सोमवार, २७ जुलै, २०२६

षड्रिपु-क्रोध

षड्रिपुंपैकी एक असलेला क्रोध म्हणजेच राग! मनाचा राग फार वाईट, तो आपले इतरांसोबतचे संबंध तर बिघडवतोच शिवाय आपल्याही आरोग्यावर वाईट परिणाम करतो. आणि असं असूनही जाऊदेत या रंगाचे इतके तोटे असतात तर नको आपण रागवायला असं होत नाही. सगळ्या षड्रिपूंपैकी राग हा सर्वात जास्त सामान्यतः आढळणारा षड्रिपू आहे. रागाच्या भरात माणसे काय काय करून बसतील याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. भरपूर साधना, ध्यानधारणा करूनही रागावर नियंत्रण मिळवलंय असा माणूस सापडणे विरळाच.

एखादी व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागली नाही किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे बोलली नाही आपल्याशी वाद घातला की आपल्याला राग येतो. आपली ज्या गोष्टींवरून चिडचिड होते त्याच गोष्टी सतत करत असेल, आपल्याला जे अप्रिय असेल तेच सतत बोलत असेल तर आपण रागाला आवर घालू शकत नाही. कोणी आपला अपमान केला तर आपल्याला राग येतो. कोणी आपल्याला कमी लेखले किंवा विनाकारण चिडवले, डिवचले की आपल्याला राग येतो.

पुराणकाळात असं म्हणतात की कोपगृहे असत. जिला राग आलाय अशी व्यक्ती त्या कोपगृहात जाऊन बसत असे, मग इतरांनी समजून जायचं असायचं की तिला राग आलाय आणि मग तिथे जाऊन त्या व्यक्तीची समजूत काढणे अपेक्षित असे. जिला राग आलाय ती व्यक्तीही नक्कीच तितकी महत्त्वाची असली पाहिजे, नाहीतर आपल्याला कधी कधी राग येतो, पण कोणाला काळातही नाही की आपण रागावलोय. काहींना स्वतःचा राग म्हणजे फार अभिमानास्पद गोष्ट वाटते, आपण रागावलो की सगळे कसे घाबरतात, सगळे आपल्या कसे धाकात आहेत याने काहींना समाधान मिळते, पण ही एक विकृतीच म्हटली पाहिजे.

काही व्यक्ती रागावतात तेव्हा आकांडतांडव करतात, इतरांना शिवीगाळ, मारहाणही करू शकतात, तर काही व्यक्ती फक्त मनातून रागावतात, फक्त धुसफूस करतात, त्या रागावल्या आहेत हे इतरांना कळतही नाही असा त्यांचा राग असतो. असं म्हणतात की राग आला की तो व्यक्त करून टाकणे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगले असते, पण नाती सांभाळताना असे वागणे नक्कीच त्रासदायी ठरू शकते. आणि मनात राग ठेवण्याने नात्यांमधले  वादविवाद टळले तरी त्या व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

काहींना रागात कोणाला काही बोललं तरी नंतर ते नातं सांभाळून घेता येते तर काहींना अगदी असह्य झाल्यावरच इतरांना रागात काही बोलले असतील तरी आपण असे का व्यक्त झालो, ज्याला बोललो त्याला किती वाईट वाटले असेल असं वाटून स्वतःलाच अपराधगंड येतो. पण धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही म्हणतात. त्यामुळे आपण कोणाला रागामुळे दुखावत असू तर राग आवरण्यासाठीचे उपाय शोधणे कधीही चांगले.

रागीट असणे हा एक प्रकारचा स्वभाव आहे, आणि स्वभावाला औषध नसते म्हणतात. पण ज्यांना मनापासून चुकीच्या स्वभावात बदल करण्याची इच्छा असते ते त्यासाठी प्रयत्न नक्कीच करतात. मग राग आलाय असे वाटताना आकडे मोजणे असो, वा मौन राहणे असो वा थ्री इडियट्स मधल्या व्हायरससारखे राग आला की मुद्दाम उलट क्रिया म्हणजे हसणे असो ज्यांना बदलायचंय ते काही ना काही उपाय करून पाहतात.         

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा