बुधवार, २९ जुलै, २०२६

षड्रिपु-लोभ

लोभ म्हणजे अतिरिक्त मिळण्याचा हव्यास. आपल्याला हवं तेवढं अर्जित करूनही जास्तीत जास्त कसं मिळेल याचाच सतत विचार. एकदा का माणूस लोभामध्ये पडला की कोणतीच गोष्ट त्याला पुरेशी वाटत नाही. आणि लोभाचा विशेष म्हणजे कष्टाने मिळवण्यापेक्षा माणूस अनैतिक मार्गाने कमावण्याचा प्रयत्न करतो. कारण माणसाचा लोभ इतका वाढलेला असतो की नैतिक मार्गाने एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस जितकं कमावू शकतो तितकं त्याला पुरेसंच पडत नाही. आणि एकदा कोणतीही गोष्ट मिळवण्याचे चुकीचे पण सोपे मार्ग ठाऊक झाले की माणसाचा लोभ अधिकाधिक वाढत जातो.

सरकारी नोकरी किंवा राजकारण हे अनैतिक मार्गाने पैसा कमावण्याचे खात्रीचे मार्ग आहेत. हे सोडून इतर मार्गांमध्ये माणसाला थोडा तरी धोका आणि कष्ट जास्त असतात. पण जे त्या व्यवस्थेमध्ये नसतात त्यांनाच जास्त लोभ असतो, आणि म्हणून स्वतःच्या फायद्यासाठी असे लोकच व्यवस्थेला भ्रष्ट होण्यात मदत करतात. पेपर विकत घेणाराच कोणी नसेल तर पेपर कशाला लीक होईल? पण लोभाने माणूस भ्रष्टाचारी बनतो. मग देणारे आणि घेणारे दोन्ही प्रकारची माणसे तयार होताना दिसतात. पाच सहा हजार आय ए एस ऑफिसर्स मध्ये एकच तुकाराम मुंढे का असतात?

लहानपणी एक गोष्ट ऐकली होती, एका माणसाला देव वर देतो की या जमिनीवरून तू धावत जा आणि तेवढी जमीन तुझी होईल, आत फक्त एकच आहे की सूर्यास्त होईपर्यंत तू जिथून सुरुवात केलीस तिथे पुन्हा परतला पाहिजेस, नाहीतर तुला काहीच मिळणार नाही आणि तो माणूस लोभाने सूर्यास्त होईपर्यंत मी आता परत जाईन अजून एवढी जमीन मिळू देत नंतर परत जाईन असे करत मागे फिरतच नाही आणि सूर्यास्त होतो तेव्हा जिथे पोहोचतो तिथेच थकून जाऊन कोसळतो. दुसरी एक सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीची गोष्ट, माणूस सगळी अंडी एकदम मिळवण्यासाठी त्या कोंबडीलाच मारून टाकतो आणि त्याला ती कोंबडी मारून जाऊन त्याच्या हाती नंतर काहीच उरत नाही.

ऐकायला छान गोष्टी आहेत. पण बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात, तसं निरागस असू तोवरच या गोष्टींचं महत्त्व असतं. एकदा माणसाला भ्रष्ट वागून जास्त मोबदला मिळण्याची संधी मिळत असेल तर तो ती सोडत नाही. आपण बातम्या ऐकतो एवढ्या कोटींचा घोटाळा, अमक्याच्या घरी गाद्या, बाथरूमचे छत अशा ठिकाणांहून नोटांची बंडले सापडली वगैरे तर आपण डोळे विस्फारून ते पाहत राहतो, आणि आपल्या मध्यमवर्गीय मनात विचार येतो, अमुक एका मर्यादेनंतर यांना थांबावंसं का नसेल वाटलं? 

असं काय मोठं लागतं जगण्यासाठी? पण ते आपण मध्यमवर्गीयांना. तरी एवढे पैसे एका कुटुंबासाठी काय काय ऐषोआराम केला तर अपुरे पडतील हा विचार करण्याची तेवढी विचारांची उंचीच पोहोचत नाही. किती पिढ्यांसाठी कमावून ठेवलं तर त्यांना पुरेसं वाटत असेल याचा थांग लागत नाही. आणि जेव्हा एखाद्याच्या हितसंबंधांना धक्का लागत असेल तेव्हाच हे भ्रष्टाचार उघडकीस येतात. 

जोपर्यंत जग आहे तोवर हाही षड्रिपु लोभ राहणारच. काहींचा लोभीपणा उघडकीस येईल, काहींना त्यातल्या अनैतिकतेसाठी शिक्षा होईल, काहींचा उघडकीस येणार नाही. आपण मात्र प्रयत्न करू की कळावे लोभ असावा मधलाच लोभ फक्त आपल्या सोबत राहील.  

#सुरपाखरू#३०दिवसात३०#जुलै२०२६


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा