सोमवार, २७ ऑगस्ट, २०१२

जादुगार...

"इनमिनाती बबलाबू 
कर दे रुमाल को पंछी तू..."

"हा हा हा... हे पहा कबुतर...."

आणि असं म्हणून त्याने ते कबुतर आकाशात सोडून दिलं. 

एकामागून एक तोंडात बोटं घालायला लावणाऱ्या जादू समोर साकार होत होत्या. आणि समोर बसलेली लहान-मोठी मुलं तर सोडाच, पण मोठी माणसंही अचंबित झाल्यासारखी पाहत होती. एकेका जादुनंतर टाळ्यांचा कडकडाट आणि भाबड्या डोळ्यांमधून ओसंडणारा आश्चर्यमिश्रीत आनंद.

कार्यक्रम संपला. मुलांसाठी तर सगळं वातावरण भारल्यासारखंच झालं होतं. व्यवस्थापकांनी जाहीर केलं की आता कार्यक्रम संपला, आता जादुगार काका थोड्या वेळाने इथून निघतील. तरीही कोणाला त्यांना भेटायचं असेल तर ऑफिसमध्ये या. 

"खरंच तू आमच्यासाठी आलास फार बरं वाटलं" व्यवस्थापक म्हणाले, यावर जादूगाराचं उत्तर.. "अरे मित्रासाठी आणि मुलांसाठी इतकंही नाही करणार मी?" असं बोलत बोलत ते ऑफिसकडे वळाले.

-------------------------------------------------------------------------------

"दीदी, जादुगार काका काहीही करू शकतात का गं?" बबलीने विचारलं.

"हो गं बबली, आपण आता पाहिलं ना, त्यांनी कायकाय जादू केल्या. मला तर वाटतंय की ते काहीही करू शकतात. अगदी होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं  होतं...." बबलीच्या त्या दीदीने आपल्याला फार समजल्यासारखं तिला सांगितलं.

"होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं  होतं?" बबलीने पुन्हा विचारलं.

"नाहीतर काय. हवं तर ऑफिसमध्ये भेटून विचार त्यांना..."

"हो, मी मुळी जाणारच आहे त्यांना भेटायला. मला फार आवडले जादुगार काका"

आणि बबली दीदीचा हात सोडून ऑफिसकडे उड्या मारत पळाली.

ऑफिसमध्ये जादुगार काकांची निघण्याची लगबग चालू होती. बबली जरा घाबरतच त्यांच्याकडे गेली.

थोडा वेळ त्यांच्याकडे पहातच राहीली. जादुगार काकांचं तिच्याकडे लक्ष गेलं. पिशवी आवरतच ते बबलीला म्हणाले
"बोल बाळ..."

"जादुगार काका जादुगार काका, तुम्ही काहीही जादू करू शकता?" बबलीने विचारले.

आता काय उत्तर द्यावं ते त्यांना कळेना. पण लहान मुलाची निरागसता राखण्यासाठी ते म्हणाले
"हो बाळ, तुला अजून दुसरी जादू पहायची असेल तर मी पुढच्या वेळेस येईन तेव्हा करून दाखवीन हं..."

"काका, पुढच्या वेळेस नको, मला आत्ता करून दाखवाल?" बबलीने धिटाईनं विचारलं.

"आत्ता? बरं तुला काय जादू पहायची ते सांग पाहू..."

"मला इथे येऊन थोडेच दिवस झाले, सगळे म्हणतात माझ्या आई-बाबांना अपघात झाला म्हणून ते देवाघरी गेले, त्यांना देवाच्या घरून परत आमच्या घरी आणाल?......"

११ टिप्पण्या:

  1. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद श्रद्धाजी....

    उत्तर द्याहटवा
  2. तन्वीताई, ब्लॉगवर तुमचं हार्दिक स्वागत :)

    उत्तर द्याहटवा
  3. किती निरागस प्रश्न...आणि जादुगार काकांना काय उत्तर द्यावे ह्या चिमुरडीला पेचप्रसंगच आहे! छानच लिहिले आहेस इंद्रधनू.
    लहान वयात आई वडील देवाघरी जाणे हा अनुभव अस वाटते कोणाला येऊ नये...मी आमच्या जवळच्या ओळखीत एक उदाहरण पहिले आहे ते इकडे सांगावेसे वाटले.
    दोन मुली आणि त्यांचे आई वडील, भारतातल्या भूज,गुजरात मध्ये राहत होते.दृष्ट लागावी इतका आनंद आणि प्रेम शिवाय मुली दोघी हुशार.२६ जानेवारी २००१ मध्ये भुज ला खूप मोठा धरणीकंप झाला. शाळेतली सर्व मुले शाळेच्या पटांगणात झेंडावंदन करत होती आणि वडील मंडळी घरात कारण सकाळी ८ चा सुमार...मुलींना आई वडील त्या दिवशीनंतर भेटलेच नाहीत. मुली,एक १० वर्षांची तर दुसरी ७ वर्षांची होत्या.ह्या भयानक घटनेनंतर त्या दोघींना त्यांच्या आत्याने स्वतःकडे आणले आणि आज त्या पुढे शिकत आहेत आणि मोठ्या आहेत.पण मी जेव्हां त्यांना प्रथम पहिले तेव्हां मनात जे काही वादळ उठलेले. कि बस! तेव्हां असे वाटले कि ह्या दोन लहान मुलींच्याच आयुष्यात इतक्या लहानपणी इतका मोठा अपघात का लिहिला बाप्पाने? मन अस्वस्थ झाले हि बातमी ऐकून.इंद्रधनू तू लिहिलेस तसे ह्या जादुगार काकांनी तुझ्या कथेतील लहानगीच्या आई बाबांना पटकन आणून दिले असते तर!

    उत्तर द्याहटवा
  4. मनाला अतिशय चटका लावून जाणारा प्रसंग सांगितलात....

    खरंच काही गोष्टींची उत्तरे आपल्या कोणाकडेच नसतात. असं म्हणतात नशीब वगैरे काही नसतं.. स्वत:च्या कर्तृत्त्वावर विश्वास हवा. पण इवल्याश्या चिमुरड्यांचं छात्र हरवलं हा नशिबाचाच भाग ना....काहीही चूक नसताना एखाद्याच्या आयुष्यात असे प्रसंग येतात की आपल्याला त्यांची दया येते, त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं पण दैव कोणीच बदलू शकत नाही...

    खूप धन्यवाद श्रियाताई....

    उत्तर द्याहटवा