षड्रिपूंपैकी आणखी एक रिपु म्हणजे काम. काम म्हणजे वासना. अनिवार शारीरिक इच्छा किंवा कोणताही गोष्टीचा हव्यास. क्रोधाप्रमाणेच अतिकाम देखील आरोग्याला हानी पोहोचवणारा रिपु आहे. काम अनावर झाला की त्यातूनही क्रोध निर्माण होतो. मग माणसाचे एकातून दोन शत्रू तयार होतात. असेच सहाही रिपु एकमेकांशी संलग्न आहेत. कामाला आवर न घालता येण्याचे प्रकार आणि त्यातून उद्भवणारे सामाजिक दुष्परिणाम आपण बघतच आहोत.
एप्सटिन फाईल्स असेल, अनैतिक संबंध आणि त्यातून होणारी भांडणे, मारामाऱ्या आणि खून असतील, किंवा लहान बालक बालिकांवरचे अत्याचार असतील किंवा असंख्य प्रमाणात वाढलेल्या बलात्काराच्या केसेस असतील. हे सगळे काम नियंत्रित न ठेवल्याने दिसणारे दुष्परिणाम आहेत. माणसाच्या एका क्षणाच्या वासनेचे गंभीर दुष्परिणाम इतरांनाही भोगावे लागतात. ज्याचा नैतिक पाया उत्तम असतो त्याला कामवासनेला आवर घालणे कठीण जात नाही.
आज जग जवळ आल्याने आणि मुलं मुलींची लग्नाची वये वाढल्याने तरुण उमलत्या वयात या षड्रीपुसाठी मुले वाहवत जाताना दिसतात. मग लग्नाचे आमिष दाखवून फसवले अशा बातम्या वारंवार ऐकायला मिळतात. पण लग्नाचे आमिष दाखवले असेल तर लग्न होईपर्यंत संबंध न ठेवणे त्यातल्या मुलीलाही जमलेले नसते, हा तिच्यातल्या काम रिपुचा विजय असतो. किंवा ऑनलाईन ओळख होऊन एखाद्या मुलीने मुलांकडून लाखो रुपये वारंवार उकळले असे समजते ते त्या मुलाला काम रिपुला नियंत्रणात न ठेवता आल्याने झालेले असते. पुराणकाळातील गोष्टींमध्ये वेगवेगळ्या स्त्रियांनी विशिष्ट हेतूने अनेक ऋषींची तपस्या भंग केल्याचे विविध कथांमधून आपल्याला माहिती आहे. हे त्या ऋषींना इतर सर्व रिपुंवर विजय मिळवूनही कामवासनेवर विजय मिळवता न आल्याने शक्य होते. हनी ट्रॅप मध्ये भले भले लोक फसलेले आपल्याला दिसतात.
काम आणि एका व्यक्तीशी एकनिष्ठ असणे हे आपल्या समाजात आदर्श मानले जाते. हिंदूंसाठी एका पत्नीशी किंवा पतीशी घटस्फोट घेतल्याशिवाय व्यक्ती इतरांशी संबंध ठेवू शकत नाही, दुसरे लग्न करू शकत नाही. तसे केल्यास त्यास अनैतिक समजले जाते. भारतीय समाजात काम या गोष्टीचा एकनिष्ठतेशी असा घनिष्ठ संबंध आहे. माणूस इतर कोणत्याही रिपुपेक्षा कामवासनेने लिप्त असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सर्वात जास्त नाचक्की होते. स्त्रीने स्त्रीशी किंवा पुरुषाने पुरुषाशी संबंध ठेवणे हेदेखील वहिवाटीबाहेरचं मानलं गेलं आहे. कारण निसर्गाने प्राण्यांना काम दिला त्याचा मूळ हेतू आहे प्रजनन जो समलिंगी संबंधांनी साध्य होत नाही.
प्रजनन होण्यासाठी काम महत्त्वाचा आहे, पण काम आणि नैतिकता हे एकमेकांसोबत गुंफलेले असतील तरच तो समाजमान्य आहे. अन्यथा प्रत्येक जीवाची ती मूलभूत गरज असूनही स्वैरपणा केल्यास तो आपला शत्रू ठरतो.
#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा