले पारिजातकापाशी  घिरट्या घालत होता. मग दुपारच्या निवांत वेळी हळूहळू काड्या, गवत, कापूस, चिंध्या इत्यादी जमवायला त्याने सुरुवात केली. थोड्याच दिवसात पक्षीणही  त्याच्या बरोबर येऊ लागली. तसं आंब्याचं झाडही होतंच, पण आंब्यावर कावळ्यांनी आधीच ठाण मांडल्याने असेल किंवा उपजतच रसिकतेने असेल, लालबुड्यांनी घरट्यासाठी पारिजातकाचे झाड निवडले. थोड्याच दिवसात लहानसेच पण सुबक  घरटे गुंफून तयार  झाले. आम्हा सर्वांना फारच कौतुक वाटे  घरट्याचे! लालबुडे किलबिल किलबिल करत अंगणभर फिरत असत.
संपूर्ण वातावरणच  बदलून टाकले होते त्या इवल्याशा पक्ष्यांनी. घरट्याचे रोज निरीक्षण चालूच असायचे. थोड्याच दिवसांत त्या घरट्यात चंदेरी आणि काळे ठिपके असलेली अंडी दिसली. कोण आनंद झाला ती पाहून!


                  साधारण तेव्हाच मनीलाही चार पिल्ले झालेली.  ती पिल्ले तर घरभर बागडत होती. त्यांना आवरता आवरता नाकी  नउ  येत. मध्ये मध्ये पक्षी फिरायला गेले कि घरट्याची पाहणीही चालूच होती आमची. आता अंड्यांमधून चिमुकलीशी दोन पिल्ले बाहेर आली होती. मनीची पिल्ले आणि पक्ष्यांची पिल्ले आम्हाला छंदच जडला होता त्यांचे निरीक्षण करण्याचा!


               पण कुठून कोण जाणे एका बोक्याला यांची चाहूल लागली. एक दिवस दुपारी येऊन त्याने मनीचे एक पिल्लू पळवले. आम्ही सावध झालो पण दुसर्या दिवशी तो आल्यावरही 
आम्ही काहीच करू  शकलो नाही, त्याला हुसकावण्याचे अनेक प्रयत्न केले, पण आमच्या लक्षात यायच्या आताच त्याने दोन पिल्लांना मारून टाकले होते आणि तिसरे तोंडात घेऊन पळाला तो बोकाधम. पिल्लांसाठी खूप वाईट वाटले. मनी बिचारी एकटीच घरभर त्यांना शोधत फिरत होती.

       
दुसऱ्या दिवशी रात्री बाहेरून झाडाच्या पानांचा आवाज होतोय असे वाटले. बाहेर जाऊन पहिले तर लालबुड्यांच्या घरट्याजवळ तोच बोका.  तेव्हा त्याला हुसकावून लावले. पण त्याने कधी संधी साधली माहिती नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरटे अस्ताव्यस्त खाली पडलेले, आणि लालबुड्या एकटाच फिरताना दिसतो अजूनही कधीतरी दुपारच्या वेळी!
               

गुरुवार, १० मार्च, २०११

स्त्रीस (कविता)

आज एकविसाव्या शतकात
          स्वत:च्या सौंदर्याचा बाजार मांडलायस  तू
          फक्त दिखाव्याच्या जगात अडकलीयेस तू
मिस वर्ल्ड होण्याची स्वप्ने तू पाहतेस
त्यासाठी संस्कारांनाही पाने पुसतेस

         तुझी काया पूर्वी असायची झाकण्यासाठी
         आता धडपडतेस  तू तीच दाखवण्यासाठी
स्त्री-मुक्तीच्या लढ्याची सोंगं करतेस
पण तू तर स्वच्छंदी मुक्ताच आहेस
         आधीही होतीस आणि पुढेही राहशील!

तुझ्याचमुळे रामायण घडलं  नि महाभारतही तुझ्याचमुळे!
        तेव्हापासून तुझं महत्त्व आहे,  तरी म्हणतेस मी बंधनात आहे!
स्वत:लाच इतकं स्वस्त केलंयेस तू
        की shaving क्रीमच्या add मध्येही दिसलीच पाहिजेस  तू
असलंच स्वातंत्र्य हवा होतं का तुला?

बुद्धी शक्तीच्या च्या जोरावर कितीही पुढे जा
पण तुझ्या शालीनतेला विसरू नकोस
समजूतदार होऊन नाती जोड, ती तोडू नकोस
तुझ्या उत्कर्षाआड  येण्याची कोणाचीही हिंमत नाही
पण तूच स्वत:ची किंमत कमी करून घेऊ नको

तुला देणगी आहे जिजाऊ बनण्याची,
राणी लक्ष्मी नि देवकी होण्याची
         स्वत:ला घडवतानाच दुसऱ्यांना घडव
         प्रेमाने सगळ्यांशी नातं जडव
तू आहेस म्हणूनच तर विश्व आहे
'आई' ही हाक ऐकण्याची संधी फक्त तुलाच आहे....



बुधवार, २ मार्च, २०११

स्वप्नातलं मन (कविता)

स्वप्नात रमणारं  मन आपलंच असतं
देहाला निश्चल ठेवून सूप्तरूपाने   फिरून येतं..
वास्तवापेक्षा तेच जग अधिक प्रिय वाटतं त्याला
इथं जे मिळत नाही त्याचा तिथे शोध घेतं...
स्वप्नात सगळं मनाचंच  राज्य असतं
तरी तिथेही काहीबाही विचार करतं
प्रत्यक्षात तर आहेच मन मारणं...
तिथं तरी मुक्त व्हायला याचं काय जातं...
कधी कधी तर जागेपणीही   स्वप्नं पाहतं
पण त्यांना आवर घालायला हे तयार   नसतं..
उगीचच एक वेगळं जग निर्माण करून
स्वप्नांच्या दुनियेत पुन्हा स्वप्न पाहू लागतं...
स्वप्नातल्या स्वप्नातही याला कळत नाही
की हे काही आपलं खरं जग नाही ...
या स्वप्नाळूपणाचा  अंतच नाही?
कुठून तरी आनंद मिळवायचा इतकंच याला कळतं...
स्वप्नात रमणारं  मन आपलंच असतं...