मी, माझे, मला सर्वप्रथम आणि बाकीचे सगळे माझ्यानंतर अशी कोणाची वृत्ती दिसली तर त्यांना आपण स्वार्थी म्हणतो. पण खरं बघायचं तर सगळीकडे सगळेजण असाच विचार करताना दिसतात. अगदी विरळ प्रमाणात दुसऱ्यांचा विचार आधी करतात असे काहीजण दिसतात. पण अशा लोकांना त्रासच जास्त होताना दिसतो. स्वार्थी असलं की त्रास कमी असतो, त्यामुळे खरं तर स्वार्थी असणं हे कोणाच्याही सोयीचं आहे. स्वार्थी माणसाला कधीच मनाला मुरड घालावी लागत नाही, आणि कोणालाही मनाप्रमाणे वागायला मिळालं की तणावही कमी असतो.
मला वैयक्तिकरित्या कोणालाच नाही म्हणता येत नाही. आता हा अवगुण समजला जातो, पण आमच्यावर संस्कार झाले तेव्हा शक्य तेवढी आपण इतरांना मदत करावी असेच संस्कार झाले. त्याही पुढे जाऊन जर आपल्या आवाक्यात नसेल आणि कोणाला नाही म्हणावं लागलं तर त्याचा चक्क अपराधगंड येतो. आजूबाजूला कोणाला फटकन काहीही बोलणारी माणसं दिसतात, पण मी मात्र कोणाला लागेल असं बोलू शकत नाही. आणि समजा अगदी ठरवून बोललंच कधी तर जे सहज इतरांना बोलतात आणि विसरून जातात तसं होत नाही. आपण असं उगीच बोललो का, थोडं सौम्य काही म्हणायला हवं होतं का, त्याला/तिला काय वाटलं असेल असलंच कितीही वेळ वाटत राहतं.
काय म्हणावं या स्वभावाला, फटकन बोलून मोकळे होणाऱ्या लोकांमध्ये मनामध्ये काही साचून तणाव निर्माण होत नसावेत, पण असे अनेक जण असतात की ते बोलू न शकल्याने मनामध्ये गोष्टी साचून ताण घेतात किंवा कधी बोलून मोकळे झालेच तर आपण असे का बोललो याचाही ताण घेतात, म्हणजे मानसिक ताणापासून बोलून काय किंवा न बोलून काय सुटका नाहीच. राशींप्रमाणे माणसाचे तसे तसे स्वभाव आणि भोग असतात म्हणतात, ते ढोबळमानाने नक्कीच खरं असावं. नाहीतर जगात सगळी माणसे एकसारखीच भांडकुदळ किंवा एकसारखीच शांत नक्कीच दिसली असती.
कोणाला काही बोलू न शकणाऱ्या किंवा मदतही जमली नाही म्हणून वाईट वाटून घेणाऱ्या लोकांमध्ये मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, माझी प्रतिमा सगळ्यांपुढे एक चांगला माणूस म्हणून उभी रहावी ही अपेक्षा असेल का, की एखाद्याला खरंच मनापासून कोणालाच दुखवायला आवडत नसेल? मग आपल्याला कोणी चांगलं म्हणो अथवा वाईट? अंतर्मुख लोकांना कोणाला काही बोलण्यापेक्षा न बोलणं जास्त सोयीचं वाटतं. मुळात बोलण्याचेच कष्ट वाटतात. मग हळू हळू ते कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटणं, कोणी वाईट वागलं तर त्याला ते बोलूनच दाखवणं यापेक्षा बोलण्याचे कष्ट न घेणं जास्त पसंत करतात, आणि त्याचा ताणही घेणं सवयीने कमी होत जात असेल.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा