बुधवार, १५ जून, २०११

प्रिय मैत्रिणीस...

          परवा तुझं लग्न झालं. आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येणारा तो हळवा क्षण आलाच. निरोप घेण्याचा! तू हे शहरही सोडत होतीस त्यामुळे निरोप जास्तच गहिरा झाला.  तू तुझ्या वैवाहिक आयुष्यात पाऊल टाकलं आहेस. आणि मला माहिती आहे, प्रत्येक नात्याप्रमाणेच तू हे नातंही यशस्वीच करशील. तुझ्या हसऱ्या आणि खेळकर स्वभावाने तू सर्वांना आपलंसं करशील.

             तुला सासरी आणि नवीन शहरात रुळायला थोडा वेळ लागेल म्हणा, पण एकदा नवरा आणि मुलं-बाळं यांच्यात गुरफटून गेल्यावर तुला कधी माझी आठवण येईल? नाही का येईना... पण तुला कधीही मनातलं काहीही बोलावसं वाटलं तर मी आहे हे मात्र विसरू नकोस. उलट मी तर म्हणेन तू तुझ्या संसारात इतकी गुरफटून जा, की नकोच येऊ दे तुला माझी आठवण. :)

           तुझा निरोप घेताना आपण एकत्र असतानाच्या सगळ्या आठवणी झरझर डोळ्यांसमोरून वाहू लागल्या. एक तपाची मैत्री आहे आपली असं सर्वांना अभिमानाने  सांगायचो आपण, पण दोन मैत्रिणींना कधीतरी दूर जायचंच असतं, आणि स्वत:च्या संसारात रमायचंच  असतं! दोन मित्र एकमेकांचे कायम मित्र राहतात. पण दोन मैत्रिणी? त्यांना ते कधीच शक्य होत नाही. हे सर्व आपल्या दोघींनाही माहिती होतंच की. तरीही आपण मैत्रीला शक्य तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न केला. नाही पहिल्यासारखं आपण रोज भेटणार, रोज नाही बोलता येणार आपल्याला. पण त्यामुळे मैत्री का तुटते? आधी एकमेकींच्या हाकेसरशी धावून येणाऱ्या आपण, आता प्राधान्यक्रम बदलेल. पण हे तर व्हायचंच ना! पण वरवर मैत्रिणी म्हणणे आणि मनातून हेवेदावे ठेवणे (हो, अशाही मैत्रिणी असतात.) अशा गोष्टी आपल्यात कधीच झाल्या नाहीत याचा मला अभिमान आहे.

             माझं मन सर्वांसमोरच मोकळं नाही करत मी हे तुलाही माहिती आहे. खूप आहे गं अजून बोलायला पण थांबवते आता. (हुश्श केलं असशील तर याद राख ;)). पुन्हा एकदा तुला तुझ्या नवीन आयुष्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. नेहमी सुखी रहा.

तुझी मैत्रीण,
...